Tuesday, July 15, 2025

अध्याय ८ 'अक्षरब्रह्मयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ८ "अक्षरब्रह्मयोग" 
(भगवत्प्राप्ती) 



सातव्या अध्यायात श्रीभगवान चराचरांत असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचं स्वरूप सांगतात.. एकदा का हे ज्ञान प्राप्त झालं कि ज्ञानी व्यक्तीला आपल्यात असणारं ईशतत्व चराचरांत वास करत असल्याचा प्रत्यय येतो.. आणि असे हे ज्ञान, प्रापंचिक ज्ञान आणि ब्रह्मज्ञान रूपानं उकलून ही सांगतात.. परा-अपरा तत्व, साधक आणि त्याच्या नानाविध भक्तीचे मार्ग सांगून अध्यायाची सांगता करताना श्रीभगवान म्हणतात,"जे मला भौतिक सृष्टीचा संचालक (अधिभूत), देवतांचा नियंत्रक (अधिदैव), सर्व यज्ञांचा अद्धिदाता भगवंत (अधियज्ञ) म्हणून जाणतात ते अंतसमयी पण मला जाणू शकतात".. ह्या वक्तव्यानं विचारात पडलेल्या अर्जुनाच्या प्रश्नानं "अक्षरब्रह्मयोग" ह्या अध्यायाची सुरुवात होते.. हा अध्याय मुख्यत्वेकरून, सर्वोच्च अविनाशी तत्व जे 'ब्रह्म', मूर्त आत्म्याचं अस्तित्व म्हणजे 'अध्यात्म', मनुष्याची उत्पत्ती आणि विकास ज्यावर अवलंबून असतो ते 'सकामकर्म' यावर भाष्य करतो.. मृत्युसाठीचा योग्य-अयोग्य काळ आणि त्याचा मुक्ती आणि पुनर्जन्म ह्याच्याशी असणारा संबंध सांगून ह्या अध्यायाची सांगता होते..    

'अधिभूत', 'अधिदैवत' ह्यांनी विचारात पडलेला अर्जुन प्रश्नांची शृंखलाच सुरु करतो.. ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? अधिभूत कशाला म्हणतात? अधिदैवत कशाला म्हटले जाते? ह्या देहाचा अधिपती कोण? आणि तो ह्या देहामध्ये कसा निवास करतो? भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसं जाणू शकतात?.. 

श्रीभगवान म्हणतात,
अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी दिव्य जीव म्हणजे *'ब्रह्म'.. आणि त्याचा स्वतःचा मूळ स्वभाव म्हणजे 'अध्यात्म'.. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत कार्ये म्हणजे कर्म किंवा सकाम कर्म.. 

परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला - उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश ह्या स्थित्यंतरातून जाणाऱ्या प्रकृतीला 'अधिभूत' असे म्हणतात.. देवदेवता आणि ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंताच्या विराट रूपाच्या संकल्पनेला 'अधिदैवत' म्हणतात.. तर प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असणाऱ्या, त्याच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असणाऱ्या, त्याच्या विविधभावनांचे उगमस्थान असणाऱ्या परमात्म्याला 'अधियज्ञ' म्हणतात..

आणि जो मरण समयी परमात्म्याचं स्मरण करीत देह सोडतो तो निःसंशय परमात्म्यात विलीन होतो.. आपल्या देहाचा त्याग करत असताना ज्या स्वरूपाचं, ज्या भावाचं स्मरण करतो त्याच स्वरूपाला तो जाऊन मिळतो.. म्हणून आपले मन विचलित होऊ न देता परमात्म्याच्या, भगवंताच्याठायी स्थिर करून जो निरंतर ध्यान करतो तो अंतसमयी सुद्धा भगवंत चिंतनात मग्न असतो आणि त्यामुळं निश्चितपणे तो भगवंतप्राप्ती करतो..  
म्हणून अर्जुना, भगवंताठायी मन बुद्धी अर्पण करून सदैव त्याचं स्मरण कर.. आपल्या युद्धरूपी स्वधर्माचं आचरण कर.. असं केल्यानं तुला नि:संदेह भगवंतप्राप्ती होईल..  

