आजचा दिवस खूप शांत सुंदर गेला..
तळ्याकाठी बसून केलेल्या साधनेनं दिवसाची सुरुवात झाली.. आदल्यादिवशीच झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब अजुनी तळ्यांत होतंच.. तांबडं फुटताना पसरलेल्या लाल अभेत त्याचं हळूहळू नाहीस होणं हा एक अनुभव होता..
मंजू माझी लाडकी मैत्रीण, योगायोगानं फ्लोरीडाला आलेली असल्यानं तिच्या बरोबर कॉफी शॉपला जाऊन पोटभर गप्पा मारल्या.. संध्याकाळी ऋचाबरोबर बर्थडे ट्रेडीशन असलेलं चॉकलेट आईस्क्रिम खाल्लं.. (वरचा फोटो तिथलाच.. मला कूकी हा प्रकार अजिबात आवडत नाही म्हणून मुद्दाम काढलेला..)
ह्यावर्षी प्रकर्षानं जाणवलं ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचं कमी होणं.. जसं जशी सोशल मीडिया, व्हाट्स ऍप गृप पासून लांब होत गेले तसा हा वर्षाव कमी होत गेला.. ह्यावर्षी तर अगदी जवळची माणसं सुद्धा वाढदिवस विसरली.. अर्थात ह्याचं वाईट वाटण्यापेक्षा माणसाच्या स्वभावाची गंमत वाटली.. पूर्वी मला ह्या गोष्टींचा त्रास व्हायचा पण आता हसून सोडून देता येतंय.. दुनियादारी शिकायला अंमळ उशिरच झाला..
ह्यावर्षीनं मला सोडून द्यायला शिकवलं..
कुरुंदवाडचं घर.. माझा हृदयाच्या अगदी जवळचं.. ते घर पडून आता तिथं प्रशस्त सुंदर अपार्टमेंट झालंय..
२०२५ची दिवाळी कुरुंदवाडला नवीन वास्तूत साजरी करायची टूम निघाली.. आणि त्यानुसार सगळं नियोजन करणं सुरु झालं.. त्या अनुषंगानं मी माझी चारधाम यात्रा ठरवली..
पण काही कारणानं दिवाळी मात्र तिथं साजरी करता आली नाही.. आई-बाबा ह्या घरात राहायला येतील तेव्हा मी नसेन त्याचं खूप वाईट वाटलं..
नंतर पुढं जेव्हा घर पाहायचं म्हणून गेले तेव्हा खालच्या मजल्यावर लहान मुलांचा किलकिलाट, दंगा, हसणं ऐकलं तेव्हा माझे डोळे भरून आले.. माझ्या घराला परत श्वास मिळाले होते.. माझं घर जिवंत झालं होतं.. घर परत नांदायला लागलेलं पाहून त्याच क्षणी मी मुक्त झाले.. आई बाबा घरी राहायला येतील तेव्हा आता मला मी नसले तरी चालणार होते.. कारण मला जे हवं होतं ते मिळालं होतं.. त्या नंतर माझी त्या घर बद्दलची भावनिक गुंतवणूक, अटॅचमेंट संपली.. आपुलकी, आपलेपणा मात्र अजुनी आहे.. आणि तो कायम राहील..
२ मे २०२५.. गेल्या वर्षीचा वाढदिवस..
उगवतीच्या सूर्याच्या साक्षीनं एक नवीन उमेद आयुष्यात येताना दिसली..
तुटत चालेल्या नात्याच्या फांदीतून आशेचा दिसलेला तो एक नाजूकसा हिरवा कोंब!..
दिवसभर त्या कोवळ्या हिरव्यागार नाजूक कोंबाकडं पाहून आनंदानं नाचत होते.. प्रेमानं विश्वासानं जोपासायचं स्वप्नं उरी बाळगून बागडत होते..
..पण एक दिवस ही फांदी तुटलीच.. अपेक्षांचं ओझं इतकं झालं की तुटताना सोबत तो कोंब घेऊन तुटली.. विश्वासाचं प्रेमाचं केलेलं कलम फार काळ तग धरू शकलं नाही..
ठसठसणारी, भळभळणारी जखम.. ऊर्जेचं गमावणं.. अपूर्णतेची जाणीव..
खूप केविलवाणं, असहाय्य वाटलं त्यावेळी..
मीच का? प्रश्नापासून सकारात्मकता ते स्वीकारात्मकता पर्यंतचा हा प्रवास.. खूप शिकवणारा, धैर्याची परीक्षा घेणारा, प्रत्येकवेळी 'स्व' ची जाणीव करून देणारा..
संपलं असलं सगळं तुझ्यातलं माझ्यातलं
उरलं तरीही काही तुझ्यातलं माझ्यातलं
कळ काळजात अजुनी त्या तुटण्याची
त्या तुटण्यातलं मौन तुझ्यातलं माझ्यातलं
विखुरता सप्तरंग कळलं पहाट झाली
होत ते स्वप्न सुगंधी तुझ्यातलं माझ्यातलं
नको वळून पाहणं नको साद घालणं
हे ओसरणं जरुरी तुझ्यातलं माझ्यातलं
ह्या प्रवासात Your Soul's Plan आणि Your Soul's Gift पुस्तकांची ओळख झाली.. आणि माझा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोणच बदलला.. मी माझं आयुष्य केस-स्टडी म्हणून अभ्यासलं.. आणि मला माझी नव्यानंच ओळख होत गेली.. आधी स्वतःला आणि मग दुसऱ्याला, त्या वेळच्या परिस्थितीला माफ करायचा प्रयत्न करू लागले.. हे खूप सक्षम करणारं आहे..
सद्गुरूंची Inner Engineering, Death, Karma, Adiyogi ही पुस्तकं ही अभ्यासली.. ही सगळी अशी पुस्तकं आहेत की एकदा वाचून त्यातील विषय, आशय कळत नाही.. प्रत्येकवेळी नवीन काही तरी कळतं.. आयुष्य जाणण्याचं स्वतःचं मॅन्युअल, स्वतःची खास मार्गदर्शिका स्वतःच तयार करता.. आणि गरज पडेल तेव्हा त्यात बदल करण्याची मुभा ही ठेवता..
गेलं वर्ष जरी भावनिक दृष्टया आव्हानात्मक असलं तरी तितकंच समाधान देणारं होतं.. सेंट हेलन चढाई आणि चारधाम यात्रा ही ठळक वैशिष्ट!..
आता ह्यावर्षी काय करायचं हे अजुनी ठरलं नाहीय पण ऋषिकेश योगा रिट्रीट करावी असं वाटतंय.. हे वर्ष ऋचासाठी महत्वाचं असल्यानं तिला लागेल तसा सपोर्ट करत माझे प्लॅन्स ठरवेन..
अधिक महिन्यात एकनाथी भागवत वाचायचा मानस आहे.. विष्णुसहस्रनाम शिकायला सुरु केलं आहे..
स्वतःला शोधणं तर अखंड सुरु राहीलच..
-मी मधुरा..
************************************************