Tuesday, July 15, 2025

अध्याय ८ 'अक्षरब्रह्मयोग'

श्रीपरमात्माने नमः 
अध्याय ८ "अक्षरब्रह्मयोग" 
(भगवत्प्राप्ती) 



सातव्या अध्यायात श्रीभगवान चराचरांत असणाऱ्या आपल्या अस्तित्वाचं स्वरूप सांगतात.. एकदा का हे ज्ञान प्राप्त झालं कि ज्ञानी व्यक्तीला आपल्यात असणारं ईशतत्व चराचरांत वास करत असल्याचा प्रत्यय येतो.. आणि असे हे ज्ञान, प्रापंचिक ज्ञान आणि ब्रह्मज्ञान रूपानं उकलून ही सांगतात.. परा-अपरा तत्व, साधक आणि त्याच्या नानाविध भक्तीचे मार्ग सांगून अध्यायाची सांगता करताना श्रीभगवान म्हणतात,"जे मला भौतिक सृष्टीचा संचालक (अधिभूत), देवतांचा नियंत्रक (अधिदैव), सर्व यज्ञांचा अद्धिदाता भगवंत (अधियज्ञ) म्हणून जाणतात ते अंतसमयी पण मला जाणू शकतात".. ह्या वक्तव्यानं विचारात पडलेल्या अर्जुनाच्या प्रश्नानं "अक्षरब्रह्मयोग" ह्या अध्यायाची सुरुवात होते.. हा अध्याय मुख्यत्वेकरून, सर्वोच्च अविनाशी तत्व जे 'ब्रह्म', मूर्त आत्म्याचं अस्तित्व म्हणजे 'अध्यात्म', मनुष्याची उत्पत्ती आणि विकास ज्यावर अवलंबून असतो ते 'सकामकर्म' यावर भाष्य करतो.. मृत्युसाठीचा योग्य-अयोग्य काळ आणि त्याचा मुक्ती आणि पुनर्जन्म ह्याच्याशी असणारा संबंध सांगून ह्या अध्यायाची सांगता होते..    

'अधिभूत', 'अधिदैवत' ह्यांनी विचारात पडलेला अर्जुन प्रश्नांची शृंखलाच सुरु करतो.. ब्रह्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय? सकाम कर्म म्हणजे काय? अधिभूत कशाला म्हणतात? अधिदैवत कशाला म्हटले जाते? ह्या देहाचा अधिपती कोण? आणि तो ह्या देहामध्ये कसा निवास करतो? भक्तीमध्ये युक्त झालेले मृत्यूसमयी तुम्हाला कसं जाणू शकतात?.. 

श्रीभगवान म्हणतात,
अत्यंत श्रेष्ठ व अविनाशी दिव्य जीव म्हणजे *'ब्रह्म'.. आणि त्याचा स्वतःचा मूळ स्वभाव म्हणजे 'अध्यात्म'.. जीवाच्या प्राकृत देहाच्या उत्पत्तीस कारणीभूत कार्ये म्हणजे कर्म किंवा सकाम कर्म.. 

परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला - उत्पत्ती, विकास, स्थिती, प्रजनन, क्षय आणि विनाश ह्या स्थित्यंतरातून जाणाऱ्या प्रकृतीला 'अधिभूत' असे म्हणतात.. देवदेवता आणि ग्रहलोकांचा समावेश असणाऱ्या भगवंताच्या विराट रूपाच्या संकल्पनेला 'अधिदैवत' म्हणतात.. तर प्रत्येक देहामध्ये जीवात्म्याबरोबर उपस्थित असणाऱ्या, त्याच्या प्रत्येक क्रियांचा साक्षी असणाऱ्या, त्याच्या विविधभावनांचे उगमस्थान असणाऱ्या परमात्म्याला 'अधियज्ञ' म्हणतात..

आणि जो मरण समयी परमात्म्याचं स्मरण करीत देह सोडतो तो निःसंशय परमात्म्यात विलीन होतो.. आपल्या देहाचा त्याग करत असताना ज्या स्वरूपाचं, ज्या भावाचं स्मरण करतो त्याच स्वरूपाला तो जाऊन मिळतो.. म्हणून आपले मन विचलित होऊ न देता परमात्म्याच्या, भगवंताच्याठायी स्थिर करून जो निरंतर ध्यान करतो तो अंतसमयी सुद्धा भगवंत चिंतनात मग्न असतो आणि त्यामुळं निश्चितपणे तो भगवंतप्राप्ती करतो..  
म्हणून अर्जुना, भगवंताठायी मन बुद्धी अर्पण करून सदैव त्याचं स्मरण कर.. आपल्या युद्धरूपी स्वधर्माचं आचरण कर.. असं केल्यानं तुला नि:संदेह भगवंतप्राप्ती होईल..  