भगवंत चिंतन कसं करावं- ह्याची सुलभ पद्धत म्हणजे भगवंत निराकार किंवा शून्य नाहीत हे जाणून सूर्याप्रमाणे तेजस्वी, दिव्य अश्या परमपुरुष रूपामध्ये ध्यान करणं.. निराकार किंवा शून्यावर ध्यान करणं अतिशय कठीण.. म्हणून  सगुण रूपावर श्रद्धेनं भक्तिभावानं केलेलं ध्यान अधिक श्रेयदायी असतं.. 
माऊली म्हणतात, जे नानगतीने पावविते। ते चित्त वरील आत्मयातें। मग कवण आठवी देहातें। गेले की आहे।।.. म्हणजेच नानाठिकाणी असणारं चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असेल तर देह असला काय अन नसला काय काहीच फरक पडत नाही.. ते सदैव आत्म्याच्याच ठिकाणी स्थिर राहतं.. अंतकाळी एकाग्र चित्तानं, भक्तिपूर्वक, योगसामर्थ्यानं आपला प्राण दोन भुवयांच्या मध्ये स्थिर करून जो भगवंताचं स्मरण करतो त्याला निश्चितच भगवंतप्राप्ती होते.. 

ब्रह्म जरी अद्वितीय असलं तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपं असतात.. काहींसाठी ॐकार म्हणज़ेच ब्रह्म.. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ॐकाराचं उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करायला शिकवलं जायचं.. प्रत्याहार- इंद्रियविषय सुखांपासून परावृत्त होऊन, ज्ञानेंद्रियं पूर्णपणे संयमित करून मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र करून समाधिस्त व्हायला शिकवलं जायचं.. असं ॐकाराचं उच्चारण करत देहाचा त्याग केला असता *अध्यात्मिकलोकांची प्राप्ती होते.. ह्या मार्गाचं अनुकरण करणं तसं क्लिष्टच.. 
म्हणून अत्यंत सहज, उदात्त आणि आचरणास सुलभ असा भक्तिमार्ग श्रीभगवान इथं सांगतात.. विचलित न होता एकाग्रचित्तानं निरंतर भक्तीत रममाण होऊन परमात्म्याचं, भगवंताचं चिंतन केलं असता भगवंत प्राप्ती नक्कीच होते.. भगवंताची, परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर भक्तियोगी दुःखाचं आगार असलेल्या ह्या अशाश्वत जगात कधीच परतून येत नाहीत.. प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत जन्म-मृत्यूचा फेरा अटळ आहे.. पण परमात्म्याची भगवंताची प्राप्ती झाल्यावर मात्र कधीच पुनर्जन्म नसतो.. 

प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म-मृत्यू, जरा-व्याधी यातून मुक्त नाहीत.. ब्रह्मलोक हा ब्रह्माण्डातील सर्वोच्च लोक असला तरी कालांतरानं ब्रह्मदेव आणि तिथं वास करणारे उन्नत संन्याशी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात.. परंतु ब्रह्मदेव ब्रह्माण्डाचं व्यवस्थापन करत भगवंतांच्या सेवेत संलग्न असल्यानं त्यांना तात्काळ मोक्षप्राप्ती होते..
मानवीय गणनेनुसार एकसहत्र *चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि अश्याच एक हजार एकसहत्र चतुर्युगाची एक रात्र असते.. ब्रह्मदेवाच्या दिवसारंभी अव्यक्तापासून सर्व चराचर उत्पन्न होतात आणि रात्र प्रारंभी त्याच अव्यक्तात ते लय पावतात.. पुनःपुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरु होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि रात्र सुरु झाल्यावर आपोआप त्यांचा लय होतो.. 
ज्या अव्यक्तात ते जन्मतात आणि लय पावतात ती अव्यक्त प्रकृती जी ह्या भौतिकच्या पलीकडं आहे, सनातन आहे.. ती *परा आणि अविनाशी आहे.. संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी नष्ट होत नाही.. आणि हेच भगवंताचं परमात्म्याचं परमधाम.. जे परमलक्ष्य मानलं जातं.. ज्याची प्राप्ती झाल्यावर जन्म-मृत्यूच्या फेरा कायमचा सुटतो..

सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनं होत असली तरी जीवात्मा आपला देह कोणत्या पद्धतीनं आणि केव्हा त्यागतो त्यावर ही त्याचा पुढचा प्रवास अवलंबून असतो.. तो परत भौतिक जगात येणार का नाही हे त्या 'वेळे'वर ठरतं.. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधारमय असे ह्या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत.. प्रकाशमय मार्गातून प्रयाण झालं तर तो परत जन्म घेत नाही.. आणि अंधारमय मार्गातून प्रयाण झालं तर परत जन्म घेतो.. 
अग्नीचं सतेजपण असणारी दिवसाची वेळ, शुक्ल पक्षाचा पंधरवडा आणि उत्तरायणातील सहा महिन्यांचा काळ (१५ जानेवारी ते १५ जुलै) अश्यावेळी मृत्यू झाला तर परब्रह्माची प्राप्ती होते.. तर धुरकट प्रकाश, रात्रीची वेळ, कृष्णपक्ष, दक्षिणायनाचा सहा महिन्याचा काळ (१६ जुलै ते १४ जानेवारी) अश्यावेळी मरण आलं तर चंद्रलोकाची प्राप्ती होते.. चंद्रलोकांत जाऊन पुण्यांश संपल्यावर परत मृत्युलोकांत जन्माला येतो..

मृत्यूनंतरचा जीवात्माचा प्रवास ह्या दोन मार्गांनी होत असला तरी सकाम कर्म करत, भक्तीत रममाण होऊन, भगवंताच्या सेवेत सदैव युक्त राहिल्यास परमधमाची प्राप्ती होतेच.. त्यामुळे 'तू योगयुक्त हो.. भक्तीमध्ये युक्त हो' असा उपदेश अर्जुनाला करून श्रीभगवान अध्यायाची सांगता करतात.. 

नको गोंधळून जावू पार्था, सांगतो तुज ब्रह्माण्ड गुपित 

श्रेष्ठ अविनाशी जीव असतोब्रह्मअन अस्तित्वअध्यात्म 

शब्द, मन, शरीर, इंद्रिये हे जीवात्म्याचे अध्यात्म तू जाण 

अन सकाम कर्मे त्याची असती देहाच्या उत्पत्तीचे कारण ।।१।।


विनाशी अशी भौतिक प्रकृती म्हणती त्यासअधिभूत 

देवदेवता ग्रहलोक सामावता होते विराटअधिदैवत

अधियज्ञजो भावनासागर कर्मसाक्षी भगवंत   

देहामध्ये राहून करतो जीवात्म्यास सोबत ।।२।।


अर्पून मन-बुद्धी भगवंताठायी सदैव त्याचे स्मरण 

अंतकाळी नाम घेता होशील परमात्म्यात विलीन 

प्रयाणकाले स्मरण ज्याचे त्या स्वरूपा पावे 

करता प्राण स्थिर अंजचक्रे योग अन एकाग्रभावे ।।३।। 


ब्रह्म जरी अद्वितीय तरी अनेक अभिव्यक्ती रूप 

प्रत्येक रुपा संगे जोडला पुनः परतीचा लोक 

ब्रह्मदेवा सुद्धा नाही चुकला जन्म-मृत्यूचा फेरा 

पुनर्जन्म कधी धडे जाता निजधामी जीवात्मा ।।४।। 


अनंत भक्ती जरी होतसे प्राप्ती निजधामाची  

पुनर्जन्म का मोक्ष ठरवे वेळ देहत्यागाची 

अंधारातून प्रयाण म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा 

अन प्रकाशातून जाते भगवंतप्राप्तीच्या द्वारा ।।५।।


जाणूनी हा 'अक्षरब्रह्मयोग' प्रभुमुखातून

पाहू परमात्मा स्वरूप, अंतसमयी जपता भगवंत नामस्मरणातून  

करुनी सेवा, सकाम कर्मे, भजन, कीर्तन अन सगुण ध्यानधारणा  

सुटतील जन्म-मरण फेरे, स्थिरबुद्धी भक्तिभावे करुनी स्वधर्माचरणा ।।६।।  

हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  


*ब्रह्म : वेदांमध्ये ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परब्रह्म म्हणजे भगवंत असा भेद केला आहे.. जीवात्मा कधी कधी भौतिक प्रकृती अर्थात जडतत्व अर्थात अपरा प्रकृतीशी तादात्म्य करतो तर कधी तर कधी श्रेष्ठ परा प्रकृतीशी.. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती म्हंटले आहे.. ह्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक किंवा अध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.. 

*अध्यात्मिक लोक : कृष्णभक्त कृष्णलोक-गोलोक-वृंदावन.. साकारवादी वैकुंठ लोक नामक असंख्य लोक.. निर्विशेषवादी ब्रह्मज्योती.. 

