Wednesday, August 29, 2018

अरुणोदय : रोजचीच सकाळ


नुकतीच भारतवारीहून परत आले... दोन महिन्याच्या आरामानंतर आज पासून हि रुटीन सुरु झाले... जेटलॅग, इमोशनल स्ट्रेस बरोबर रुटीन सेट करताना जरा जडच जाते... सकाळी उठल्यानंतरची शांतता आज प्रकर्षाने जाणवली.. आईकडची सकाळ, सासरची सकाळ आणि इकडची सकाळ.. सकाळ एकच पण किती विविधता..

मला सकाळ म्हटले कि 'गावातील सकाळ' आठवते.. गावातील प्रसन्न सकाळ... सडा रांगोळी, देवपूजा, आरती ह्याच्याशी सांगड घातलेली सकाळ... 'घनश्याम सुंदरा' गाण्यातील सकाळ.. केरवारा, सडा-रांगोळी, दळणकांडण, देवपूजा, धारा झाल्यावर चारण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्या गाई.. सगळे कसे लयीत... कसली गडबड नाही कि कसला गोंधळ नाही... अशी सकाळ मला अजुनी आकर्षित करते... लहानपण गावात गेल्याने असेल कदाचित... आता गावात हि अशी सकाळ पाहायला मिळणे कदाचित स्वप्नवत असेल...

प्रत्येक देशाची, प्रत्येक गावाची त्या त्या ऋतूची, प्रत्येक घराची एक सकाळ असते. ती तेथे राहूनच अनुभवावी लागते.

आई कडची सकाळ होते ती मोराच्या आवाजाने, पक्षांच्या किलबिलाटाने आकाशवाणीच्या साक्षीने.. सकाळी ५:५० पासून सुरु होणारे आकाशवाणी केंद्र रात्री झोपे पर्यंत सुरूच असते. अधून मधून प्रसारण केंद्रे बदलत राहतात इतकेच. आईकडच्या देवाच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिऊन होते. चहाचा हा नैवेद्य पारोशाने दाखवला तरी चालतो. पूजेसाठी लागणारी फुले काढणे, नैवेद्यसाठी, चहासाठी ताजे दूध तापवणे, पहिला चहा करणे, त्याच्या नैवेद्य दाखवणे हे काम बाबांचे असते. चहा झाला कि बाबा घरातील श्वानाला बरोबर घेऊन चालायला जातात. बाबांनी दार उघडले कि सकाळ कशी घरात येते. बाबा घरातून बाहेर पाडण्यापूवी सडा घालून जातात मग रांगोळी काढायचे काम मात्र आईचे असते. गुरुजी पूजेला येण्याआधी म्हणजे सकाळी ६च्या आधी सडा रांगोळी झालेली असते. मग आईची पूजेची तयारी सुरु असते, वाहिनीबाईची धावपळ तर विचारायलाच नको.. एकाबाजूला चहाचे आधण असते तर एका बाजूला सकाळच्या नाश्त्याची, डब्याची तयारी सुरू असते . त्यात कचरेवला, पेपरवाला दूधवाला यांची ये जा सुरूच असते. शाळेची तयारी सुरु झाली कि घर खडबडून जागे होते. आजूबाजूची वर्दळ हि तोवर वाढलेली असते.. शाळेच्या रिक्षा, बस याचे आवाज, मुलांचा आरडाओरडा, त्यांच्या तालावर नाचणारे पालक, चालायला जाणारे आजी आजोबा सगळे कसे वातावरणात भरून राहते. ह्यात माझी मात्र बघ्याची भूमिका असते. जर का लुडबुड केली तर त्यांचे रुटीन बदलेल हि भीती असते.

त्या मानाने सासूबाईंकडची सकाळ अगदी शांत! दोघेच दोघे असल्याने असेल कदाचित... ब्रह्मविद्या, प्राणायाम याने त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. बिल्डिंग मध्ये असणारी वर्दळ, वेगवेगळ्या वेळेला येणाऱ्या अनेक शाळांच्या बस, सकाळी फिरायला-चालायला जाणारे लोक, गेटमधून ऑफिस साठी बाहेर पडणाऱ्या गाड्या अशा एक ना अनेक गोष्टी चालू असतात. पण बाहेरच्या ह्या गडबडीचा त्यांच्या सकाळ वर काहीच फरक पडत नाही. वर्तमानपत्रा बरोबर सकाळचा चहा होतो. सगळे एकत्र असू तर गप्पाचा पहिला अड्डा पहिल्या चहालाच सुरु होतो. पोळ्या करायला येणाऱ्या, भांडी केर फरशी करायला येणाऱ्या मावशी यांची ये-जा चालू होते.

येथे पोर्टलंड मध्ये रोजची सकाळ खूपदा पक्षांच्या किलबिलाटाने होते. पण बिछान्यातून उठल्यावर पहिल्यांदा पडदा बाजूला करून आज कमी पाऊस का जास्ती पाऊस, आज किती आभाळ आहे हे पाहिले जाते. खरे तर इकडे म्हणायला चार ऋतू आहेत पण ह्यातील तीन ऋतूत कमी जास्ती प्रमाणात पाऊसच असतो. रोजचे डबे करणे, ब्रेकफास्ट करणे, सकाळचे आवरणे, ऋचाला शाळेत सोडणे, दिवसभराच्या कामांचा पाढा वाचणे हे सर्व इथल्या दिनचर्येचा भाग आहे. इथली सकाळ हि आमच्या तिघांपुरती मर्यादित आहे. कितीही गडगड असली तरी ती आमच्या तिघांची असते... आरडाओरडा चिडचिड झाली तरी ती आमच्या तिघांची असते.. सकाळ कशी हि असली तरी ती एकदा घर बाहेर पडले कि ती गुड मॉर्निंग मध्ये बदलते.

सूर्य तर सगळीकडेच उगवतो पण ह्या वेगवेगळ्या गोष्टी, एकमेकांशी जोडली गेलेली माणसे ह्या सगळ्यामुळेच प्रत्येक घराची सकाळ खास असते... नाही का?

-मी मधुरा...
२९ ऑगस्ट २०१८

No comments:

Post a Comment