Monday, June 15, 2026

अध्याय १८ 'मोक्षसंन्यासयोग'


श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १८ 'मोक्षसंन्यासयोग'




श्रीमदभगवतगीतेचा हा शेवटचा अध्याय!!.. आत्तापर्यंत पाहिलेल्या, अभ्यासलेल्या सतरा अध्यायांचं हे सार.. 
माऊली म्हणतात, जसं दुरूनच मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं तरी गाभाऱ्यातील देवतेच्या दर्शनाचं फळ मिळतं तसंच हा 'मोक्षसंन्यासयोग' अध्याय वाचला असता सर्व गीताशास्त्र वाचल्याचं श्रेय मिळतं.. ते पुढं म्हणतात, वेद-उपनिषदं यांच्या पायाभरणीवर, धर्म-अर्थ-काम यांची भक्कम तटबंदी बांधून, कृष्णार्जुन संवादाचे आत्मज्ञानरूपी उत्तम चिरे वापरून, शास्त्रांच्या मदतीनं मोक्षरूपी मंदिराची उभारणी महर्षी व्यासांनी पहिल्या सोळा अध्यायांनी केली. सतरावा अध्याय ‘श्रद्धात्रयविभागयोग’ म्हणजे ह्या मोक्षसंन्यासरूपी कळसाची त्रिगुणी (सत्व-रज-तम) बैठकच होय.. हे सगळे अध्याय एकावर एक चढते थर असून त्यांची पूर्तता ह्या 'मोक्षसंन्यासयोग' अध्यायात होते.. 

श्रीमदभगवतगीतेच्या ७०० श्लोकांतून, त्रिकांडवेद (कर्म, उपासना व ज्ञान) असणारं हे गीताशास्त्र अर्जुनास सांगताना भगवान श्रीकृष्ण एकाच तत्वाचं वारंवार विवेचन करतात.. ते तत्व म्हणजे श्रद्धा/भक्ती..  
पहिल्या अध्यायांत अर्जुनाचा विषाद सांगून प्रवृत्तिशास्त्राचा विचार मांडला आहे तर दुसऱ्या अध्यायांत शास्त्रावर विश्वास ठेवायला सांगितले आहे.. गीताशास्त्र ज्ञानप्रधान असलं तरी कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा यांच्या एकरूपानं ते मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगते.. 
तिसऱ्या अध्यायात अज्ञानानं कर्मबंधनात अडकलेल्या साधनकांना त्या बंधापासून सोडून मोक्षपदावर आणणाऱ्या साधनांचा उल्लेख आहे.. देहाभिमान सोडून निषिद्ध कर्मे टाकून विहित कर्माचं आचरण केलं असता अज्ञानाचा नाश होतो आणि ही सर्व विहित कर्मे (कायिक,वाचिक व मानसिक) ब्रह्मार्पण बुद्धीनं केली असता मोक्षाचा मार्ग खुला होतो असं सांगितलं आहे.. तर परमात्म्याच्या ठायी कर्मयोगानं भजन कीर्तन करावं असं चौथ्या अध्यायात सांगितलं आहे.. 
थोडक्यात २-३-४ ह्या अध्यायांत कर्मकांडाविषयी भाष्य आहे तर ४ ते ११ ह्या अध्यायांत उपासनाकांडावर तर १२ ते १५ ह्या चार अध्यायांत ज्ञानफळ आणि त्याची सिद्धी म्हणजेच ज्ञानकांडावर भाष्य आहे.. 
अश्याप्रकारे त्रिकांडांचं निरूपण करणारी ही गीता एक गोजिरवाणी श्रुतीच आहे असं माऊली म्हणतात.. एवं सकल संख्यासिद्धू। भगवतगीता प्रबंधु। हा औदाचे आगळा वेदु। मूर्तु जाण।।.. ७०० श्लोकांच्या संख्येनं सिद्ध झालेला हा भगवतगीतेचा प्रबंध मूर्तिमंत वेद असून औदार्यानं वेदांपेक्षा ही श्रेष्ठ आहे.. 

अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानं होते.. 
सतराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीभगवान म्हणतात- अर्जुना, श्रद्धेशिवाय जी काही कर्मं - यज्ञ, दान, तपं - करशील ती सारी व्यर्थ आहेत.. सर्व कर्मं श्रद्धेनं परब्रह्माप्रित्यर्थ केली पाहिजेत.. श्रीभगवानांच्या ह्या व्यक्तव्यामुळं अर्जुन अधिकच गोंधळतो.. अज्ञानानं अंध अशी व्यक्ती कोणावर कसा विश्वास, कशी श्रद्धा ठेवू शकेल? रज, तम ह्या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय परमात्म्यावरील श्रद्धा खरी श्रद्धा असेल का? कर्मं जन्ममरणास कारणीभूत असतात - ती यथासांग केली तर मोक्ष नाहीतर जन्ममृत्यूच्या फेरा- असं असेल तर कर्मसंन्यास का नको? कर्माशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष... मग कर्मसंन्यास आणि कर्मत्याग ह्यात नक्की काय फरक आहे? ह्या सगळ्या प्रश्नांनी गोधळलेला अर्जुन श्रीभगवानांना विचारतो, "हे महाबाहो, हे हृषीकेश, मी कर्म-संन्यास आणि कर्म-त्याग यांचं तत्व वेगवेगळं जाणू इच्छितो.. कृपा करून ते मला सांगा"..  

श्रीभगवान उवाच.. 
कर्म-संन्यास आणि कर्म-त्याग ह्या दोन्ही शब्दांनी त्यागाचा निर्देश होत असला तरी गूढार्थानं ते वेगळे आहेत.. काम्य कर्माच्या, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला, सर्वार्थानं कर्म सोडण्याला 'कर्म-संन्यास' असं म्हणतात.. तर कर्म कर्तृत्वाचा अभिमान व कर्म फल यांच्या त्यागाला 'कर्म-त्याग' असं म्हणतात.. परंतु कर्मफलाची आशा, कर्मफल आसक्ती सुटत नाही म्हणून कर्माला दोषयुक्त मानून कित्येक विचारवंत कर्माचा त्याग करावा असं सांगतात.. तर काही विचारवंत यज्ञ-दान-तपरूप कर्मांनी  चित्तशुद्धी होते म्हणून त्यांचा त्याग करू नये असं ही सांगतात.. 

त्यागांविषयी जरी मतभेद असले तरी ही कर्मे कर्तेपणाचा अभिमान व कर्मफलांचा त्याग करून कर्तव्य बुद्धीनं अवश्य केली पाहिजेत.. मनुष्याची जीवनात आणि त्याच्या अध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी ह्यासाठी अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत.. मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञ-दान-तप स्वरूपाच्या कर्मांचा कधीही त्याग करू नये.. यज्ञामुळं मन संयमित होतं, दानामुळं हृदयाचं शुद्धीकरण होतं तर तपामुळं आत्म्याचं शुद्धीकरण होतं.. त्यामुळं नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करणं योग्य नाही. 

सात्विक, राजस आणि तामस ह्या तीन प्रकृती गुणांच्या भेदांमुळं शास्त्रांमध्ये कर्म त्याग तीन प्रकारचे सांगितले आहेत.. 
अज्ञानानं किंवा मोहवश होऊन केलेल्या कर्म-त्यागाला 'तामस त्याग' असं म्हणतात.. 
जे कर्म दुःखरूप आहे, क्लेशकारक आहे असं समजून शारीरिक त्रासाच्या भीतीनं केलेल्या कर्म-त्यागाला 'राजस त्याग' असं म्हणतात. अश्या त्यागाचं कोणतंही फल मिळत नाही.. असा त्याग उन्नतीच्या दिशेनं नेत नाही..
कर्तव्य भावनेनं, आसक्ती सोडून, कर्तेपणाचा अभिमान टाकून, फलाची अपेक्षा न करता केलेल्या त्यागाला 'सात्विक त्याग' असं म्हणतात.. सत्वगुणांत स्थित बुद्धिमान त्यागीस कर्माविषयी काहीच संशय नसतो.. तो अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही किंवा शुभ कर्मांत आसक्त राहत नाही..

देह कर्मरूप असल्यानं कोणत्याही देहधारी जीवाला कर्माचा त्याग करणं शक्य नाही.. 'श्वासोच्छवास करणं' हे सुद्धा एक कर्मच!.. परंतु जो कर्मफलांचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय.. कर्मफलांचा त्याग न करणाऱ्यांना अनुकूल, प्रतिकूल, मिश्र अशी तीन प्रकारची कर्मफलं प्राप्त होतात.. परंतु कर्मफलांचा त्याग करणाऱ्यांना असं कोणतेही फल मिळत नाही.. कर्मफलांचं सुखदुःख भोगावं लागत नाही..

सांख्यशास्त्रात, वेदांतात कर्मांच्या सिद्धीची पाच कारणं सांगितली आहेत.. १. कर्म पूर्ण करण्यासाठी अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर, २. कर्ता म्हणजे जीव, ३. विभिन्न इंद्रियं म्हणजे कर्माचं साधन, ४. अनेक प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या क्रिया आणि ५. दैव.. मनुष्य मन, वाणी आणि शरीरानं जे काही कर्म करतो ते ह्या पाच कारणांमुळं घडत असतं.. परंतु जो ह्या पाच कारणांचा विचार न करता 'आत्माच कर्ता आहे' असं समजतो असा अज्ञानी मूर्ख जाणावा.. परंतु ज्याच्या अंतःकरणात 'मी कर्ता आहे' असा मिथ्या अभिमान नाही आणि ज्याची बुद्धी कर्माच्या बंधनात बद्ध नाही त्यानं सर्व प्राण्यांचा वध केला तरी तो मारेकरी होत नाही, त्या वधांच्या दोषांनी बद्ध होत नाही.. युद्धांत सैनिकाला शत्रूहत्येचं पाप लागत नाही.. कारण त्याची बुद्धी कर्माच्या बंधनात बद्ध नाही.. तो त्याचं फक्त कर्म करत असतो.. पण त्याच सैनिकानं स्वच्छेनं, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची हत्या केली तर ते निश्चितंच पाप होय.. 