*चतुर्युग : सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगं मिळून चतुर्युग..


-मी मधुरा.. 

************************************************

Monday, June 23, 2025

अध्याय ७ 'ज्ञानविज्ञानयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ७ "ज्ञानविज्ञानयोग"
( भगवद् ज्ञान )



गीतेच्या अध्यायांची विभागणी करायची झाल्यास पहिले सहा अध्याय म्हणजे एक भाग.. ज्यात आत्मज्ञान - स्वतःतील ईशतत्व जाणण्याचं ज्ञान - स्वतःला जाणण्याची प्रक्रिया - विस्तृतपणे मांडली आहे.. 
युद्ध करण्यास तयार नसलेल्या अर्जुनाला श्रीभगवान सर्वप्रथम शरीर आणि आत्मा यांचं द्वैत्य सांख्ययोगातून समजावून सांगतात.. देह नश्वर आहे, आत्मा शाश्वत आहे याचं ज्ञान करून देतात.. मनुष्याचा त्याच्या कर्मावर अधिकार आहे कर्मफलावर नाही त्यामुळं त्यानं केवळ निःसंग वृत्तीनं कर्म केलं पाहिजे हे कर्मयोगातून तर त्यासाठी आवश्यक असणारी स्थिरबुद्धी म्हणजे काय हे ज्ञानकर्मसंन्यासयोगातून, अशी बुद्धी प्राप्त करण्यासाठी लागणारी संन्यस्थवृत्ती कर्मसंन्यासयोगातून आणि त्यासाठीचा आत्मसंयम आत्मसंयमयोगातून सांगतात.. 

एकदा का हे आत्मज्ञान प्राप्त झालं कि ज्ञानी व्यक्तीला आपल्यात असणारं ईशतत्व चराचरांत वास करत असल्याचा प्रत्यय येतो.. ज्ञानविज्ञानयोग ह्या अध्यायात श्रीभगवान चराचरांत असणाऱ्या आपल्या ह्या अस्तित्वाचं स्वरूप सांगतात.. 
'हे सगळं अमर्यादित ज्ञान मर्यादित कक्षा असलेल्या मनानं कसं अभ्यासायचं?' ह्या विचारानं सैरभैर झालेल्या अर्जुनाला श्रीभगवान 'माझ्या ठिकाणी म्हणजेच परमात्म्याच्या ठिकाणी मन लावून आनासक्त मनानं योगाभ्यास कर' असा उपदेश करत ह्या अध्यायाची सुरुवात करतात.. 'प्रापंचिकज्ञान' आणि 'ब्रह्मज्ञान' ह्या रूपात हे ज्ञान विभागून, उकलून सांगतात.. जे ज्ञान बुद्धीनं, विचारानं, तर्कानं मिळवलं जातं ते व्यावहारिक म्हणजेच प्रापंचिकज्ञान म्हणजेच विज्ञान.. आणि जेथं बुद्धी, विचार आणि तर्क ह्याचा अंत होतो तेथं ज्ञान, तत्वाचं ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान-सुरु होतं.. प्रापंचिक ज्ञान खरं मानणं हे अज्ञान आणि ह्या अज्ञानाचा समूळ अंत झाल्यावर जे मूर्तिमंत ज्ञान प्रकट होतं ते ब्रह्मज्ञान- अंतिम ज्ञान होय.. नंतर 'परा अपरा' ह्या दोन प्रकृती तत्वांवर भाष्य करून संपूर्ण विश्वात ब्रह्म म्हणजेच भगवंत कश्या प्रकारे स्थित आहेत ह्याचं वर्णन केले आहे. साधकांचे अनेक प्रकार, त्यांच्या भक्तीचे अनेक मार्ग सांगून ते कसे शेवटी परमात्म्यापर्यंत पोचतात हे सांगून ह्या अध्यायाची सांगता होते.. 

