अर्जुनानं युद्धस्थ व्हावं म्हणून श्रीभगवानांनी आत्तापर्यंत सृष्टीची उत्पत्ती, शरीर आणि आत्म्याचं स्वरूप, व्यक्तीचा स्वधर्म म्हणजेच *सांख्यबुद्धी ह्याबद्दल सांगितलं.. स्वधर्माचं पालन करताना कर्म कसं करावं, कर्मबंधनातून मुक्त कसं व्हावं हा मार्ग म्हणजेच कर्मयोग ते पुढं सांगतात..
हा मार्ग दृढनिश्चयी आणि एका ध्येयानं प्रेरित असा आहे.. ज्ञानी, विचारी कधी कधी वेदांतील अलंकारिक शब्दांवर आसक्त होऊन स्वर्गाप्रत जाण्यासाठी निरनिराळी *सकाम कर्मे करून चांगला जन्म, शक्ती मिळवून ऐश्वर्यशाली जीवन, इंद्रियतृप्तीची इच्छा करतात.. आणि असे जे इंद्रियतृप्ती आणि भौतिक ऐश्वर्यात आसक्त आहेत, मोहित आहेत ते दृढनिश्चयी होऊ शकत नाहीत..
ही सर्व *सकाम कर्मे, भौतिक कार्यें भौतिक प्रकृतीच्या तीन गुणांच्या क्रिया आणि प्रतिक्रियांमुळं घडतात.. भौतिक शरीराचं अस्तित्व जोपर्यंत आहे तो पर्यंत हे घडत राहणार.. पण सर्व भौतिक द्वंद्वातून मुक्त होऊन, लाभ-संरक्षण-काळजी ह्यातून मुक्त होऊन ह्या त्रिगुणांच्या पलीकडं स्थित होण्यासाठी श्रीभगवान कर्म कसं असावं हे सांगतात.. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भुर्मा ते संगोऽस्त्वकर्मणि॥.. म्हणजेच, फलाची अपेक्षा न करता, धर्म आणि कर्तव्य म्हणून कर्म करायचं.. यश-अपयश ह्याकडं समभावानं पाहून, यश-अपयशाचा विचार न करता कर्म करायचं.. आणि ह्या समभावालाच योग असं म्हणतात.. आणि असं योगयुक्त होऊन कर्म केल्यानं कर्मफलापासून मुक्ती मिळते.. जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन भौतिक सुखदुःखापलीकडील स्थानाची भगवद्धमाची प्राप्ती होते.. योगयुक्त कर्म केल्यानं बुद्धी-मन स्थिर होतं.. वेदांतील अलंकारिक भाषेनं ते विचलित होत नाही.. परिणामी आत्मसाक्षात्कारामध्ये स्थित होऊन दिव्य भावनेची प्राप्ती होते..
योगयुक्त कर्म करून ज्याची बुद्धी-मन स्थिर झालं आहे, जो समाधिस्थ झाला आहे त्याला काय म्हणतात? त्याची लक्षणं काय आहेत? तो वागतो बोलतो कसा? त्याला कसं ओळखावं? असे अनेक प्रश्न अर्जुनाला पडतात..
.. तर, ज्याची बुद्धी स्थिर आहे, इंद्रियतृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याग केल्यानं ज्याचं मन आत्मसंतुष्ट आहे त्याला 'स्थितप्रज्ञ' म्हणतात..
ज्याला आत्मशांतीसाठी दुसऱ्या कशावरच अवलंबून रहावं लागत नाही तोच आपल्या वासनांचा त्याग करू शकतो.. जो दुःखानं विचलित होत नाही, दुःखी होत नाही किंवा सुखानं हर्षोल्हासित होत नाही, सुखप्राप्तीसाठी झटत नाही.. जो काम, क्रोध, भय, मोह एकाच भावनेनं पाहतो त्याचीच बुद्धी स्थिर राहू शकते.. शुभ-अशुभ, चांगलं-वाईट कशाशीच त्याचं ममत्व नसतं.. तो नेहमी आत्मचिंतनात मग्न असतो.. असा स्थिरबुद्धी स्थितप्रज्ञ, कासव जसं त्याचे अवयव कवच्यात समेटून घेतं तसंच तो त्याची इंद्रियं सर्व विषयसुखांपासून अलिप्त ठेवून आपल्या इंद्रियांवर ताबा मिळवतो..
इंद्रियं इतकी प्रबळ आणि उच्छृंखल असतात कि त्यावर ताबा मिळवणाऱ्या मनाला बळजबरीनं खेचून नेतात.. मग विषयसुखांच्या आसक्तीमुळं काम उत्पन्न होतो आणि कामातून क्रोध.. क्रोधातून मूर्खपणा आणि मूर्खपणातून स्मृतिनाश.. स्मृतिनाशातून बुद्धिनाश आणि बुद्धिनाशातून सर्वनाश.. त्यामुळं इंद्रियांना पूर्णपणे वश करून त्यांचं संयमन करून मनाला दृढपणे स्थिर करावं लागतं.. मग हे स्थिर होणं भगवंताठायी, भगवंत सेवेमध्ये असेल किंवा कोणत्या कार्यांत.. मनाचं असं स्थिर होणं म्हणजे एकाग्रता.. स्थिर होऊन एकाग्रतेनं काही करणं म्हणजे समाधिस्थ होणं.. अशा प्रसन्न भावनेमध्ये भौतिक अस्तित्वाचे त्रिविध ताप नाहीसे होतात आणि बुद्धी स्थिर होते..