दैनंदिन कर्म करण्यासाठी ज्ञान, ज्ञेय (विषयसुख) आणि ज्ञाता (जीव) प्रेरक असतात तर कर्म संचयासाठी इंद्रियं (कर्म काण्याची साधनं), कर्मं (व्यवहार) आणि कर्ता (जीव) कारण असतात.. कर्म करण्यापूर्वी काही तरी प्रेरणा असते.. ते घडण्यापूर्वीचा विचार असतो.. आणि त्यानंतर कर्माचं रूपांतर क्रियेत होतं.. ज्ञाता (जीव) आणि ज्ञेय (विषयसुख) ह्यांच्यातील ही क्रिया, हा व्यवहार ज्ञानामार्फत होतो.. विषयांच्या इच्छेनं ज्ञाता (जीव) इंद्रियांचे लाड पुरवतो म्हणून त्याचा 'कर्ता' होतो.. आणि आता हा ज्ञाता (जीव) कर्ता बनून ज्ञानाच्या साह्यानं ज्ञेय (विषयसुख) साध्य करतो आणि ज्ञेयाचं 'कर्म' (व्यवहार) होते.. तहान (इंद्रिय) लागली असता पाणी प्यायल्यानं (ज्ञान) तहान भागेल हे जीवाला (ज्ञाता) कळतं.. आणि पाणी पिण्याचं कर्म, क्रिया (व्यवहार) कर्ता (जीव) कडून घडतं.. 

प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म, कर्ता यांचे तीन प्रकार आहेत.. माऊली म्हणतात, एवं सत्व रजतमा। तिहींची एवढी असे महिमा। जे त्रैविध्य आदी ब्रह्मा। अंती कृमी।। - म्हणजेच, सत्व, रज, तम ह्या तीन गुणाचं एवढं सामर्थ्य आहे कि त्यांनी ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्व जीवांचे तीन भेद केले आहेत.. 
जे ज्ञान प्रत्येकांत मग तो देवता, पशु, पक्षी, जलचर, वनस्पती असो सर्वांमध्ये एकंच आत्मतत्व पाहतं ते 'सात्विक ज्ञान' होय.. जे ज्ञान प्रत्येकांत, विभिन्न शरीरांत विभिन्न जीव, विभिन्न आत्मतत्व पाहतं ते 'राजस ज्ञान' होय.. आणि जे कार्यरूपी शरीरातच आसक्त असतं, जे शरीरापलीकडं पाहतच नाही, जे तात्विक अर्थानं अल्पकाळ टिकणारं, तुच्छ असतं  ते 'तामस ज्ञान' होय.. 
ह्या तीन ज्ञानाच्या अनुरोधानं तीन प्रकारची कर्मे घडतात.. शास्त्राविधीनं नेमून दिलेलं कर्म कर्तेपणाचा अभिमान न बाळगता, फलाची इच्छा न करता, रागद्वेष सोडून केलेलं  असतं ते 'सात्विक कर्म' होय.. परंतु जे कर्म फलांची इच्छा धरून, अहंकारपूर्वक व पुष्कळ प्रयासानं केलं जातं ते 'राजस कर्म' होय.. परिणाम, हानी, हिंसा आणि आपले सामर्थ्य ह्याचा विचार न करता केवळ अज्ञानानं केलेलं कर्म हे 'तामस कर्म' होय..  
जो अनासक्त, मी-माझं न म्हंणणारा, धर्माचं पालन करणारा, यशापयशामुळं विचलित न होणारा, निश्चयी, उत्साही असतो तो 'सात्विक कर्ता' होय.. विषयासक्त, फलाची इच्छा करणारा, लोभी, घातकी, अशुद्ध आचरणाचा, हर्ष-शोकांनी युक्त असतो तो 'राजस कर्ता' होय.. इंद्रियासक्त, मूर्ख, उन्मत्त, कपटी, पारोत्कर्ष सहन न करणारा, आळशी, दुर्मुख व चेंगट असा तो 'तामस कर्ता' होय.. 

प्रकृतीच्या गुणांचा हा भेद बुद्धी आणि निश्चय यांच्यातही आहे..
जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग (कर्ममार्ग) आणि निवृत्तिमार्ग (संन्यासमार्ग), कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यांना यथार्थपणे जाणते ती 'सात्त्विक बुद्धी' होय.. आणि जी बुद्धी धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीनं जाणत नाही ती 'राजसी बुद्धी' होय.. तमोगुणानं व्यापलेली बुद्धी धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म मानते, नेहमी विपरीत मार्गानं कर्म करते.. 
याच बुद्धीचा कर्म करण्यासाठी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला धृती असं म्हणतात.. जो निश्चय अचल आहे, जो योगसाधनेद्वारा मन, प्राण, इंद्रियं यांच्या क्रियांना संयमित करतो तो 'सात्विक निश्चय' होय.. जो निश्चय धर्म, अर्थ, काम करताना फलाची अपेक्षा ठेवतो तो 'राजस निश्चय' होय.. जो निश्चय झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणा सोडत नाही तो 'तापसी निश्चय' होय.. 

योग्य कर्म आणि ते कर्म करण्याची साधनं बुद्धी उत्पन्न करते.. पण हे कर्म पूर्ण करण्यास धृतीची अनुकूलता लागते.. केलेल्या कर्मांच्या चांगल्या फलांना 'सुख' असं म्हणतात.. आणि ही सुखं ही तीन प्रकारची असतात.. 
ज्या सुखांत साधक भजन, ध्यान आणि सेवा यांत रमतो, ज्यामुळं त्याचं दुःख नाहीसं होतं, जे आरंभी जरी विषासारखं वाटलं तरी परिणामी अमृततुल्य असतं आणि जे आत्मसाक्षात्काराची जागृती करतं ते सात्विक सुख होय.. थोडक्यात, ज्या सुखाचं वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम असतो ते सात्विक सुख.. 
इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानं उत्पन्न होणारं सुख जे आरंभी अमृतासारखं गोड भासलं तरी परिणामी विषासमान असतं ते राजसिक सुख होय.. 
जे सुख आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं आणि जे निद्रा, आळस व प्रमादापासून उत्पन्न झालेलं असतं ते तामसिक सुख होय.. 

पुढं भगवंत संपूर्ण विश्वावर असणारा प्रकृतीच्या ह्या तीन गुणांचा प्रभाव सांगतात..
प्रकृतीच्या ह्या तीन गुणांनी बद्ध नाही अशी कोणतेही वस्तू ह्या लोकी किंवा स्वर्गलोकी नाही.. ह्या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे कि तिनं एका देवाचे तीन देव आणि एका लोकाचे तीन लोक (स्वर्ग, मृत्यू, पाताळ) केले तर मनुष्याचे चार वर्ण आणि त्यांची निरनिराळी कर्मे ही निर्माण केली.. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची स्वाभाविक गुणांनुसार निरनिराळी कर्मे केली गेली.. 
आत्म्याची जी प्रवृत्ती, तिच्या गुणांनी चार वर्णांना कर्मे वाटून दिली असली तरी वेदाचा अधिकार ब्राह्मणांना असल्यानं ह्यात अग्रेसर मानले गेले.. क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण वैदिक धर्मकांड करण्याचा अधिकारी असल्यानं उच्चस्तर राहिले.. चौथा वर्ण शूद्र, त्याला वेदाचा अधिकार नाही म्हणून त्याच्यापाशी असणारी सेवावृत्ती बाकी तीन वर्णांच्या अधीन राहिली.. 

शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.. तर शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.. 
शेती, गोपालन आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभावजन्य कर्म तर श्रम, इतरांची सेवा करणं हे शूद्रांचं.. 
आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्यास परमसिद्धीचा लाभ मिळतो.. जे भगवंत सर्व जीवांचे उगमस्थान आहेत, ज्यांनी आपल्या बहिरंगा आणि अंतरंगा शक्तीद्वारे संपूर्ण सृष्टी व्यापली आहे त्या भगवंतांची, परमात्म्याची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करुन मनुष्य परमसिद्धीस प्राप्त होतो.. स्वतःचा धर्म आचरणास कठीण असला तरी आणि दुसऱ्याचा धर्म आचरणास कितीही सोपा असला तरी, आपला धर्म श्रेष्ठ मानून, नेमून दिलेलं स्वधर्मरूपी कर्म करणाऱ्याला पाप लागत नाही.. म्हणूनच सदोष असलं तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये..  

आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह असा जितेंद्रिय (इंद्रियांवर विजय मिळवलेला) त्याच्या संन्यस्थवृत्तीनं कर्मबंधनातून मुक्त होऊन ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो.. ज्यानं ह्या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिध्द अवस्था म्हणजेच ब्रह्मावस्था प्राप्त करतो.. अश्या योग्याची लक्षणं सांगताना श्रीभगवान म्हणतात.. 
विशुद्ध बुद्धीनं युक्त, हलका-सात्त्विक-नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करुन एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्त्विक धारणाशक्तीनं अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन-वाणी-शरीर ताब्यात ठेवणारा, राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करुन दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार-बळ-घमेंड-कामना-राग-संग्रहवृत्ती यांचा त्याग करुन नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा मनुष्य ब्रह्मरूप होण्यास पात्र होतो.. असा हा ब्रह्मरूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही.. सर्व प्राण्यांच्या ठायी समभाव बाळगणारा असा हा योगी पराभक्तीला प्राप्त होतो.. त्या पराभक्तीच्या योगानं तो परमात्म्याला तो जसा आहे तसाच तत्त्वतः जाणतो आणि परमात्म्यात विलीन होतो.. 
थोडक्यात, परमात्म्याशी अनन्यभाव ठेवून, सर्व कर्मे त्याला अर्पण करून, समबुद्धिरूप योगाच्या अवलंब करणारा कर्मयोगी परमेश्वर कृपेनं शाश्वत अविनाशी अशा पदाला प्राप्त होतो.. 

अश्याप्रकारे माझ्या ठिकाणी (परमात्म्याठायी) चित्त ठेवल्यानं तू सर्व संकटातून सहजच पार होशील.. आणि जर अहंकारामुळं माझं सांगणं टाळशील तर तू नाश पावशील अर्थात परमार्थाला मुकशील.. 'मी युद्ध करणार नाही' हा तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा क्षत्रिय स्वभाव तुला जबरदस्तीनं युद्ध करायला प्रवृत्त करेल.. जे कर्म तू आप्तांच्या मोहामुळं करु इच्छित नाहीस ते तू पूर्वकृत स्वाभाविक कर्मानं बद्ध असल्यानं नक्कीच करशील.. हे अर्जुना, शरीररुपी यंत्रावर आरुढ झालेल्या सर्व प्राण्यांच्या हृदयांत वास करून योगमायेच्या साह्यानं त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार अंतर्यामी परमेश्वर सूत्रं हलवत असतो.. त्यामुळं पूर्णपणे त्या अंतर्यामी परमेश्वराला शरण जा.. त्या परमात्म्याच्या कृपेनंच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल..