भागवतात सांगितल्याप्रमाणं, ह्या सृष्टीच्या निर्मितीकरिता तीन विष्णुरूप कार्यरत असतात.. महाविष्णू हे रूप भौतिक प्रकृतीची निर्मिती करते, गर्भोदकशायी रूप ब्रह्माण्डात वैविध्यपूर्ण निर्मिती करते तर क्षीरोदकशायी विष्णू सर्वव्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते.. जो कोणी ह्या तीन विष्णूरुपांना जाणतो तो भौतिक जंजाळातून मुक्त होतो.. 
ह्या भौतिक प्रकृतीमध्ये आठ प्रधान अभिव्यक्ती आहेत.. पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश ही पाच तत्वे (पंचमहाभूते) याचबरोबर मन, बुद्धी आणि अहंकार.. 
हे भौतिक जग भगवंतांच्या अनेक शक्तींपैकी एका शक्तीची अस्थायी अभिव्यक्ती आहे.. परा प्रकृती.. जिच्यात सर्व जीवांचा समावेश होतो.. आणि हे जीव भौतिक प्रकृतीच्या साधनांचा म्हणजेच अपरा प्रकृतीचा उपभोग घेतात.. थोडक्यात पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार ही झाली अपरा प्रकृती.. विविध हेतूंसाठी या परा प्रकृतीनं - जीवांनी- अपरा प्रकृतीचा उपभोग घेतल्यामुळं हे भौतिक जग कार्यरत होतं.. ह्या जीवांनी चालना दिल्याशिवाय भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ आहे.. आणि  ह्या जीवांना चालना देण्याचं काम मायाशक्ती करते.. 
सर्व सृष्टी 'परा व अपरा' प्रकृतीपासून उत्पन्न झाल्यानं परमात्मा उत्पत्तिकर्ता तसेच प्रलयकर्ता ही आहे.. म्हणजेच सगळे जीव परमात्म्यापासून निर्माण होतात आणि परमात्म्यातच विलीनही होतात.. सारं जग दोऱ्यात ओवलेल्या मण्यांप्रमाणं परमात्म्याच्या सूत्रात गोवलं गेलं आहे.. परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ असं दुसरं काहीच नाही.. 

ह्या परमात्म्याचं, सृष्टीरचेत्याचं, स्वतःचं तत्वरूप सांगताना श्रीभगवान म्हणतात, "हे कौंतेया, पाण्यामधील रस मी, चंद्रसूर्यामधील प्रकाश मी, सर्व वेदांतला प्रणव म्हणजे ॐकार मी, आकाशांतला शब्द मी आणि पुरुषांमधील पराक्रम ही मीच.. पृथ्वीवरील सुवास मी, अग्नीमधलं तेज मी, सर्व प्राणिमात्रांतील जीवनशक्ति मी आणि तपस्वी मधील तप ही मीच.. सर्व पदार्थांचे अनादि बीज मी, बुद्धिमंतांची बुद्धि मी व तेजस्वीचं तेजही मीच.. बलवंतांचं सामर्थ्य, आसक्तिरहित बल ही मीच.. सर्व भूतांच्या ठिकाणी धर्माला अनुकूल असणारं कर्म ही मीच आहे.."

भौतिक जगतातील सर्व प्राकृतिक कार्य तीन गुणांच्या प्रभावाखाली होत असतात.. हे सात्विक, राजसिक व तापसिक गुण जरी भगवंतांच्या शक्तीनं उत्पन्न झाले असले तरी भगवंत त्या गुणांच्या अधीन नाहीत.. माऊलीनी हे समजावून सांगतांना म्हणतात, "सांगे अग्निस्तव धूम होये। तिथे धूमी काय अग्नी आहे?। तैसा विकारु हा मी नोहे। जरी विकारला असे।।..." म्हणजेच अग्नीपासून धूर उत्पन्न झाला तरी धुरात अग्नी कोठे असतो? तसेच हे भाव जरी परमात्म्यातून उत्पन्न झाले असले तरी ते भाव म्हणजे परमात्मा नव्हे.. 
ह्या सत्व-रज-तमात्मक भावांनी मोहित झाल्यामुळं हे सर्व जग निर्गुण अविनाशी अश्या परमात्म्याला जाणत नाही.. त्रिगुणांच्या जंजाळात ते असं अडकतं कि ह्या गुणांच्या सूत्रधाराचंच त्याला विस्मरण होतं.. ह्या मायेच्या पाशात अडकून जे आसक्ती कामना ह्यांच्या आहारी जातात त्यांना ही त्रिगुणात्मक अलौकिक माया पार करून परमात्म्यापर्यंत पोचणं कठीण होतं.. पण जे परमात्म्याला शरण जातात, त्याच्याठायी समर्पित होतात तेच ह्या मायेला तरुन जातात..  

