Saturday, July 30, 2022

वाचन संकल्प.. पन्नास पुस्तकं (पुस्तकं १० ते १३)

१०. जगाच्या पाठीवर.. सुधीर फडके.. 


बाबूजी म्हणून ओळखले जाणारे संगीतकार, गायक सुधीर फडके यांचे हे आत्मचरित्र.. खरं तर एक अपूर्ण आत्मचरित्र.. "किर्लोस्कर" मासिकासाठी बाबूजींनी लिहिलेल्या लेखमालेचा हा एक संग्रह पुढे 'जगाच्या पाठीवर' म्हणून प्रकाशित केला.. सावरकरांवरच्या चित्रपटाचा ध्यास त्यांनी घेतल्यामुळे ह्या लेखमालेत केवळ पंधराच भाग बाबूजी लिहू शकले.. आणि हे आत्मकथन अपूर्ण राहिले.. 

बालपण ते पाहिलं ध्वनीमुद्रित गाणं असा बाबूजींचा जीवन प्रवास ह्यात वाचायला मिळतो.. आई गेल्यानंतर सधन असलेल्या कुटुंबाची झालेली वाताहात, वडिलांनी वकिली बंद केल्यावर बदलेली आर्थिक परिस्थिती, उपासमार.. नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या आधारावर काढलेले दिवस.. उधारी-उसनवारी आणि गाण्याच्या जीवावर आयुष्य सावरण्याचा केलेला आटोकाट प्रयत्न.. आशा-निराशा, यश-अपयश, मान-अपमान ह्यावर हेलकावणारं आयुष्य.. हे सगळं वाचताना अंगावर काटा येतो, डोळे पाणावतात.. 

कोल्हापूरमध्ये असताना लहानपणीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी ते जोडले गेले.. संघाची तत्त्वप्रणाली, ध्येय ह्यानं ते भारावून गेले.. उच्च-नीच, जात-पात लहानमोठ्ठा असे सर्व भेदभाव पूर्णाशानं मिटवून, भाषाभेद, प्रांतभेद नाहीसे करून हिंदू समाजाला एक समान पातळीवर आणण्याचं ध्येय असणारी आणि हे करत असताना देशाला स्वतंत्र करायला कटिबद्ध असलेली अशी हि संघटना त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग होऊन गेली.. संघाच्या ओळखीतूनच पुढे ते काम मिळवण्यासाठी मुंबईत आले.. संघाच्या कार्यालयात राहून संघकार्य आणि गाण्याचं शिक्षण देणे-घेणे, संघाची कार्यव्यवस्था पाहणे अशी कामे ते करत.. पण संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यासंघाच्या कार्यालयात राहून संघकार्य आणि गाण्याचं शिक्षण देणे-घेणे, संघाची कार्यव्यवस्था पाहणे अशी कामे ते करत.. पण संघातील तत्कालीन पदाधिकाऱ्यांशी मतभेद झाल्यानं त्यांना संघकार्यालयातून सामानासकट बाहेर काढलं गेलं.. फुटपाथ वर राहण्याची वेळ त्याच्यावर आली.. ते वाचताना अवंठा दाटून येतो.. इतकं सगळं होऊन सुद्धा संघाचं काम ते निष्टेनं करतंच राहिले..  

संघ कार्यालयातून हकालपट्टी झाल्यावर फूटपाथ आणि मग मुंबईचा कंटाळा आल्यावर देशभर भटकंती.. संघातील ओळखींच्या आधारावर गावोगाव फिरून गाण्याचं  कार्यक्रम करून थोडेफार पैसे जमले कि पुढचा प्रवास.. काही ठिकाणी कार्यक्रम होत तर काही ठिकाणी नाही.. कधी राजे-संस्थानिक-जमीनदार ह्याच्या समोर तर कधी देवळात तर कधी रेल्वे स्टेशन.. अनेक विरोधाभास.. गैरसमजामुळं घरच्यांशी, कोल्हापूरशी तुटलेलं नातं, पैसे मागतो म्हणून मित्रांशी आलेला दुरावा.. अश्या अनेक कारणांमुळं आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय.. या भटकंतीत झालेले मान-अपमान, फसवणुक त्याच बरोबर मदतीला आलेले हात यांचं सविस्तर वर्णन पुस्तकात केले आहे.