एवढं सगळं गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान सांगून झाल्यावर, युद्धाचा निर्णय श्रीभगवान अर्जुनावर सोपवतात.. 
.. आणि म्हणतात, तू माझा अत्यंत प्रिय सखा असल्यामुळं मी तुला सर्व ज्ञानातील अत्याधिक गुह्यतर असं परमश्रेष्ठ वचन परत एकदा सांगतो जे तुझ्या हितार्थ आहे.. हे अर्जुना, तू माझं चिंतन कर.. माझा भक्त हो.. माझे पूजन कर.. आणि मलाच नमस्कार कर.. असं केलं असता तू मलाच येऊन मिळशील.. सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करुन तू सर्व शक्तिमान अशा मला परमेश्वराला शरण ये.. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन.. तू भयभीत होऊ नकोस.. आणि हे ज्ञान त्यांनाच सांग ज्यांची माझ्यावर श्रद्धा आहे.. हे परमगुह्य गीताशास्त्र जो माझ्या भक्तांना सांगेल तो मला प्रिय असेल.. आणि जो कोणी ह्या पवित्र संवादाचं अध्ययन करेल तो आपल्या बुद्धीद्वारे माझं पूजनच करेल.. 

पुढं श्रीभगवान अर्जुनाला त्यानं हे गीताशास्त्र एकाग्रचित्तानं ऐकलं आहे का? आणि अज्ञानातून उत्पन्न झालेला त्याचा मोह नाहीसा झाला का? असं विचारतात.. 
श्रीभगवानांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणतो, "हे अच्युता, आपल्या कृपेनं माझा मोह नाहीसा झाला आहे.. मला माझ्या खऱ्या स्वरूपाची स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे.. आता मी संशयरहित झालो आहे.. आणि मी आपल्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे.."

रूढार्थानं श्रीकृष्णार्जुन संवाद इथं संपला.. गीताशास्त्राची सांगता झाली..
माऊली म्हणतात.. यया अर्जुनाचिया बोला। देखे नाचे सुखे भुलला। म्हणे विश्वफळा जाला। फळ हा मज।।.. अर्जुनाचा होकार ऐकून भगवान सुखानं अतिहर्ष पावून प्रेमानं  नाचू लागले आणि म्हणाले 'या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एकच फळ उत्पन्न झालं'.. 

हा श्रीकृष्णार्जुन संवाद संपल्यावर संजय महाराज धृतराष्ट्रांना म्हणाला, "अशाप्रकारे मी श्रीवासुदेव आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला.. श्रीव्यासांच्या कृपेनं, दिव्य दृष्टी मिळवून, मी हे परम गोपनीय ज्ञान योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असताना प्रत्यक्ष ऐकले.. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे.. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रुपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्र्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे.. आणि... जिथं योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, गांडीव धनुष्य धारण करणारा त्यांचा परमभक्त अर्जुन आहे, तिथंच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती आहे असं मला वाटतं..".. ह्या संजयाच्या वचनानं अध्यायाची सांगता होते.. 

म्हणे पार्थ, हे अच्युता 
चिरंतर सत्य उमजले मजला 
नष्ट होऊनी अज्ञान मोह माया 
स्मृतिप्रकाशे विषाद हा संपला 


हरी तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥




-मी मधुरा.. 

************************************************



Tuesday, May 19, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्लोक ३१ ते ३८




दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा।
पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्॥३१॥

दक्षिणे : उजवी बाजू       वामे : डावी बाजू 
पुरतो : पुढं 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-  
ज्यांच्या उजव्या बाजूस लक्ष्मण आहे, डाव्या बाजूस राजा जनककन्या (सीता) आहे..
पुढं मारुती आहे अशा रघुनंदनाला मी वंदन करतो..

विवरण-     
दक्षिणे लक्ष्मणो यस्य - याबद्दल एक कथा सांगितली जाते.. 
रामसीतेच्या विवाहाच्या आदल्या दिवशीची रात्र.. नेहमीप्रमाणं रामाची चरणसेवा करत असताना लक्ष्मणाच्या डोळ्यांतील अश्रू रामाच्या चरणावर पडले..
त्यावेळी रामांनी त्याला त्याच्या अश्रूंचं कारण विचारलं.. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, सीतेबरोबर आपला विवाह होईल, विवाह झाल्यावर ती आपली चरणसेवा करेल.. आणि मला ती करता येणार नाही म्हणून वाईट वाटत आहे.. आपली सेवा करणं हा माझा धर्म आहे.. 
त्यावर राम म्हणाले, असं झालंच तर मी चरण सेवा वाटून देईन.. उजव्या पायाची चरण सेवा तुझी आणि डाव्या पायाची चरण सेवा सीतेची.. 
म्हणून 'दक्षिणे लक्ष्मणो यस्य'.. 


लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम्।
               कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये॥३२॥              

लोकाभिरामं : लोक + अभिरामं(आकर्षक, आनंद देणारा)       रणरङ्गधीरं : रण(युद्ध) + रंग(क्षेत्र) + धीरं(धैर्यवान)    
राजीवनेत्रं : कमळाप्रमाणे नेत्र 
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
लोकांना आनंद देणाऱ्या (प्रेम करणारा), रणांगणांत धैर्य धरणाऱ्या (धीराने तोंड देणाऱ्या), कमळासारखे डोळे असणाऱ्या, रघुवंशाचा अधिपती.. 
कारुण्याची मूर्ति असलेल्या, करुणासागर श्रीरामचंद्राला मी शरण आलो आहे..

विवरण-       
रणरङ्गधीरं याचा खूप सुंदर प्रसंग रामायणांत राम-रावण युद्धप्रसंगी रामचरितमानस मध्ये वर्णिला आहे.. 
रावण रथावर आणि श्रीराम रथाशिवाय असं पाहून विभीषण बेचैन होतो.. त्याच्या मनांत शंका येते कि रथाशिवाय श्रीराम रावणावर विजय कसा प्राप्त करू शकतील? त्यावेळी श्रीराम बिभीषणास उपदेश करतात.. त्या उपदेशाला बिभीषण गीता किंवा धर्मरथ असं म्हंटलं जातं..
श्रीराम म्हणतात.. 
योद्ध्याचा रथ हा खरं तर धर्मरथ असतो.. रथाची दोन चाक ही शौर्य आणि धैर्य, रथाची ध्वजपताका योध्याचं सत्यशील, बल-विवेक-दम-परहित हे रथाचे चार घोडे तर क्षमा,कृपा, समता हे लगाम आणि ईश्वरभक्ती हा सारथी.. वैराग्य ढाल, संतोष तलवार, दान परशू, विज्ञान धनुष्य निर्मळ मन भाता तर शम,यम,नियम हे बाण, गुरुपूजा कवच आणि बुद्धी ही शक्ती असते.. 


मारुती स्तुती..
         
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठम्। 
वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये॥३३॥

मनोजवं  : मन + जवं(वेग,गती)    मारुततुल्यवेगं : मारुत(वारा) + तुल्य(सारखा) + वेगं(वेग)   जितेन्द्रियं : इंद्रियांवर विजय 
वातात्मजं : वात(वारा,पवन) + आत्मज(पुत्र)
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
मनाच्या वेगानं आवागमन करणाऱ्या, वाऱ्याप्रमाणं वेगवान, इंद्रियांवर विजय मिळविलेल्या, बुद्धिमंतांत श्रेष्ठ..
पवनपुत्र, वनरसेनेचा मुख्य असलेल्या श्रीरामदूताला मी शरण आलो आहे..

 
वाल्मिकी वंदना..             

कूजन्तं रामरामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरुह्य कविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्॥३४॥

आरुह्य : चढणं, बसणं, आरूढ होणं 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन..
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..
म्हणजेच, 
कवितेच्या (काव्यछंदांच्या) फांदीवर बसून राम राम अशा मधुरात मधुर अक्षरांचं कूजन करणाऱ्या वाल्मिकीरूपी कोकिळाला मी वंदन करतो..

विवरण-
वाल्याचा वाल्मिकी कसा झाला ही कथा आपल्याला माहिती आहेच..
वाल्याचा वाल्मिकी झाल्यावर मुनिवर्य वाल्मिकी आश्रमात राहू लागले.. वल्कलं धारण केली.. कंदमूळं खाऊ लागले.. मृगजिनावर तप करू लागले..
एके दिवशी तामसा नदीच्या प्रशांत तीरावर, एका उंच वृक्षावर क्रौंञ्च पक्षाचं एक जोडपं त्यांना क्रीडा करत असल्याचं दिसलं.. इतक्यात एका निषादाचा विषारी बाण पक्षाला  लागला.. पक्षीण विरहानं व्याकूळ झाली.. तिचं आक्रंदन ऐकून मुनिवर्य वाल्मीकींचं हृदय कारुण्यानं भरून आलं..  
त्यांनी छंदोमय शाप वाणी उच्चारली..
मा निषाद प्रतिष्ठा
त्वमगमःशाश्वती समः
यत् क्रौञ्च मिथुनादेकमवधीः 
काम मोहितम् '
हे निषादा! क्रीडा करीत असलेल्या पक्षाच्या जोडीतून तू एका पक्षाचा वध केला आहेस म्हणून तुला हजारो वर्ष या जगात प्रतिष्ठा मिळणार नाही..
नकळत निघालेल्या ह्या शापवाणीचं वाल्मिकींना वाईट वाटलं.. 
आश्रमात आल्यानंतर त्यांनी ब्रह्मदेवाचं ध्यान केलं.. त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले, हे कवी कोकीळ वाणीच्या वीणा झंकारात श्रीराम चरित्राचं छंदोबद्ध गायन करण्यास प्रारंभ करा.. 'आदिकवी' म्हणून तुमचा गौरव होईल.. म्हणून वाल्मीकिकोकिलम्..



आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदाम्।
लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्॥३५॥

आपदामपहर्तारम्  : आपदाम् (आपत्ती, संकटं) + अपहर्तारम् (विनाश करणं)              दातारं : देणारा, दाता 
लोकाभिरामं : लोक अभिरामं : लोकांना आकर्षित करणारा, आनंद देणारा 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
आपत्ती हरणाऱ्या (आपत्तीचा विनाश करणाऱ्या), सर्व संपदा (संपत्ती, संतती, स्थावर, बुद्धी, वैभव इत्यादी) देणाऱ्या 
लोकांना आनंद देणाऱ्या प्रभू श्रीरामांना मी पुनः पुनः नमस्कार करतो..