जे शास्त्राच्या विधिविधानांचं दृढपणे पालन करतात असे 'सुकृतिनः'- चांगले कर्म करणारे - यांचे चार प्रकार श्रीभगवान सांगतात.. आर्त (पीडित), जिज्ञासू, अर्थार्थी (धनाची अभिलाषा) व ज्ञानी.. आर्त हा दुःख निवारण्याकरिता, जिज्ञासू ज्ञान प्राप्तिकरिता, अर्थार्थी द्रव्यप्राप्तीच्या इच्छेनं उपासना करतो तर ज्ञानी परमसत्याच्या ज्ञानाच्या शोधात उपासना करतो.. कर्मफलाच्या अपेक्षेनं केलेली ही उपासना फलदायी असली तरी मोक्षदायी नाही.. उपासनेच्या मार्गावर चालणारे सर्व योगी श्रेष्ठ आहेतच पण निष्कामतेनं, अनन्यभक्तीनं उपासना करणारा, परमसत्याचं ज्ञान असणारा योगी सर्वश्रेष्ठ आहे.. कारण भौतिक शरीरापासून भिन्न असण्याची अनुभूती त्याला अधिक उन्नत करते.. तो आत्मसाक्षात्कारी होतो.. आणि सर्वोच्च, सर्वोत्तम लक्ष्याची प्राप्ती करतो.. अनेक जन्मांच्या उपासनेनंतर, अभ्यासानंतर ज्याला वास्तविक ज्ञान - इदं ब्रह्मासि - सर्वत्र ब्रह्म आहे - 'सर्व काही वासुदेवरूप आहे' - हे कळतं, असा दुर्लभ महात्मा परमात्म्यात विलीन होतो..

असे हे सुकृतिनः आपल्या प्रकृती नियमाप्रमाणं भौतिक सुखोपभोग घेण्यासाठी निरनिराळ्या देवतांची उपासना करतात.. प्रत्येक जन्मात केलेल्या कर्मांनी, भोगलेल्या भोगांनी, तृप्त अतृप्त इच्छांनी आत्म्यावर संस्कार होत असतात आणि त्यानुसार आत्म्याचा प्रकृती गुण (सात्विक, राजसिक व तापसिक) ठरतो.. उदाहरणादाखल रोगी सूर्यदेवाची, विद्यार्जन करणारा सरस्वतीची-गणेशाची, श्रीमंतीची कामना करणारा कुबेराची, प्रेम-वैवाहिक सुख प्राप्तीसाठी उमेची उपासना करतो.. जो ज्या देवतास्वरूपाची उपासना श्रद्धापूर्वक करू इच्छितो, त्या देवतास्वरुपावर त्याची श्रद्धा भगवंत/परमात्मा स्थिर करतात.. जेणेकरून त्या देवतांची उपासना तो संपूर्ण समर्पण भावनेनं करू शकेल.. अश्याप्रकारे श्रद्धापूर्वक, स्थिरबुद्धीनं उपासना करून, त्या देवतेची कृपा संपादन करून, इच्छितफल त्याला प्राप्त होतं.. जे फल मर्यादित व अल्पकाळ टिकणारं असतं.. असे हे देवदेवतांचे उपासक त्या त्या देवलोकांची प्राप्ती करतात.. पुण्यकाळ संपला कि परत जन्म घेतात.. पण जे परमात्म्याला, परमात्म्याच्या ब्रह्मस्वरूपाला, साक्षात भगवंताला भजतात ते परमधामाची (मोक्ष) प्राप्ती करतात.. कारण देवतांची उपासना ही भौतिक आहे तर भगवंतांची उपासना ही अध्यात्मिक.. 