'पहिलं गाणं रेकॉर्डिंग' ची संधी कितीतरी वेळा आली आणि हातातून निसटून गेली हे वाचतानाचे प्रसंग हृदय द्रावक आहेत.. कलकत्ता हीच कर्मभूमी ठरवून काही दिवसासाठी आजारी भावाला कोल्हापूरला भेटायला आलेल्या बाबूजींची योगायोगानं गदिमांशी झालेली भेट.. त्यामुळं HMV झालेली त्यांची ओळख.. त्यातून मिळालेली गदिमांच्या गाण्याला चाल लावायची पहिली संधी.. नंतर झालेलं त्यांच्या गाण्याचं पाहिलं रेकॉर्डिंग.. HMV न नाकारलेला त्यांचा आवाज.. हे सगळं एखाद्या सिनेमाच्या गोष्टीसारखं वाटतं..

... आणि इथंच त्यांचं आत्मकथन संपतं.. गीतरामायणाची निर्मिती त्यांच्या लेखणीतून उतरायला हवी होती ही खंत नक्कीच आहे.. पण त्यांच्या पत्नी ललिता फडके यांनी गीतरामायण, सावरकर चित्रपट निर्मिती, गोवा-दादरा-नगर हवेली मुक्ती संग्राम ह्या बद्दलच्या आठवणी लिहिल्या आहेत.. पुस्तकांतील फोटोंमुळं पर्सनल टच आला आहे.. 

संगीतकार, गायक म्हणून बाबूजीं तर मोठ्ठे आहेतच पण त्यांचं देशप्रेम, त्यांचं सामाजिक भान हे ही पैलू पहायला मिळतात.. 


-मी मधुरा.. 

****************************************

११. क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता.. मृणालिनी गडकरी.. 

(आयरिश महिलेच्या भारतावरील निष्ठेची कहाणी..)




२०१८ सालच्या भारतवारीतलं.. "ताई चांगलंय.. नवीनच प्रकाशित झालंय.. घेऊन जा' दुकानदार काकांचा सल्ल्यानं घेतलेलं.. स्वामी विवेकानंदांची शिष्या 'भगिनी निवेदिता'.. कदाचित त्यामुळंच जड वाटलेलं आणि वाचायचं मागं पडलेलं.. असं हे पुस्तक ह्या वाचन संकल्पामुळं हातात घेतलं.. ते ही २०२२च्या भारतवारी विमानप्रवासात वाचायला.. 😂 आणि ३७८ पानांचं पुस्तक प्रवासात शेवटची काही पानं वगळता वाचून सुद्धा झालं.. 

'क्रांतियोगिनी भगिनी निवेदिता' हे स्वामी विवेकानंदांची शिष्या मार्गारेट नोबल यांचं चरित्र.. जन्मानं आयरिश, नागरिकत्वानं ब्रिटिश 'मार्गरेट'चा मार्गारेट ते भगिनी निवेदिता हा प्रवास आणि त्यांचं भारतातील कार्य याचं अभ्यासपूर्ण संकलन असलेलं मराठीतील पाहिलंच पुस्तक!!.. 'भगिनी निवेदिता' ह्या नावाशी माझा संबंध केवळ घराचा लँडमार्क म्हणून ह्यापूर्वी आला होता.. 'भगिनी निवेदिता बँकेसमोर..' इतकंच.. आणि हे पुस्तक वाचल्यावर इतक्या मोठ्ठ्या व्यक्तिमत्वाबद्दल काहीच माहिती नसावी याची खरोखरी लाज वाटली.. लोकमान्य टिळक, नामदार गोखले, दादासाहेब खापर्डे अश्या महाराष्ट्रातील व्यक्तींशी त्यांचा निकटचा संबंध असून सुद्धा त्यांच्या बद्दल कधीच काही वाचायला मिळालं नाही ह्याची खंत नक्कीच आहे.. 