**असं म्हटलं जात कि, 'आपदंपहारहाराराम दाताराम सर्वसंपदाम' पठण केल्यानं एखादी व्यक्ती आपली सर्व कर्जे मिटवू शकेल..



भर्जनं भवबीजानामर्जनं सुखसंपदाम्।
                 तर्जनं यमदूतानां रामरामेति गर्जनम्॥३६॥                

भर्जनम् : भाजणं     भवबीजानामर्जनं : भवबीजानाम् (कर्मबीजं)+ अर्जनम् (प्राप्त करणं)
तर्जनं : धमकावणं     गर्जनम् : गर्जना करणं 
*अनुष्ठूप छंद
  
अर्थ-
(संसारवृक्षाची) कर्मबीजं जाळून टाकण्यासाठी सुखसमृद्धी मिळवण्यासाठी 
यमदूतांना घाबरवण्यासाठी राम राम अशी गर्जना (जप) करावी 

विवरण- 
बीज भाजल्यानंतर जसा त्यातून अंकूर फुटत नाही तसंच राम नामाचा जप केल्यानं संसाररुपी कर्मबीजं भाजून निघतात आणि जन्म मृत्युचे फेरे नष्ट होतात..
माऊली म्हणतात,                
मग अग्निकुंडीं बीजे घातलीं 
तियें अकुरदशे जेविं मुकलीं 
तेविं न फळतीचि मज अर्पिलीं  
शुभाशुभें   (ज्ञाने - ९-४०२)
म्हणजेच, मग अग्निकुंडात बीजे घातली, ती अंकुराच्या अवस्थेला जशी मुकली, तशी मला अर्पण केलेली कर्मे चांगली किंवा वाईट फळ देत नाहीत..


रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे।
रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः।
रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्म्यहम्।
              रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर॥३७॥             

राजमणिः : श्रेष्ठ राजा     रमेशं : रमेचा ईश 
रामेणाभिहता : रामेण (रामाकडून) + अभिहता (ठार मारलेला)   निशाचरचमु :  निशाचर (राक्षस) + चमु (सेना) 
चित्तलय: : चित्त + लय (विलीन होणं , नष्ट होणं)    मामुद्धर : माम (माझा) + उद्धार 
*शार्दूलविक्रीडित छंद
      

अर्थ- 
राजांमध्ये श्रेष्ठ रामाचा सदा विजय होतो.. रमेशाला म्हणजेच रमेचा (इथं सीता) पती(विष्णू) रामाला भजतो.. 
असुरांच्या समुदायाला नष्ट करणाऱ्या रामाला मी नमस्कार करतो..
रामापेक्षा अधिक कुशल कोणी नाही.. मी रामाचा दास आहे..
रामामध्ये माझ्या चित्तवृत्तीचा लय होवो.. हे राम माझा उद्धार कर..

विवरण- 
या श्लोकात राम शब्दाच्या सातही विभक्ति वापरलेल्या आहेत..
राम एकपत्नि, एक वचनी, एक बाणी म्हणून ह्या श्लोकांत रामाच्या एक वचनी विभक्तिची सर्वरूपे आली आहेत..
रामो = रामः (प्रथमा)  रामं (द्वितीया)  रामेण (तृतिया)  रामाय (चतुर्थी)  रामात् (पंचमी)  रामस्य (षष्ठी)  रामे (सप्तमी)   भो राम (अष्टमी, संबोधन)

**ह्या श्लोकात र-काराची पुनरावृत्ती असल्यानं असं म्हटलं जातं कि गर्भारपणात हा श्लोक म्हटल्यानं जन्माला येणारं बाळ बोबडं बोलत नाही.. तसंच बोबडं बोलणाऱ्याचे ही उच्चार सुधारतात.. 


रामरामेति रामेति रमे रामे मनोरमे।
सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने॥३८॥

वरानने : वर (श्रेष्ठ) + आनन (मुख)
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
मनाला रममाण करणाऱ्या (आनंद देणाऱ्या) रामाच्या ठिकाणी मी रममाण होतो.. 
रामाचं एक नाव (विष्णूच्या) हजार नावांच्या बरोबरीचे आहे.. (भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात) हे सुमुखी.. 

विवरण-   
माता पार्वतीनं विचारलेल्या 'श्रीविष्णुसहस्रनामावली सारखं रामाचं एखादं स्तोत्र आहे का?' ह्या प्रश्नाच्या उत्तराची सांगता करणारा हा श्लोक.. भगवान विष्णूच्या सहस्रनामाची बरोबरी करणारा हा एक 'राम' हा शब्द.. ज्याच्या नामस्मरणात भगवान शंकर अखंड रममाण असतात..


इति श्रीबुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णम्।

अर्थ-
अशा प्रकारे श्री बुधकौशिकऋषी रचित श्रीरामरक्षा स्तोत्र संपूर्ण झाले..


॥श्रीसीतारामचन्द्रार्पणमस्तु॥

श्रीसीतारामचंद्र : सीतेचा पती श्री रामचंद्र

अर्थ- 
हे स्तोत्र श्री सीतारामचंद्रांच्या चरणी अर्पण असो..

विवरण-
'श्री सीता रामचंद्र चरणी अर्पण' - असा ही एक अर्थ सांगितला आहे..
सीता ही रामाची शक्ती, शक्तीचं स्मरण प्रथम करावं म्हणून सीताराम असं म्हटलं जातं.. तसंच राधेशाम, पार्वतीवल्लभ ह्या नावांत ही दिसून येतं.. 


*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 
*शार्दूलविक्रीडित छंद :  प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त..         


🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸


रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय व तारक आहे..
शास्त्रानुसार, कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात.. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा याप्रमाणं चढत्या क्रमानं वाचून नवमीच्या दिवशी नऊवेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा..  
१२१ दिवस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठरावीक वेळी पठण केल्यास.. किंवा गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात दररोज १३ वेळा.. किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज १३ वेळा पठण केल्यास रामरक्षा सिद्ध होते.. असं म्हणतात.. 
रामरक्षा सिद्ध होते म्हणजे नियम, श्रद्धा आणि एकाग्रतेनं केलेल्या नियमित पठणामुळं रामरक्षा स्तोत्राची ऊर्जा जागृत होऊन, पठण करणाऱ्या व्यक्तीच्या अवतीभोवती प्रभू श्रीरामाच्या कृपेचं एक शक्तिशाली संरक्षककवच निर्माण होतं..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Friday, May 15, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्लोक २२ ते ३०




रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली।
काकुत्स्थः पुरुषः पूर्णः कौसल्येयो रघूत्तमः॥२२॥

लक्ष्मणानुचरो : लक्ष्मण + अनुचारो (पाठोपाठ चालणारा)
काकुत्स्थः : काकुत्स्थ कुळातील  
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
दशरथपुत्र श्रीराम शूर आहेत, लक्ष्मणा सारखा बलवान त्यांचं अनुचरण करतो..
ककुत्स्थ कुळातला हा पूर्ण पुरुष असलेला कौसल्येचा पुत्र रघुकुलात श्रेष्ठ आहे..

विवरण-        
पुराणकथेनुसार, सत्ययुगाच्या शेवटी देव दानवांचं घोर युद्ध झालं.. देवांच्या सैनेचं प्रतिनिधित्व 'सूर्यवंशी राजा' पुरंजय यांनी वृषभ(बैल) रूपात असलेल्या इंद्राच्या 'कुकुद' (कूबड) वर बसून केलं आणि राक्षसांचा पराभव केला.. म्हणून त्यांना काकुत्स्थ हे नाव पडलं.. आणि त्या वंशांत जन्म घेणाऱ्यास काकुत्स्थ म्हणू लागले.. 



वेदान्तवेद्यो यज्ञेशः  पुराणपुरुषोत्तमः।
               जानकीवल्लभः श्रीमानप्रमेयपराक्रमः॥२३॥              

वेदान्तवेद्यो : वेदांतानं जाणून घेण्या योग्य       पुराणपुरुषोत्तमः : सनातन पुरुष
जानकीवल्लभः : सीतेचा पती     श्रीमानप्रमेयपराक्रमः : श्रीमान्+अप्रमेय(मोजदाद करता येत नाही असा)+पराक्रमः
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
वेदान्त विद्यांचे निधी, सर्व यज्ञांचे ईश, पुराणात देखील उल्लेख असणारे पुरुषोत्तम..
जानकीचे पती हे कल्याणकर्ता आणि पराक्रमी आहेत..  

श्लोक क्र २२, २३ मध्ये श्रीरामांची आलेली १५ विशेषणं.. १) दशरथ पुत्र, २) शूर, ३) लक्ष्मण ज्याचा अनुचर आहे, ४) बलवान, ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) महापुरुष, ७) पूर्ण ब्रह्म, ८) कौसल्या तनय, ९) रघुकुलातील श्रेष्ठ १०) वेदांत शास्त्रांनी जाणण्यास योग्य, ११) यज्ञाचा स्वामी, १२) पुराण पुरषोत्तम, १३) जानकीचा पति, १४) वैभव संपन्न, १५) अतुल पराक्रमी..



इत्येतानि जपेन्नित्यं मद्भक्तः श्रद्धयान्वितः।
अश्वमेधाधिकं पुण्यं सम्प्राप्नोति न संशयः॥२४॥
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
ह्याचा नित्यजप जे माझे भक्त श्रद्धायुक्त मनानं करतील 
त्यांना अश्वमेध यज्ञापेक्षाही जास्त पुण्य प्राप्त होईल यात शंका नाही..

विवरण-    
अश्वमेध यज्ञ- पूर्वकाळात आपलं सार्वभौमत्व प्रस्थापित करण्याकरिता राजे अश्वमेध यज्ञ करीत असत.. एक वर्ष चालणाऱ्या या यज्ञासाठी एक यज्ञिय अश्व सोडला जात असे.. आणि त्याच्या मागून राजाचं सैन्य जात असे.. ज्या ज्या भूभागातून हा घोडा जायी त्या त्या ठिकाणच्या राजांना ह्या अश्वाचं स्वामीत्व मान्य मान्य करावं लागे.. आणि ते मान्य नसेल तर सैन्याशी युद्ध करावं लागे.. मग तो भूभाग सैन्य युद्ध करून आपलं करून घेत असत..