भगवंत चिंतन कसं करावं- ह्याची सुलभ पद्धत म्हणजे भगवंत निराकार किंवा शून्य नाहीत हे जाणून सूर्याप्रमाणे तेजस्वी, दिव्य अश्या परमपुरुष रूपामध्ये ध्यान करणं.. निराकार किंवा शून्यावर ध्यान करणं अतिशय कठीण.. म्हणून  सगुण रूपावर श्रद्धेनं भक्तिभावानं केलेलं ध्यान अधिक श्रेयदायी असतं.. 
माऊली म्हणतात, जे नानगतीने पावविते। ते चित्त वरील आत्मयातें। मग कवण आठवी देहातें। गेले की आहे।।.. म्हणजेच नानाठिकाणी असणारं चित्त आत्म्याच्या ठिकाणी स्थिर असेल तर देह असला काय अन नसला काय काहीच फरक पडत नाही.. ते सदैव आत्म्याच्याच ठिकाणी स्थिर राहतं.. अंतकाळी एकाग्र चित्तानं, भक्तिपूर्वक, योगसामर्थ्यानं आपला प्राण दोन भुवयांच्या मध्ये स्थिर करून जो भगवंताचं स्मरण करतो त्याला निश्चितच भगवंतप्राप्ती होते.. 

ब्रह्म जरी अद्वितीय असलं तरी त्याला विविध अभिव्यक्ती आणि रूपं असतात.. काहींसाठी ॐकार म्हणज़ेच ब्रह्म.. वैदिक संस्कृतीमध्ये विद्यार्थ्याला बालपणापासूनच ॐकाराचं उच्चारण आणि ब्रह्मचर्य व्रताचं पालन करून ब्रह्माचं ज्ञान प्राप्त करायला शिकवलं जायचं.. प्रत्याहार- इंद्रियविषय सुखांपासून परावृत्त होऊन, ज्ञानेंद्रियं पूर्णपणे संयमित करून मन अंतर्यामी परमात्म्यावर एकाग्र करून समाधिस्त व्हायला शिकवलं जायचं.. असं ॐकाराचं उच्चारण करत देहाचा त्याग केला असता *अध्यात्मिकलोकांची प्राप्ती होते.. ह्या मार्गाचं अनुकरण करणं तसं क्लिष्टच.. 
म्हणून अत्यंत सहज, उदात्त आणि आचरणास सुलभ असा भक्तिमार्ग श्रीभगवान इथं सांगतात.. विचलित न होता एकाग्रचित्तानं निरंतर भक्तीत रममाण होऊन परमात्म्याचं, भगवंताचं चिंतन केलं असता भगवंत प्राप्ती नक्कीच होते.. भगवंताची, परमात्म्याची प्राप्ती झाल्यावर भक्तियोगी दुःखाचं आगार असलेल्या ह्या अशाश्वत जगात कधीच परतून येत नाहीत.. प्राकृत जगतातल्या अत्युच्च ब्रह्मलोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत जन्म-मृत्यूचा फेरा अटळ आहे.. पण परमात्म्याची भगवंताची प्राप्ती झाल्यावर मात्र कधीच पुनर्जन्म नसतो.. 

प्राकृत विश्वात ब्रह्मदेव सुद्धा जन्म-मृत्यू, जरा-व्याधी यातून मुक्त नाहीत.. ब्रह्मलोक हा ब्रह्माण्डातील सर्वोच्च लोक असला तरी कालांतरानं ब्रह्मदेव आणि तिथं वास करणारे उन्नत संन्याशी भौतिक प्रकृतीच्या नियमानुसार मरणाधीन होतात.. परंतु ब्रह्मदेव ब्रह्माण्डाचं व्यवस्थापन करत भगवंतांच्या सेवेत संलग्न असल्यानं त्यांना तात्काळ मोक्षप्राप्ती होते..
मानवीय गणनेनुसार एकसहत्र *चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि अश्याच एक हजार एकसहत्र चतुर्युगाची एक रात्र असते.. ब्रह्मदेवाच्या दिवसारंभी अव्यक्तापासून सर्व चराचर उत्पन्न होतात आणि रात्र प्रारंभी त्याच अव्यक्तात ते लय पावतात.. पुनःपुन्हा जेव्हा ब्रह्मदेवाचा दिवस सुरु होतो तेव्हा सर्व जीव अस्तित्वात येतात आणि रात्र सुरु झाल्यावर आपोआप त्यांचा लय होतो.. 
ज्या अव्यक्तात ते जन्मतात आणि लय पावतात ती अव्यक्त प्रकृती जी ह्या भौतिकच्या पलीकडं आहे, सनातन आहे.. ती *परा आणि अविनाशी आहे.. संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी नष्ट होत नाही.. आणि हेच भगवंताचं परमात्म्याचं परमधाम.. जे परमलक्ष्य मानलं जातं.. ज्याची प्राप्ती झाल्यावर जन्म-मृत्यूच्या फेरा कायमचा सुटतो..