भगिनी निवेदितांचं खूपसं काम कलकत्ता परिसरात झालं.. त्यामुळं त्यांच्यावरच थोडंफार लिखाण बंगालीमध्ये आठळून येतं.. 'निवेदिता लोकमाता' ह्या शंकरीप्रसाद बसूंनी लिहिलेल्या बंगाली भाषेतील चरित्राचा आधार मृणालिनी गडकरींनी घेतल्याचं म्हटलं आहे.. १८९८ ते १९११(मृत्यू : दार्जिलिंग) इतकाच काय तो भगिनी निवेदितांचा  भारतातील कार्यकाळ.. पण एकदा भारताला, भारतमातेला (जिला त्या नेहमी she असेच संबोधायच्या) आपलं म्हटल्यावर कितीही हालअपेष्ठा सहन कराव्या लागल्या तरी त्या परत इंग्लंडला गेल्या नाहीत.. त्यांच्या गुरूंनी स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं सचेतन भारताचं कार्य अत्यंत निष्ठेनं केलं.. थोडक्यात देशप्रेम (भारत), निष्ठा, गुरुभक्ती आणि आत्यंतिक त्याग म्हणजे भगिनी निवेदिता!

भगिनी निवेदिता म्हणजेच मार्गारेट मूळच्या आयरिश.. आयरिशांचे सेल्टिक रक्त क्रांतिकारक निर्माण करणारेच! आजोबा, आजी, वडील ह्या सगळ्यांकडून क्रांतीचे बाळकडू मिळालेली मार्गारेट स्त्रियांसंबंधी, त्यांच्या हक्कासंबंधी वृत्तपत्रातून लेख लिहू लागली.. स्त्रियांबरोबरच तळागाळातील लोकांच्या समस्या, शिक्षण पद्धती ह्याचे मार्मिक आणि परखड चित्रण लेखनातून केले.. पुढे स्वामींजींशी परिचय झाल्यावर भारताला आपली कर्मभूमी मानून येथे ही क्रांतिकारी बदल घडवून आणले.. भारतीय स्त्रियांच्या शिक्षणात वेगळेपणा आणला.. भारतीय संस्कृतीला धक्का न पोचवता स्त्री शिक्षणाला आधुनिकतेची जोड दिली.. स्त्रीला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचं बळ देणारी शिक्षण पद्धती सुरु करून, त्यांच्याकडून निरनिराळ्या वस्तू तयार करून घेऊन 'स्वदेशी'शी त्यांची ओळख करून दिली.. स्वामीजींना अभिप्रेत असणारा 'माणूस' त्या स्त्री मध्ये घडवत होत्या.. पण १९०२ मध्ये स्वामीजींच्या देहवासनानंतर त्यांनी स्वतःला स्वातंत्र्य लढ्याच्या गुप्तकार्यात झोकून दिलं.. त्यांची गुप्तहेर संघटना खूप ताकदीची होती.. 

आईची आई होणारी मार्गारेट, मे आणि रिचमंडची जबाबदार मोठ्ठी बहीण मार्गारेट, स्वामीजींची निष्ठावान शिष्या मार्गोट, शारदामातांची लाडकी खुकी (बाळ), शाळेतील विद्यार्थिनींची आवडती सिस्टर, लेखिका मार्गारेट/निवेदिता, कवी मनाची निवेदिता, तेजस्वी निवेदिता, निर्भय निवेदिता, लहानश्या गोष्टीने आनंदी/दुख्खी होणारी निवेदिता, क्रांतियोगिनी निवेदिता अशी अनेक रूपं पाहताना अचंबित व्हायला होत.. त्याचं हे चरित्र वाचल्यावर स्वामीजींनी त्यांना दिलेलं निवेदिता म्हणजेच समर्पिता हे नाव किती समर्पक होत हे पटतं.. 

-मी मधुरा..
 
*****************************************************

१२. महाश्वेता.. डॉ. सुमती क्षेत्रमाडे.. 