रामंदूर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससम्।
स्तुवन्ति नामभिर्दिव्यैर् न ते संसारिणो नरः॥२५॥       

रामंदूर्वादलश्यामं : रामं+दूर्वादल(दूर्वांचं पान)+श्यामं(सावळा)    पद्माक्षं : कमळासारखे डोळे    पीतवाससम् : पितांबर 
नामभिर्दिव्यैर् : नामभिः(नावांनी)+दिव्यैः( दिव्य, अलौकिक)
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-  
दूर्वादलासारख्या सावळ्या वर्णाच्या, कमळासारखे डोळे असलेल्या, पितांबर परिधान केलेल्या श्रीरामांचं..
दिव्य नाव घेऊन जे स्तुति करतात ते पुरुष संसाराच्या फेऱ्यातून मुक्त होतात..


रामं लक्ष्मणपूर्वजम् रघुवरं सीतापतिं सुन्दरम्।
काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकम्l
राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिम्।
              वन्दे लोकाभिरामं रघुकुलतिलकम् राघवं रावणारिम्॥२६॥            

*पहिले दोन चरण शार्दूलविक्रीडित छंद 
*दुसरे दोन चरण स्रग्धरा छंद 

अर्थ-
श्रीराम लक्ष्मणाग्रज, रघुकुळातले श्रेष्ठ, सीतेचे पती व सुंदर आहेत.. 
ककुत्स्थ कुळातले, करूणेचे सागर, गुणांचा खजिना, ब्राह्मणांना प्रिय असलेले व धार्मिक आहेत.. 
राजांमध्ये श्रेष्ठ, सत्याशी कायम जोडलेले, दशरथपुत्र, सावळे व शांततेची मूर्ती आहेत.. 
लोकांना प्रिय असणाऱ्या, रघुकुळात तिलका प्रमाणे शोभणाऱ्या, रावणाचा शत्रू असणाऱ्या अशा श्रीरामांना मी वंदन करतो..

विवरण- 
लक्ष्मणपूर्वजम् : लक्ष्मणाग्रज असा अर्थ..       
पूर्वज म्हणजे पूर्वी जन्मले असा रुढार्थ आहे.. मोठ्या भावाला सहसा कोणी पूर्वज म्हणत नाही.. पण इथं लक्ष्मणा आधी म्हणजेच लक्ष्मणाग्रज हा अर्थ अभिप्रेत आहे..

रावणारिम : रावणाचा शत्रू 
विश्रवामुनी आणि कैकसी यांचा पुत्र दशानन.. पुराणानुसार, ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यावर अत्यंत अहंकारी झालेला दशानन एकदा त्यानं आपलं पुष्पक विमान कैलास पर्वताजवळ थांबवलं आणि शिवाला उचलण्याचा प्रयत्न केला.. तेव्हा भगवान शिवांनी त्याला कैलासावर येण्यास सक्त मनाई केल्यावर, अहंकारी दशाननानं  कैलास पर्वतच मुळापासून उखडून लंकेला नेण्याचा प्रयत्न केला.. त्याची शक्ती पाहून भगवान शिवांनी आपल्या पायाच्या अंगठ्यानं कैलास पर्वताला दाबलं.. या वजनाखाली त्याचे हात चिरडले गेल्यानं हातातील प्रचंड वेदनानं तो असह्य होऊन भयानक गर्जना करत ओरडू लागला.. त्याच्या या आक्रोशानं त्रैलोक्य रावित (नादित) झालेलं पाहून भगवान शिवांनी त्याला 'रावण' हे नाव दिलं.. 

ह्या श्लोकात आलेली श्रीरामाची १८ विशेषणं.. १) लक्ष्मणाचा जेष्ठ बंधू, २) रघुकुलातील श्रेष्ठ, ३) सीतेचा पति, ४) सुंदर ५) काकुत्स्थ कुलोत्पन्न, ६) दयेचा सागर, ७) सद्गुणांचा निधी,  ८) ब्राह्मण ज्याला प्रिय आहेत असा, ९) धार्मिक, १०) राजे लोकांचा इंद्र, ११) सत्यवचनी, १२) दशरथपुत्र, १३) सावळ्या वर्णाचा, १४) शांत स्वरुपाचा, १५) लोकांना आनंद देणारा, १६) रघुकुलाला तिलकाप्रमाणं शोभणारा, १७) रघुकुलात श्रेष्ठ आणि १८) रावणाचा शत्रू..



रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे।
                  रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः॥२७॥               

रामभद्र : भद्र(कल्याणकारी,शांत, सज्जन)      वेधसे : निर्माता, प्रजापती
*अनुष्ठूप छंद 

अर्थ-
रामाला, रामभद्राला, रामचंद्राला, प्रजापतीला, रघुनाथाला, नाथाला, सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो..



श्रीराम राम रघुनन्दन राम राम।
श्रीराम राम भरताग्रज राम राम।
श्रीराम राम रणकर्कश राम राम।
           श्रीराम राम शरणं भव राम राम॥२८॥          

*वसंततिलका छंद 

अर्थ-
श्रीराम हे रघुकुळातले श्रेष्ठ आहेत..
श्रीराम भरताचे थोरले बंधु आहेत..
श्रीराम रणांगणावर शूरवीर आहेत.. 
अशा श्रीरामांना मी शरण आलो आहे..



श्रीरामचन्द्रचरणौ मनसा स्मरामि।
श्रीरामचन्द्रचरणौ वचसा गृणामि।
श्रीरामचन्द्रचरणौ शिरसा नमामि।
           श्रीरामचन्द्रचरणौ शरणं प्रपद्ये॥२९॥           

*वसंततिलका छंद 

अर्थ- 
मी श्रीरामांच्या चरणांचं मनानं स्मरण करतो.. 
मी श्रीरामांच्या चरणांचं वाणीनं स्तवन करतो.. 
मी श्रीरामांच्या चरणांना शिरसाष्टांग नमन करतो..
मी श्रीरामांच्या चरणांना शरण जातो..

विवरण-        
रामचंद्र नावासंबंधित एक कथा अशी सांगितली जाते..
श्रीरामांच्या जन्मानं सर्व सृष्टी प्रसन्न झाली होती, सर्वजण आनंदीत झाले होते.. पण श्रीराम जन्म सोहळा पाहायला न मिळाल्यानं चंद्र मात्र दुःखी होता..
श्रीरामांनी त्याला वाचन दिलं कि, चिंता करू नकोस रामावतारात असं झालं असलं तरी कृष्णावतारात असं होणार नाही.. मी रात्री बारा वाजता अवतरीत होईन.. बाकी सगळी सृष्टी झोपलेली असेल आणि तू एकटाच जागा असशील.. आणि तुलाच माझं प्रथम दर्शन घेता येईल.. 
चंद्र प्रसन्न झाला तरीही म्हणाला, "प्रभो पुढच्या अवतारा पर्यंत याची प्रतिक्षा करावी लागेल?" यावर श्रीराम म्हणाले, "ठीक आहे मी माझ्या नावासह तुझं नाव जोडेन.. लोक मला रामचंद्र म्हणतील.. मी सूर्यवंशात जन्मलो असलो तरी माझ्या नावापुढं तुझं नाव लावेन" 



माता रामो मत्पिता रामचन्द्रः स्वामी रामो मत्सखा रामचन्द्रः।
               सर्वस्वं मे रामचन्द्रो दयालुर्नान्यं जाने नैव जाने न जाने॥३०॥               

*त्रिष्टुप छंद

अर्थ- 
माझी माता श्रीराम आहेत माझा पिता श्रीराम आहेत.. माझा स्वामी श्रीराम आहेत माझा मित्र ही श्रीराम आहेत.. 
परम दयाळू प्रभू श्रीराम माझे सर्वस्व आहेत.. मी त्यांच्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाही..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*शार्दूलविक्रीडित छंद :  प्रत्येक चरणात एकूण १९ अक्षरं..
एक अतिशय लोकप्रिय आणि लयबद्ध जोरदार, डौलदार चालीचं असं हे अक्षरगणवृत्त.. 
*स्रग्धरा छंद : प्रत्येक चरणांत २१ अक्षरं.. ओळीची लांबी जास्त त्यामुळं लय अतिशय संथ आणि भारदस्त..
*वसंततिलका छंद : प्रत्येक चरणात १४ अक्षरं..
मुख्यतः वीररस, शृंगाररस आणि गंभीर भावना व्यक्त करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय असं हे अक्षरगणवृत्त..  
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Saturday, May 2, 2026

पुनःश्च २ मे..


 Happy Birthday to ME!!

आजचा दिवस खूप शांत सुंदर गेला.. 
तळ्याकाठी बसून केलेल्या साधनेनं दिवसाची सुरुवात झाली.. आदल्यादिवशीच झालेल्या बुद्ध पौर्णिमेच्या चंद्राचं प्रतिबिंब अजुनी तळ्यांत होतंच.. तांबडं फुटताना पसरलेल्या लाल अभेत त्याचं हळूहळू नाहीस होणं हा एक अनुभव होता.. 
मंजू माझी लाडकी मैत्रीण, योगायोगानं फ्लोरीडाला आलेली असल्यानं तिच्या बरोबर कॉफी शॉपला जाऊन पोटभर गप्पा मारल्या.. संध्याकाळी ऋचाबरोबर बर्थडे ट्रेडीशन असलेलं चॉकलेट आईस्क्रिम खाल्लं.. (वरचा फोटो तिथलाच.. मला कूकी हा प्रकार अजिबात आवडत नाही म्हणून मुद्दाम काढलेला..)

ह्यावर्षी प्रकर्षानं जाणवलं ते वाढदिवसाच्या शुभेच्छांचं कमी होणं.. जसं जशी सोशल मीडिया, व्हाट्स ऍप गृप पासून लांब होत गेले तसा हा वर्षाव कमी होत गेला.. ह्यावर्षी तर अगदी जवळची माणसं सुद्धा वाढदिवस विसरली.. अर्थात ह्याचं वाईट वाटण्यापेक्षा माणसाच्या स्वभावाची गंमत वाटली.. पूर्वी मला ह्या गोष्टींचा त्रास व्हायचा पण आता हसून सोडून देता येतंय.. दुनियादारी शिकायला अंमळ उशिरच झाला.. 