सर्वांहून श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अनन्य भक्तीनं होत असली तरी जीवात्मा आपला देह कोणत्या पद्धतीनं आणि केव्हा त्यागतो त्यावर ही त्याचा पुढचा प्रवास अवलंबून असतो.. तो परत भौतिक जगात येणार का नाही हे त्या 'वेळे'वर ठरतं.. वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधारमय असे ह्या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत.. प्रकाशमय मार्गातून प्रयाण झालं तर तो परत जन्म घेत नाही.. आणि अंधारमय मार्गातून प्रयाण झालं तर परत जन्म घेतो.. 
अग्नीचं सतेजपण असणारी दिवसाची वेळ, शुक्ल पक्षाचा पंधरवडा आणि उत्तरायणातील सहा महिन्यांचा काळ (१५ जानेवारी ते १५ जुलै) अश्यावेळी मृत्यू झाला तर परब्रह्माची प्राप्ती होते.. तर धुरकट प्रकाश, रात्रीची वेळ, कृष्णपक्ष, दक्षिणायनाचा सहा महिन्याचा काळ (१६ जुलै ते १४ जानेवारी) अश्यावेळी मरण आलं तर चंद्रलोकाची प्राप्ती होते.. चंद्रलोकांत जाऊन पुण्यांश संपल्यावर परत मृत्युलोकांत जन्माला येतो..

मृत्यूनंतरचा जीवात्माचा प्रवास ह्या दोन मार्गांनी होत असला तरी सकाम कर्म करत, भक्तीत रममाण होऊन, भगवंताच्या सेवेत सदैव युक्त राहिल्यास परमधमाची प्राप्ती होतेच.. त्यामुळे 'तू योगयुक्त हो.. भक्तीमध्ये युक्त हो' असा उपदेश अर्जुनाला करून श्रीभगवान अध्यायाची सांगता करतात.. 

नको गोंधळून जावू पार्था, सांगतो तुज ब्रह्माण्ड गुपित 

श्रेष्ठ अविनाशी जीव असतोब्रह्मअन अस्तित्वअध्यात्म 

शब्द, मन, शरीर, इंद्रिये हे जीवात्म्याचे अध्यात्म तू जाण 

अन सकाम कर्मे त्याची असती देहाच्या उत्पत्तीचे कारण ।।१।।


विनाशी अशी भौतिक प्रकृती म्हणती त्यासअधिभूत 

देवदेवता ग्रहलोक सामावता होते विराटअधिदैवत

अधियज्ञजो भावनासागर कर्मसाक्षी भगवंत   

देहामध्ये राहून करतो जीवात्म्यास सोबत ।।२।।


अर्पून मन-बुद्धी भगवंताठायी सदैव त्याचे स्मरण 

अंतकाळी नाम घेता होशील परमात्म्यात विलीन 

प्रयाणकाले स्मरण ज्याचे त्या स्वरूपा पावे 

करता प्राण स्थिर अंजचक्रे योग अन एकाग्रभावे ।।३।। 


ब्रह्म जरी अद्वितीय तरी अनेक अभिव्यक्ती रूप 

प्रत्येक रुपा संगे जोडला पुनः परतीचा लोक 

ब्रह्मदेवा सुद्धा नाही चुकला जन्म-मृत्यूचा फेरा 

पुनर्जन्म कधी धडे जाता निजधामी जीवात्मा ।।४।। 


अनंत भक्ती जरी होतसे प्राप्ती निजधामाची  

पुनर्जन्म का मोक्ष ठरवे वेळ देहत्यागाची 

अंधारातून प्रयाण म्हणजे जन्ममृत्यूचा फेरा 

अन प्रकाशातून जाते भगवंतप्राप्तीच्या द्वारा ।।५।।


जाणूनी हा 'अक्षरब्रह्मयोग' प्रभुमुखातून

पाहू परमात्मा स्वरूप, अंतसमयी जपता भगवंत नामस्मरणातून  

करुनी सेवा, सकाम कर्मे, भजन, कीर्तन अन सगुण ध्यानधारणा  

सुटतील जन्म-मरण फेरे, स्थिरबुद्धी भक्तिभावे करुनी स्वधर्माचरणा ।।६।।  

हरी  तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥

********************  


*ब्रह्म : वेदांमध्ये ब्रह्म म्हणजे जीवात्मा आणि परब्रह्म म्हणजे भगवंत असा भेद केला आहे.. जीवात्मा कधी कधी भौतिक प्रकृती अर्थात जडतत्व अर्थात अपरा प्रकृतीशी तादात्म्य करतो तर कधी तर कधी श्रेष्ठ परा प्रकृतीशी.. म्हणून जीवाला भगवंतांची तटस्था शक्ती म्हंटले आहे.. ह्या तादात्म्यानुसार त्याला भौतिक किंवा अध्यात्मिक देहाची प्राप्ती होते.. 

*अध्यात्मिक लोक : कृष्णभक्त कृष्णलोक-गोलोक-वृंदावन.. साकारवादी वैकुंठ लोक नामक असंख्य लोक.. निर्विशेषवादी ब्रह्मज्योती.. 

*चतुर्युग : सत्य, त्रेता, द्वापार आणि कली ही चार युगं मिळून चतुर्युग..


-मी मधुरा.. 

************************************************