अशा स्थिरबुद्धी साधकानं ताब्यात ठेवलेल्या इंद्रियांनी विषयसुखांचा उपभोग घेतला तरी तो अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करतो.. कारण अश्या साधकाकडं इंद्रियतृप्तीची इच्छा-मोह, स्वामित्वाची भावना-मिथ्या अहंकार नसतो.. मी-माझं ह्यातील द्वंद्व त्यानं संपवलेलं असतं आणि असा साधकच वास्तविक शांती प्राप्त करू शकतो.. ह्या स्थितीला श्रीभगवान *'ब्राह्मी स्थिती' म्हणजेच 'आध्यत्मिक स्थिती' असं म्हणतात.. ब्राह्मी स्थिती प्राप्त झाली कि मोह संपतो.. जिवंतपणी मोक्षाचा अनुभव मिळतो आणि मृत्यूनंतर भगवदधाम म्हणजेच ब्रह्मत्वाची प्राप्ती होते..
.. आणि इथं दुसऱ्या अध्यायाची सांगता होते.. भगवदगीतेच्या तत्वज्ञानातील हा पहिला अध्याय असला तरी संपूर्ण गीतेचं सार सांगणारा आहे.. आत्मा, अंतरात्मा, परमार्थ, ब्रह्मत्व या बरोबरच कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग ह्यावर भाष्य करणारा आहे..
भावनिक गुंतागुंतीत गुरफटलेल्या अर्जुनाला जे तुझ्या हातात नाही, तुझ्या मर्यादेच्या पलीकडं आहे त्याचा विचार न करता तुझ्या नियंत्रणात जे आहे त्याचा विचार कर... म्हणणेच युद्धाच्या परिणामांचा विचार न करता कर्तव्य पालन कर.. स्वधर्माचे पालन करताना स्थितप्रज्ञाप्रमाणं भावनांवर अंकुश ठेव आणि ध्येयापर्यंत पोच.. हे सांगताना श्री भगवान शाश्वत सुखाचा मार्ग ही दाखवतात..
शाश्वत सुख हवं असेल तर शाश्वत आणि क्षणिक काय हे जाणलं पाहिजे.. 'सांख्य' तत्वानुसार दृश्य सृष्टी ही क्षणिक तर आत्मा शाश्वत असतो.. क्षणिक सृष्टीचा भाग असणारे आपण जोपर्यंत क्षणिकातून बाहेर येत नाही तोवर शाश्वत सुख मिळणार नाही.. क्षणिकातून बाहेर येणं म्हणजे क्षणिकांत गुंतवणारं सुख आणि दुःख ह्यातून बाहेर येणं.. सुख-दुःखातून बाहेर येणं म्हणजे ह्याकडं समभावानं पाहणं.. समभाव हवा असेल तर इंद्रियांवर संयम हवा.. इंद्रियावर संयम म्हणजे मनावर ताबा.. मनावर ताबा म्हणजे बुद्धीनं मनावर विजय मिळवणं.. आणि असा जो विजय मिळवतो तो स्थितप्रज्ञ..
असा स्थितप्रज्ञ शाश्वत सुखाच्या मार्गावर असतो कारण तो ते सुख बाहेर न पाहता स्वतःत पहातो.. म्हणून त्याला त्याच्या कर्माची फलं बाधत नाहीत.. सुखदुख:च्या पलीकडं जाऊन भगवंताशी एकरूप होणं त्याला जमतं.. आणि तो ब्रह्मत्वाला पोचतो..
अडकलो मी सख्या कोंडीत धर्म-अधर्माच्या
आर्जव तुज होऊन गुरु काढ बाहेर दुविधांच्या
असेन मी नपुंसक, नसेल वर्तन वीरा शोभनीय
धर्म-कर्मा मारणे आप्तेष्ट असे मज अकलनीय ।।१।।
पार्था, भाष्य जरी तुझे विद्वानाचे नसशी तू विद्वान
विद्वान खरा असे ज्याला शरीर आत्म्याचं ज्ञान
शरीर असे नाशवंत तर आत्मा चिरंतर
मारलेस तू कोणा जरी आत्मा असे अमर ।।२।।
बाल-तारुण्य-वृद्ध-मरण अशी शरीर स्थित्यंतर
मृत्यूनंतर करतो धारण आत्मा एक नवीन शरीर
आत्मा-आत्मतत्व अंतिम सत्य आहे जे शाश्वत
ह्या अविनाशी चैतन्याचा ध्यास धरती विचारवंत ।।३।।
करावे धर्म-कर्म पालन त्यागूनी कर्म फलांची आशा
पहावे यश-अपयश समभावे त्यजुनी इंद्रियतृप्तीची इच्छा
कर्मबंधने होशी मुक्त करता हे योगयुक्त धर्म-कर्माचरण
जन्म-मृत्यूचा टळून फेरा मिळते भगवदधाम निश्चित जाण ।।४।।
जाणूनी हा 'सांख्ययोग' प्रभुमुखातून
होऊ स्थितप्रज्ञ ठेवून स्थिरबुद्धी इंद्रिय संयमातून
मिळेल आत्मशांती संपता द्वंद्व शाश्वत अन क्षणिकाचे
होईल ब्रह्मत्व प्राप्ती पाहता अंतरी स्वरूप भगवंताचे ।।५।।
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
No comments:
Post a Comment