ह्यावर्षीनं मला सोडून द्यायला शिकवलं..
कुरुंदवाडचं घर.. माझा हृदयाच्या अगदी जवळचं.. ते घर पाडून आता तिथं प्रशस्त सुंदर अपार्टमेंट झालंय.. 
२०२५ची दिवाळी कुरुंदवाडला नवीन वास्तूत साजरी करायची टूम निघाली.. आणि त्यानुसार सगळं नियोजन करणं सुरु झालं.. त्या अनुषंगानं मी माझी चारधाम यात्रा ठरवली.. 
पण काही कारणानं दिवाळी मात्र तिथं साजरी करता आली नाही.. आई-बाबा ह्या घरात राहायला येतील तेव्हा मी नसेन याचं खूप वाईट वाटलं.. 
इकडं अमेरिकेला येण्यापूर्वी मी कुरुंदवाडला जातेच जाते.. घर पाहायला, त्या वास्तूला नमस्कार करायला, तो उबदारपणा मनांत साठवून ठेवायला.. आणि गावाला कृतज्ञता व्यक्त करायला.. 
तर, ह्यावेळी माझ्या कात टाकलेल्या घराच्या सुंदर इमारतीत बांधकामाच्या, सुतारकामाच्या, इलेकट्रिशिअनच्या आवाजाबरोबरच लहान मुलांचा किलकिलाट, दंगा, हसणं ऐकू आलं.. आणि माझं मन तृप्त झालं.. कारण आता माझ्या घराला श्वास मिळाले होते.. माझं घर जिवंत झालं होतं.. आई बाबा घरी राहायला येतील तेव्हा आता मी नसले तरी मला चालणार होतं.. कारण मला जे हवं होतं ते मिळालं होतं.. 
आता घराबद्दलची भावना, ते भावनिक अडकलेपण संपल्याचं मला जाणवतंय.. घर परत नांदायला लागलेलं पाहून त्याच क्षणी बहुतेक मी मुक्त झाले होते.. पण ती नाळ, ती आपुलकी, तो आपलेपणा मात्र अजुनी जाणवतो.. आणि तो कायम राहील..  


२ मे २०२५.. गेल्या वर्षीचा वाढदिवस.. 
उगवतीच्या सूर्याच्या साक्षीनं एक नवीन उमेद आयुष्यात येताना दिसली.. 
तुटत चालेल्या नात्याच्या फांदीतून आशेचा दिसलेला तो एक नाजूकसा हिरवा कोंब!.. 
दिवसभर त्या कोवळ्या हिरव्यागार नाजूक कोंबाकडं पाहून आनंदानं नाचत होते.. प्रेमानं विश्वासानं जोपासायचं स्वप्नं उरी बाळगून बागडत होते.. 
..पण एक दिवस ही फांदी तुटलीच.. अपेक्षांचं ओझं इतकं झालं की तुटताना सोबत तो कोंब सोबत घेऊनच तुटली.. विश्वासाचं प्रेमाचं केलेलं कलम फार काळ तग धरू शकलं नाही.. 
ठसठसणारी, भळभळणारी जखम.. ऊर्जेचं गमावणं.. अपूर्णतेची जाणीव.. 
खूप केविलवाणं, असहाय्य वाटलं त्यावेळी.. 
मीच का? प्रश्नापासून सकारात्मकता ते स्वीकारात्मकता पर्यंतचा हा प्रवास.. खूप शिकवणारा, धैर्याची परीक्षा घेणारा, प्रत्येकवेळी 'स्व' ची जाणीव करून देणारा.. 

संपलं असलं सगळं तुझ्यातलं माझ्यातलं 
उरलं तरीही काही तुझ्यातलं माझ्यातलं
कळ काळजात अजुनी त्या तुटण्याची 
त्या तुटण्यातलं मौन तुझ्यातलं माझ्यातलं
विखुरता सप्तरंग कळलं पहाट झाली 
होत ते स्वप्न सुगंधी तुझ्यातलं माझ्यातलं
नको वळून पाहणं नको साद घालणं   
हे ओसरणं जरुरी तुझ्यातलं माझ्यातलं

ह्या प्रवासात Your Soul's Plan आणि Your Soul's Gift पुस्तकांची ओळख झाली.. आणि माझा आयुष्याकडं पाहण्याचा दृष्टीकोणच बदलला.. मी माझं आयुष्य केस-स्टडी म्हणून अभ्यासलं.. आणि मला माझी नव्यानंच ओळख होत गेली.. आधी स्वतःला आणि मग दुसऱ्याला, त्या वेळच्या परिस्थितीला माफ करायचा प्रयत्न करू लागले.. हे खूप सक्षम करणारं आहे.. 
सद्गुरूंची Inner Engineering, Death, Karma, Adiyogi ही पुस्तकं ही अभ्यासली.. ही सगळी अशी पुस्तकं आहेत की एकदा वाचून त्यातील विषय, आशय कळत नाही.. प्रत्येकवेळी नवीन काही तरी कळतं.. आयुष्य जाणण्याचं स्वतःचं मॅन्युअल, स्वतःची खास मार्गदर्शिका स्वतःच तयार करता.. आणि गरज पडेल तेव्हा त्यात बदल करण्याची मुभा ही ठेवता.. 

गेलं वर्ष जरी भावनिक दृष्टया आव्हानात्मक असलं तरी तितकंच समाधान देणारं होतं.. सेंट हेलन चढाई आणि चारधाम यात्रा ही ठळक वैशिष्ट!.. 
आता ह्यावर्षी काय करायचं हे अजुनी ठरलं नाहीय पण ऋषिकेश योगा रिट्रीट करावी असं वाटतंय.. हे वर्ष ऋचासाठी महत्वाचं असल्यानं तिला लागेल तसा सपोर्ट करत माझे प्लॅन्स ठरवेन..
अधिक महिन्यात एकनाथी भागवत वाचायचा मानस आहे.. विष्णुसहस्रनाम शिकायला सुरु केलं आहे.. 
स्वतःला शोधणं तर अखंड सुरु राहीलच.. 


-मी मधुरा.. 

************************************************

Tuesday, April 28, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : श्रीरामस्तुती : श्लोक १६ ते २१




श्रीराम कवचाच्या फलश्रुति नंतर पुढच्या काही श्लोकांत (१६ ते २१) श्रीरामस्तुती, राम-लक्ष्मण यांची वर्णनात्मक स्तुती केली आहे.. 


आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः॥१६॥ 

आरामः : बगीचा, वन   विरामः : शेवट करणारा, मुक्ती देणारा   सकलापदाम् : सकल + आपदाम् : सर्व संकटांचा
अभिरामस्त्रिलोकानां : अभिराम: + त्रिलोकानां : तिन्ही लोकांना आवडणारा, मनोहारी  श्रीमान् : श्रीमंत   
स नः प्रभुः : आमचा देव आहे
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
प्रभू श्रीराम कल्पवृक्षांचा बगीचा आहे.. सकल संकटांपासून मुक्ती देणारा आहे..
तिन्ही लोकांमध्ये मनोहारी आहे.. असे हे प्रभू श्रीराम निःसंदेह आमचे प्रभू आहेत..

विवरण- 
आराम-विराम-अभिराम हे ह्या श्लोकातील तीन यमक.. 
आराम म्हणजे बगीचा.. विराम म्हणजे शेवट पण इथं मुक्ती देणारा तर अभिराम मधील अभि म्हणजे अभि म्हणजे सर्वांच्या दृष्टीचे केंद्र, ज्यावर सर्वांचे डोळे खिळलेले आहेत असा मनोहारी ऐश्वर्य युक्त, अतिशय सुंदर, कल्याणकारक, ज्यात पावित्र्य असते असा अर्थ अभिप्रेत आहे..


तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ।
       पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ॥१७॥          

पुण्डरीक : कमळ    विशालाक्षौ : मोठे डोळे असलेला    
चीरकृष्णाजिनाम्बरौ : चीर (वल्कले)+कृष्णाजिन (काळवीटाचं कातडं)+अंबरौ (परिधान केलेला)  कृष्ण : गडद रंग 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
तरुण, रूपसंपन्न, सुकुमार, महाबली, कमळाच्या आकाराचे मोठे डोळे असलेले, गडद रंगाची वल्कलं जीन परिधान करणारे 



फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
           पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१८॥           

फलमूलाशिनौ : फल+मूल+अशिनौ (फळं-कंदमूळं भक्षण करणारे)    दान्तौ : इंद्रियं दमन करणारे जितेंद्रिय
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
फळं-कंदमूळं भक्षण करणारे, तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथ राजांचे पुत्र हे बंधू राम लक्ष्मण



शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ॥१९॥

शरण्यौ : शरण देण्याजोगा   सर्वसत्वानां : सर्व प्राणिमात्र  
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
सर्व प्राणिमात्रांचं आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, असुरकुळांचा नाश करणारे हे उत्तम रघुकुलोत्पन्न आमचं रक्षण करोत..

श्रीराम-लक्ष्मण यांची श्लोक क्र १७, १८, १९ या तीन श्लोकांत आलेली १६ विशेषणं.. १) तरुण, २) रुपसंपन्न, ३) सुकुमार, ४) अतिशय बलवान, ५) कमलाप्रमाणे विशाल नेत्र असणारे, ६) वल्कले,कृष्णाजीन परिधान करणारे, ७) कंदमुळं फळं सेवन करणारे, ८) जितेंद्रिय, ९) तपस्वी, १०) ब्रह्मचारी, ११) दशरथाचे दोन पुत्र, १२) एकमेकांचे भाऊ, १३) सर्व प्राण्यांचं आश्रय स्थान असलेले, १४) सर्व धनुर्धारी योद्ध्यात श्रेष्ठ, १५) राक्षसकुलाचा नाश करणारे आणि १६) रघुकुलोत्पन्न.. 
.. आमचं रक्षण करोत..


आत्तसज्जधनुषाविषुस्पृशा वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ।
              रक्षणाय मम् रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्॥२०॥              

आत्तसज्जधनुषौ : आत्त (धारण केलेलं)+सज्ज+धनुषौ+ईषुस्पृशौ(बाण)  
अक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ : अक्षय(कधीही न संपणारा)+आशुग(पुढं जाणारा)+निषङ्ग (भाता)+सङ्गिनौ(जवळ) 
रामलक्ष्मणावग्रतः : रामलक्ष्मणौ + अग्रतः(पुढं)
*त्रिष्टुप छंद

अर्थ-
धनुष्य धारण करून नेहमी सुसज्ज असणारे तसेच पुढं जाणाऱ्या बाणांचा अक्षय भाता जवळ असलेले श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता माझ्या मार्गामध्ये नेहमी पुढं चालत राहोत..