परमात्म्याच्या अनेक रूपांचं श्रेष्ठ, उत्कृष्ट आणि अव्यक्त स्वरूप न जाणता अल्पज्ञ, अज्ञानी त्या रूपांना देहधारी व्यक्ती समजतात.. योगमायेमुळं अव्यक्त असणारं खरं स्वरूप झळकलं गेल्यानं ते जन्मरहित, अविनाशी आहेत हे अल्पज्ञ, अज्ञानी जाणत नाहीत.. विश्वनियंता परमात्मा भूतकाळात घडलेलं, वर्तमानात घडत असणारं आणि भविष्यात घडणारं सर्वकाही जाणतो.. तो सर्व जीवांना जाणतो पण त्याला कोणी जाणत नाही.. कारण इंद्रियांच्या इच्छा व द्वेष ह्यापासून उद्भवणाऱ्या मोहांनी ते भ्रमित झालेले असतात.. जोपर्यंत मनुष्य भौतिक विकारातून मुक्त होत नाही तोपर्यंत तो भूत, वर्तमान, भविष्य जणू शकत नाही.. 
सत्कर्मीं, ज्ञानी जे सुखदुःखादी द्वंद्वापासून, त्या मोहापासून मुक्त होऊन दृढनिश्चयानं, समर्पणभावनेनं परमात्म्याची उपासना करतात ते परब्रह्माला, अध्यात्माला आणि सर्व कर्मांना ही जाणतात.. 
थोडक्यात, पंचमहाभूतांपासून निर्माण झालेल्या ह्या दृश्य सृष्टीत भगवंताचं अंशात्मक अधिष्ठान आहे हे जाणणं म्हणजे ज्ञान आणि ह्या सृष्टीचा मोह त्यागून तिच्या मायेपलीकडं असणाऱ्या भगवंताला जाणणं म्हणजे विज्ञान!.. 

"जो योगी मला भौतिक सृष्टीचा संचालक (अधिभूत), देवतांचा नियंत्रक (अधिदैव), सर्व यज्ञांचा अद्धिदाता भगवंत (अधियज्ञ) म्हणून जाणतो तो अंतसमयी पण मला जाणू शकतो".. असे सांगून श्रीभगवान ह्या अध्यायाची सांगता करतात..


होऊन स्थिरबुद्धी परमात्म्याठायी, कर अनासक्त मने योगाभ्यास
हो परिपूर्ण ज्ञानी, सांगतो परमसत्य प्रापंचिक अन ब्रह्मज्ञान रूपात 
बुद्धी-विचार-तर्क असे प्रापंचिक ज्ञान, अन ज्ञानाअंती वसे मूर्तिमंत ब्रह्मज्ञान
सत्य मानणे प्रापंचिक ज्ञाना असे अज्ञान, होता समूळ नाश प्रकटे दिव्यज्ञान ।।१।।

चालण्या सृष्टी सदैव असती परा-अपरा प्रकृती कार्यरत 
वसतो जीव 'परा'त अन उपभोगे भौतिक सुखे 'अपरां'त 
पृथ्वी-जल-तेज-वायू-आकाश अन मन-बुद्धी-अहंकार असे अपरा तू जाण   
उपभोगता भौतिक सुखे फिरे सृष्टीचक्र, पाठी मात्र मायाशक्ती सुजाण ।।२।।

निर्मिता सृष्टी परा-अपरा संगे, म्हणती उत्पत्तीकर्ता भगवंत
होऊन प्रलयकर्ता अंती, सारी सृष्टी विलीन त्या परमात्म्यात
झाले भगवंत शक्ती उत्पन्न त्रिगुण जरी, नाहीत ते गुणाधीन 
जावू तरून मोहमाया, होता निर्गुण अविनाशी स्वरूपाचे ज्ञान ।।३।।  

मिळवण्या भौतिक सुख करिसी नानाविध देव उपासना 
पूर्वजन्म कर्म संचित ठरवतो सत्व-रज-तम आत्मभावना   
भाव तसा देव तू भजसी ठेवून स्थिरबुद्धी अन श्रद्धा मनी 
प्राप्यसी इच्छितफल अन देवलोक जोवर पुण्याचा धनी  ।।४।। 

जन्म जन्मती देवता उपासक संपता पुण्यकाळ 
भजती ब्रह्मरुपा भगवंत उपासक परमधामी सर्वकाळ 
होशील तू ज्ञानी जाणुनी अव्यक्त सर्वव्यापी स्वरूप 
होशील विज्ञानी त्यागुन मोहमाया पाहता मायेपल्याड भगवंतरुप ।।५।।

जाणूनी हा 'ज्ञानविज्ञानयोग' प्रभुमुखातून
होऊ निजधामी, करुनी नित्य उपासना भगवंतचिंतनातून 
त्यजुनी मोहमाया, समर्पणभावे दृढनिश्चयी करता भगवंतसेवा
होऊ आत्मज्ञानी, अभ्यासून ज्ञान-विज्ञाने सर्वव्यापी ईशतत्वा।।६।।

हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  



-मी मधुरा.. 

************************************************