केवळ एका शारीरिक व्यंगामुळं पतीकडून अव्हेरल्या गेलेल्या स्त्रीचा अत्यंत संवेदनशील जीवनपट म्हणजे महाश्वेता!!.. डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांची लोकप्रिय कादंबरी.. या कादंबरीवर आधारित 'महाश्वेता' ही टीव्ही सिरीयल पहिली असल्यानं, एक उत्कृष्ठ साहित्य वाचायला मिळणार याची कल्पना होतीच.. ३२८ पानांची ही कादंबरी जसजशी पुढं सरकत गेली तसतशी मनावरील तिचा ताबा अधिक घट्ट होत गेला.. 

(सुधा मूर्तींनी सुद्धा याच कथानकावर आणि याच नावानं “महाश्वेता” कादंबरी लिहिली आहे.. पण सुमती क्षेत्रमाडे त्यांच्या ह्या कादंबरीबद्दल आधी माहिती नव्हतं असं त्यांनी म्हटलेलं आहे..) 

एका लहान गावात, मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेली आपल्या कथेची नायिका सुधा.. तिच्या अतुलनीय सौंदर्याने मोहित झालेल्या माधवशी लग्न करून ती 'धाकल्या इनामदारबाई' म्हणून देशपांडेच्या वाड्यात गृहप्रवेश करते.. श्रीमंती, उच्च राहणीमान, नोकर-चाकर, भरभरून प्रेम करणारा नवरा यामुळं सुधा आत्यंतिक सुखी जीवन जगत असते.. पण लग्नानंतर काही महिन्यातच तिच्या ह्या सुखी संसाराला 'पांढऱ्या डागांचे' ग्रहण लागते.. सुधाच्या सौंदर्यावर भाळून तिच्यावर आकंठ प्रेम करणाऱ्या माधवला तिच्या पायावरचा हा पंधरा डाग पाहून मोठा धक्का बसतो.. सौंदर्याची पूजा करणारा माधव तिच्याशी संबंध तोडतो.. अतिशय धार्मिक आणि कडक स्वभाव असलेल्या आईसाहेब, तिच्या सासूबाई तिला माहेरी पाठवून देतात.. विविध औषधोपचार, व्रतवैकल्य, देवधर्म करून सुद्धा कोड कमी होत नाहीत तर ते दिवसेंदिवस वाढतच जातात.. तिच्यामुळे आई-वडिलांना होणारा मानसिक त्रास, सगळीकडे होणारी चर्चा, बहिणीचे मोडलेले लग्न आणि नवऱ्याने तोडलेले संबंध यामुळे ती अजून खचून जाते.. 

दिल्लीला उपचार घेण्यासाठी घरातून बाहेर पडलेल्या सुधाचा प्रवास रोमांचित करणारा आहे.. दिल्लीला उपचारासाठी गेलेली सुधा डॉक्टर न भेटल्यानं, मावशीकाकांबरोबर हिमालयात तीर्थयात्रेला जाते आणि तिथं तिला तिच्या आयुष्याचं ध्येय सापडतं.. गंगामैय्या नावाच्या वृद्ध महिलेबरोबर तिच्या पर्णकुटीत राहण्याचा तिचा निर्णय, स्वामीजींचं तिला भेटणं, स्वामीजींच्या बरोबर असणाऱ्या अनाथ बालकांचा तिला लागलेला लळा, त्यांच्याशी झालेलं भावनिक नातं, घरच्यांसाठी नवऱ्यासाठी झुरणारं तिचं मन.. आणि ह्या सगळ्यांतून बदलत जाणारी, घडत जाणारी सुधा.. कोड आलेल्या मुलीची मानसिकता डॉ. सुमती क्षेत्रमाडे यांनी अचूक वर्णन केली आहे.. स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांनी हा विषय अगदी व्यवस्थित हाताळला आहे..

थोडक्यात मनुष्य स्वभावाचं दर्शन घडवणारी.. माणुसकी, श्रद्धा, विश्वास ह्याची सांगड घालून शारीरिक व्यंगावर मात करून आयुष्य आनंदात जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुधाच्या जीवनाची उत्कृष्ट कादंबरी...  
 

-मी मधुरा.. 

*****************************************************

१३. ब्र.. कविता महाजन..