विवरण- 
धनुष्य हे ज्ञानाच प्रतीक तर बाण हे विवेकाचं असं मानलं जातं..           
आत्तसज्जधनुषौ- धनुष्य धारण केलेले श्रीराम हनुमंताच्या हृदयी नेहमी विराजमान असतात.. असं तुलसीदासांनी वर्णन केलं आहे.. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात.. मारुतीरायानंच तशी श्रीरामाना विनंती केली होती की कपिकुलातील मला हृदयात, मनात केव्हा विकार येतील हे सांगता येणार नाही.. आणि हे विकार दूर करण्यासाठी श्रीरामांना विलंब नको म्हणून त्यांनी धनुष्य बाण घेऊन बसावे.. 

ह्या श्लोकांत धनुष्य सज्ज असणारे, बाणांना स्पर्श करणारे आणि अक्षय बाणांचा भाता असणारे अशी तीन विशेषणं आहेत.. 

**राम लक्ष्मण आपल्या मार्गातील पूर्व अडथळे दूर करून आपले रक्षण करतात म्हणून असं म्हणतात की रस्त्यानं एकटं जाताना, प्रवासामध्ये हा श्लोक म्हणावा..



संनद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा।
            गच्छ्न् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः॥२१॥            

संनद्धः : निरंतर सज्ज  कवची : चिलखत घातलेला.  खङग : तलवार 
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
निरंतर सज्ज असलेले, अंगात कवच (चिलखत) घातलेले, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारे हे तरुण राम आणि लक्ष्मण आमच्या मनोरथाचं रक्षण करोत..


*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 
*त्रिष्टुप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ११ अक्षरं..  
एक महत्त्वाचा वैदिक छंद.. वेदमंत्रांमध्ये गायत्री छंदानंतर त्रिष्टुप हा सर्वाधिक वापरला जाणारा आणि लोकप्रिय छंद मानला जातो.. श्रीमद्भगवद्गीतेतील अनेक श्लोक या छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, April 15, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : कवच फलश्रुति : श्लोक १० ते १५



श्रीरामांच्या सामर्थ्यानं युक्त असलेल्या या श्रीरामरक्षा कवचाच्या पठाणांनं मिळणारं फलं म्हणजेच फलश्रुति पुढच्या काही श्लोकांत सांगितली आहे..  

एतां रामबलोपेतां रक्षां यः सुकृती पठेत्।
        स चिरायुः सुखी पुत्री विजयी विनयी भवेत्॥१०॥         

रामबलोपेतां : रामशक्तीनं युक्त   सुकृती : सत्कर्म करणारा  
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
जो सत्कर्मी रामबलानं युक्त अश्या रामरक्षेचं (कवचाचं) पठण करेल 
तो दीर्घायुषी, सुखी, पुत्रवान, विजयी आणि विनयशील होईल..



पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः।
न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितं रामनामभिः॥११॥

पातालभूतलव्योमचारिणश्छद्मचारिणः : पातालभूतलव्योमचारिण: + छद्मचारिणः 
पातालभूतलव्योमचारिण: : पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकांत संचार करणारे..  
छद्मचारिणः कपटी, मायावी खोटं सोंग घेणारे (राक्षस)
द्रष्टुमपि : दृष्टी वर करून 
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
पाताळ, भूमी किंवा आकाशात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रूपात संचार करणारे दुष्ट जीव 
या श्रीरामरक्षा स्तोत्राचं पठण करणाऱ्याकडं दृष्टी वर करून पाहू देखील शकणार नाहीत..


रामेति रामभद्रेति रामचन्द्रेति वा स्मरन्।
नरो न लिप्यते पापैर्भुक्तिं मुक्तिं च विन्दति।।१२॥ 
       
भुक्ति : ऐहिक सुख (सांसारिक सुख)   मुक्ति : मोक्ष (पारमार्थिक सुख)
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
राम, रामभद्र किंवा रामचंद्र अशा (इतर कोणत्याही) नावांनी श्रीरामाचं स्मरण करणारा 
कधीही पापांनी लिप्त (ग्रसित) होत नाही अनेक सुखं भोगून शेवटी तो मोक्ष प्राप्त करतो..

विवरण- 
अध्यात्मात नामस्मरण ला अलौकिक महत्व आहे.. कोणत्याही देवदेवतेचं नामस्मरण करणं हा कलियुगांत मुक्तीचा मार्ग सांगितला आहे.. 

श्वासोच्छवास करताना श्वासांवर नियंत्रण ठेवून नामस्मरण केलं तर प्रत्येक श्वासाबरोबर एक अश्याप्रकारे दिवसांत २१६०० वेळा नामजप - अजपाजप होतो..  
रामनामाचा जप करायचा असेल तर श्वास सोडताना रा आणि घेतांना म म्हणायचं.. असं म्हणतात 'रा' म्हणतांना सर्व विकार, पाप बाहेर पडतात आणि 'म' म्हणतांना ओठ बंद होतात आणि बाहेर पडलेली पापं परत येत नाहीत.. दिवसभरांत आपण साधारणपणे २१६०० वेळा श्वासोच्छवास करतो..

विश्वाचं मूळ ज्ञान, शक्ती, आनंद, नाद ज्याला उपनिषदं ओंकार किंवा प्रणव म्हणतात, ज्याला गीता एकाक्षर ब्रह्म म्हणते, वेदांत शब्दब्रह्म म्हणतो त्याला साधूसंत नाम असं म्हणतात.. नाम शक्तिमय असल्यानेनं संपूर्ण मूर्त विश्व त्यातून जन्म पावतं.. नाम नुसता शब्दोच्चार नसून नाम म्हणजे अंतरंगात असणारी आदी परम ईशाची शक्ती आहे.. मूर्त-अमूर्तांना जोडणारी साखळी.. दृश्यातून अदृश्यात आणि अदृश्यातून अव्यक्तात जाण्यासाठी नामा सारखी सहज सुंदर दुसरी साधना नाही..
नामजपावर असणारा विश्वास आणि त्याच्या शक्तीनंचं सगळं घडतं ही असणारी जाणीव म्हणजे 'नामस्मरण'.. 
 
रामनामानं वाल्याचा 'वाल्मिकी झाला, दगड पाण्यावर तरंगले आणि भगवंताच्या नामानं छोटा प्रल्हाद ही तरला.. 
संकटांत असताना, भयभीत असताना जो नामजप केला जातो त्याला 'नामस्मरण होणं' असं म्हणतात तर नित्य नैमित्तिक, फलांची अपेक्षा न करता जो नामजप केला जातो त्याला 'नामस्मरण करणं' असं म्हणतात.. आणि जेव्हा संत मंडळी नामस्मरण करतात तेव्हा त्यांच्या नामस्मरणाला 'नामस्मरणात राहणं' असं म्हणतात..
भीतीच्यावेळी नामस्मरण होणं, नित्यकर्म म्हणून नामस्मरण करणं यापेक्षा सजगतेनं, जागृकतेनं नामस्मरणात राहणं हे नक्कीच श्रेष्ठ आहे.. 


जगज्जैत्रेकमन्त्रेण रामनाम्नाभिरक्षितम्।
         यः कण्ठे धारयेत्तस्य करस्थाः सर्वसिध्दयः॥१३॥         

जगज्जैत्रेकमन्त्रेण : जगज्जेत्र + एकमन्त्रेण (जग जिंकणाऱ्या एका मंत्रानं)  
रामनाम्नाभिरक्षितम् : रामनाम्ना + अभिरक्षितम् (रामनामानं सर्व बाजूंनी रक्षण होतं)
*अनुष्ठूप छंद

अर्थ-
सर्व जगाला जिंकणारा हा मंत्र जो रामनामानं अभिरक्षित आहे जो मनुष्याचं सर्व बाजूंनी रक्षण करतो 
हा मंत्र जो कंठात धारण करतो त्याच्या हातात सर्व सिद्धी येतात..


वज्रपञ्जरनामेदमं यो रामकवचं स्मरेत्।
                 अव्याहताज्ञः सर्वत्र लभते जयमङ्गलम्॥१४॥               

वज्रपञ्जरनामेदमं : वज्रपञ्जरनाम इदं  वज्रपञ्जर : वज्रस्य पञ्जरः (वज्राचा पिंजरा)
अव्याहताज्ञः : न व्याहता अव्याहता (आज्ञा कधीही मोडली जात नाही असा)   जयमङ्गलम् : मंगलमय विजय  
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
जो या रामकवचाचं स्मरण करतो त्याच्यासाठी हे वज्राच्या पिंजऱ्या सारखं आहे.. अशा माणसाची आज्ञा कायम अबाधित राहते.. अव्याहत मानली जाते आणि त्याला सर्वत्र मंगल विजय मिळतो..

विवरण-     
इंद्राचं अस्त्र वज्र.. त्याचा पिंजरा जसा अत्यंत संरक्षक असतो तसं हे रामनामाचं कवच, रामरक्षा स्त्रोत्र.. म्हणून हे  वज्रपञ्जर.. जो ह्या रामरक्षेचं स्मरण करतो त्याला सर्वत्र विजय जय प्राप्त होउन त्याचं नेहमी कल्याण होतं..


आदिष्टवान् यथा स्वप्ने रामरक्षामिमां हरः।
तथा लिखितवान् प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः॥१५॥

आदिष्टवान् : आदेश दिला  हरः : भगवान शिवशंकर
*अनुष्ठूप छंद

अर्थ- 
भगवान शिवशंकरांनी स्वप्नांत ही श्रीरामरक्षा सांगितली.. 
सकाळी श्री बुधकौशिक ऋषींनी ती जशीच्या तशी लिहून काढली..

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

रामनामाची दिव्य अनुभूती खुद्द श्रीरामांना ही आली..  

गोष्ट आहे भगवान श्रीरामांनी केलेल्या एका मोठ्ठ्या यज्ञाच्या वेळची.. महान ऋषी-मुनी, अनेक राजे-महाराजे यांची उपस्थिती असलेला हा यज्ञ..  
यज्ञाची सूचना मिळताच सामंत नावाचा राजा अयोध्येत आला.. यज्ञ मंडपाच्या बाहेरूनच उपस्थतीत महर्षींना प्रणाम करून यज्ञमंडपात स्थानापन्न झाला.. देवर्षि नारदांच्या नजरेतून राजा सामंतांचा हा प्रणाम चुकला नाही.. रामनामाची महत्ता सर्वांपुढं प्रकट करण्यासाठी त्यांना एक युक्ती सुचली..  
देवर्षी नारद त्वरित विश्वामित्र ऋषींकडं गेले आणि म्हणाले, पहा तरी राजा सामंताचं धाडस.. वास्तविक पाहता महर्षी वसिष्ठापेक्षा आपण श्रीरामाचे अत्यंत उपकारी आहात.. तुमच्याच कृपेनं श्रीरामानी माता सीतेला प्राप्त केलं.. तुमच्याच अनुग्रहानं रावणासारख्या शत्रूचा श्रीरामांनी वध केला.. पण हा राजा सामंत जाणून बुजून तुमचा अपमान करण्याच्या हेतूनं महर्षी 'वसिष्ठादिकांना माझा प्रणाम' असं म्हणून वसिष्ठांना प्रथम स्थान दिलं.. 