'ब्र' सामाजिक विषयावर भाष्य करणारी लोकप्रिय कादंबरी!.. 'ब्र' ह्या कादंबरीबद्दल बरंच ऐकलं होतं.. त्यामुळं पन्नास पुस्तकांच्या यादीत हे नाव अगदी वरती होतं.. 

कादंबरीची नायिका 'प्रफुल्ला' हिचा एक सामान्य गृहिणी ते पूर्णवेळ कार्यकर्ती हा प्रवास म्हणजे 'ब्र'.. एकट्या, घटस्पोटीत बाईच्या नजरेनं, निरागसपणे पाहिलेलं जग म्हणजे 'ब्र'.. आदिवासी भागातल्या बाईचं जगणं म्हणजे 'ब्र'.. सामाजिक संस्थातलं राजकारण, समाजकारण म्हणजे 'ब्र'.. वास्तवाचं भान असून सुद्धा त्याबद्दल अवाक्षर न बोलणं म्हणजे 'ब्र'.. 

ही कादंबरी वाचल्यावर सुन्न व्हायला होतं.. २००५ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी.. पण अजुनी त्यातील घटना, घटनांमागची परिस्थिती आजही तशीच असावी ह्याची खंत नक्कीच वाटते.. कादंबरीच्या अर्पणपत्रिकेच्या पानावर 'ज्यांना 'ब्र' उच्चारता आला त्या सर्व जिभांना' हे वाचल्यावर चर्र होतं..  

आदिवासींचं जगणं, मुख्यत्वेकरून महिला, त्यांच्या जगण्यातील अडचणी वाचून डोळ्यांच्या कडा पाणावतात.. मूलभूत गोष्टींसाठी त्यांना झगडताना पाहून सरकार, सामाजिक संस्था ह्यांबद्दल मनात प्रश्नचिन्ह उभं राहतं.. 

आदिवासींचं नृत्य पाहिल्यावर, इतकी विपरीत परिस्तिथी, उपासमार, कुपोषण, उपचारांचे अभाव, अंगावर धड कपडा नाही.. या परिस्थितीत खुलून डोळ्यांत आनंद तेववत नाचतात कशी? हा प्रश्न जेव्हा प्रफुल्लाला पडतो तेव्हा डॉ. दयाळांनी दिलेलं 'कारण ते जिवंत आहेत...' हे उत्तर मनात घर करून राहत..

आता कोणतेही मोह नकोत.. पैश्याअडक्याचे, घरादाराचे, कापडलत्याचे, सोन्याचांदीचे, मुलाबाळांचे, शरीर-इच्छांचे, मानसिक आधारांचे.. ह्या सगळ्यातून मोकळं होऊन सहज स्वाभाविक आयुष्य जगता आलं पाहिजे.. हे नायिकेचे तिच्या अनुभवातुन आलेले विचार आपल्यासाठी ही समर्पक वाटतात.. विचार करायला लावतात.. 

सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढं पुढं चालत राहणं हेच तर खरं जगणं.. कांचन वृक्षासारखं!.. मुरुमांना सुद्धा छेद देत जाणाऱ्या त्याच्या मुळांसारखं!.. लाखो सोनफुलांनी उंच वाढत जाणारं.. आभाळाला भिडणारं.. परिस्थितीचं कातळ फोडून निश्चित वाटांनी ठाम जाणारी मूळ असणारं.. अश्मान्तक कांचन!!.. तसंच घडू पाहणारी प्रफुल्ला आपल्याला कादंबरीच्या शेवटी भेटते.. 

'ब्र' जरी आदिवासी पाड्यांबद्दल भाष्य करणारी कादंबरी असली तरी ती त्या पुरतीच सीमित नाही तर महानगर, शहर, खेडेगाव ह्या सगळ्यांना सामावून घेणारी आहे.. 

'ब्र' कादंबरीची हिंदी अनुवादित कादंबरी 'च्यू'  राष्ट्रीय पुरस्काराने गौरवली गेली आहे.. 


-मी मधुरा.. 

***************************************************************

No comments:

Post a Comment