क्रोधीत विश्वामित्र रामाला म्हणाले ज्या राजा सामंतांनी माझा यज्ञमंडपात अपमान केला त्या राजा सामंताचं मस्तक माझ्या चरणावर समर्पित कर.. श्रीरामांनी विश्वामित्रांची आज्ञा शिरोधार्य मानून  राजा सामंतच्या शोधात निघाले..

विश्वामित्रांना कळ लावून देवर्षि नारद थेट राजा सामंतांकडं येणाऱ्या संकटाची सूचना देण्यासाठी गेले.. घाबरलेला राजा सामंतानं नकळत हे पाप घडलं आणि आता ह्यातून तुम्हीच मार्ग काढा अशी विनंती नारदांना केली.. नारदांनी त्वरित अंजनीमातेला शरण जाण्याचा सल्ला दिला.. राजा सामंतांनी अंजनीमाते चरण धरून अभय मागितलं.. सर्व वृत्तांत सांगून जीवनदान देण्याबद्दल प्रार्थना केली.. अंजनीमातेनं हनुमंताला राजाचं रक्षण करण्याची आज्ञा दिली..
मातेची आज्ञा ऐकून हनुमंत क्षणभर विचलित झाले.. राजाचं रक्षण करणं याचा अर्थ अराध्यदेवतेचा विरोध.. पण मातेची आज्ञा ही शिरसावंद्य..
हनुमंतानी आपली शेपटी वाढवून, शेपटीचा गोलाकार करून एक किल्ला तयार केला.. त्यात राजा सामंतांसह ते ध्यानमग्न होऊन रामनामाचा जप करीत बसले.. राजा सामंतांचा शोध घेत श्रीराम त्या ठिकाणी पोहोचले.. आणि त्या किल्ल्याला लक्ष बनवून आपले अमोघ बाण चालवले.. पण ज्या वेगानं बाण किल्ल्याकडं जात होते त्या वेगानंच ते किल्ल्याला प्रदक्षिणा घालून परत येत होते.. आणि श्रीरामाच्या चरणावर लीन होत होते.. हे पाहून श्रीरामाचा क्रोध उफाळून येऊ लागला.. परिस्थिती हाताच्या बाहेर जात आहे हे दिसताच देवर्षि नारदांनी अस्त्रांचा प्रयोग बंद करून किल्ल्यातून येणारा ध्वनी ऐकण्याची विनंती श्रीरामांना केली.. शांत वातावरणात 'राम राम' असा ध्वनी स्पष्ट ऐकू येऊ लागला. श्रीरामांनी जवळ जाऊन पाहिलं तर त्या किल्ल्यात ध्यानमग्न हनुमंत आणि भयभीत राजा सामंत..
हनुमंताला पाहून श्रीराम म्हणाले हे काय? मी ज्या व्यक्तीचं मस्तक विश्वामित्रांना भेट देण्याचं वचन दिलं आहे, त्यांचंच रक्षण तू करतो आहेस?.. 
हनुमंतानं श्रीरामाचे चरण पकडले.. प्रभू तुमच्या मनाविरुद्ध जाणं माझ्यानं शक्य नाही.. पण मी मातेच्या आज्ञेचं उल्लंघन पण करू शकत नाही.. मला तुमच्या नावा शिवाय दुसरा कोणता आश्रय नाही.. 
आता श्रीरामांचं हे वचन निभावण्यासाठीचा युक्तीवाद नारदांनी केली.. ते म्हणाले विश्वामित्रांनी राजा सामंतांचं मस्तक त्यांच्या चरणावर समर्पित करण्यास सांगितलं आहे.. ह्याचा अर्थ असा नाही की मस्तक कापूनच चरणावर ठेवावयला हवं.. महर्षी विश्वामित्रांच्या चरणावर राजानं मस्तक ठेवून दंडवत केला तरी तोच अर्थ होईल.. आणि तुमच्या वचनाचं पालन ही होईल आणि राजाचं रक्षण ही.. 
देवर्षि नारदांचा प्रस्ताव ऐकून राजा सामंतांनी विश्वामित्रांच्या चरणावर मस्तक ठेवून साष्टांग प्रणाम केला.. महर्षींचा क्रोध शांत झाला..

..धन्य आहे हनुमंताची रामभक्ती आणि रामनामाचा महिमा.. म्हणूनच जगामध्ये जय प्राप्त करून देणारा मुख्य मंत्र 'रामनाम' आहे..

सोळाव्या श्लोकापासून श्रीराम स्तुती, श्रीराम विशेषणं पाहूया..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************
  

Thursday, March 26, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : कवच : श्लोक ४ ते श्लोक ९



पहिल्या तीन श्लोकांपर्यंत आपण नीलवर्णी, कमलनयन, सालंकृत, जटामुकुटधारी, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत असणाऱ्या, हातात धनुष्यबाण, तलवार असणाऱ्या श्रीरामप्रभुंच्या स्वरूपाचं ध्यान करून त्यांना हृदयात विराजमान केलं..   

आता पुढं..
चौथ्या श्लोकाचं दुसरं चरण 'शिरो मे राघवः' पासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. 
कवच- हा मंत्रविद्येतील एक प्रकार आहे.. यात देवतेला आपल्या शरीराचं रक्षण करण्याची प्रार्थना केलेली असते.. रोगराई सारख्या स्थूल कवचाहून अधिक शक्तीशाली कवच ही असतात जी भूतबाधा, करणी यासारख्या सूक्ष्म वाईट शक्तीपासून रक्षण करतात.. 

चौथ्या श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत श्रीरामांकडं शरीराच्या प्रत्येक अवयवाची रक्षा करण्याची प्रार्थना केली आहे.. 


रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः॥४॥

प्राज्ञः : प्रज्ञावान, सूज्ञ  पापघ्नीं : पापाचा नाश करणारी  सर्वकामदाम् : सर्व इच्छा पूर्ण करणारी 
राघवः : रघू कुलाचा वंशज  दशरथात्मजः : दशरथ + आत्मजः (दशरथाचा मुलगा)  पातु : रक्षण करणं 
*छंद : अनुष्ठूप 
अर्थ- 
रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचं पठण करावं..
रघूकुल वंशज राघव राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो.. दशरथ पुत्र माझ्या कपाळाच रक्षण करो..

विवरण-
रघुकुल ज्ञान, पराक्रम, विवेक यांचं प्रतीक मानलं गेलं आहे.. मस्तक विचारांचं, बुद्धीचं केंद्रस्थान आहे.. अनिष्ट विचारांपासून मुक्ती, सकारात्मकता आणि बुद्धीच्या स्थैर्यासाठी हे राघव तू माझ्या मस्तकाचं रक्षण कर.. 
'दशरथ' ज्याची दहा इंद्रियांवर पकड आहे अश्या दशरथाचा पितृभक्त पुत्र राम.. विवेकबुद्धीनं निर्णय घेण्यासाठी, ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी, विचारांच्या सकारात्मक ऊर्जेसाठी तू माझ्या कपाळाचं रक्षण कर.. 


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।
          घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः॥५॥           

कौसल्येयो : कौसल्या पुत्र  दृशौ : दृष्टी  श्रुती : ऐकलेलं, वेद, प्राचीन शास्त्रांद्वारे प्रकट झालेलं ज्ञान (श्रवणेंद्रिय)
घ्राणं : नासिका  मखत्राता– मख (यज्ञ) + त्राता (रक्षण करणारा)  सौमित्रिवत्सल : सौमित्रेचा पुत्र (लक्ष्मण) 
पातु : रक्षण करणं 
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ- 
कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचं रक्षण करो.. विश्वामित्रांना प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचं रक्षण करोत.. 
यज्ञाचं रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचं रक्षण करोत..  सौमित्रेचं ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचं रक्षण करो..

विवेचन-
कौसल्यामाते सारखी भक्ती, वात्सल्य, ममता माझ्या डोळ्यांत असुदे म्हणून हे कौशल्यपुत्र तू माझ्या डोळ्यांचं रक्षण कर.. 
विश्वामित्रांनी जसं योग्य आणि उचित ज्ञानाचे संस्कार श्रुतीद्वारे केले तसेच उचित संस्कार होण्यासाठी हे विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या तू माझ्या कानांचं रक्षण कर.. उचित आणि योग्य तेच माझ्या कानांद्वारे ग्रहण होऊदे.. 
श्वसनातून, नाकाद्वारे होणाऱ्या प्राणायामातून, शरीराचा अंतर्गत सुरु असणाऱ्या यज्ञाचं, त्या प्राणशक्तीचं तू रक्षण कर..
सौमित्रेनं आपल्या पुत्राला लक्ष्मणाला रामाच्या सेवेसाठी अर्पण केलं.. लक्ष्मणानं रामाची सावली बनून, मुखानं रामनाम घेत सेवा केली.. जसं लक्ष्मणानं रामाचं रक्षण केलं तसंच माझ्या मुखाचं (वाणीचं) रक्षण कर..


जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः।
          स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः॥६॥           

विद्यानिधिः : विद्येचा संचय  भरतवन्दितः : भरताला वंदनीय  
स्कन्धौ : खांदा  दिव्यायुधः : दिव्यास्त्र  भग्नेशकार्मुकः :भग्न + ईश (शिव) + कार्मुक: (धनुष्य)
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 
 
अर्थ-
सर्व विद्यांचा संचय असणारा (राम) माझ्या जिभेचं रक्षण करो.. भरताला वंदनीय (राम) माझ्या कंठाचं रक्षण करो.. 
दिव्यास्त्र असणारा (राम) माझ्या (दोन्ही) खांद्यांचं रक्षण करो.. शिवधनुष्याचा भंग करणारा (राम) माझ्या (दोन्ही) बाहूंचे रक्षण करो.. 

विवेचन-
जिभेच्या टोकावर विद्देचा वास असतो म्हणून सर्व विद्यांचा अधिपती असणारा तू जिभेचं रक्षण कर.. ज्याप्रमाणे भरताच्या कंठातून रामाची वंदना निघाली त्याचप्रमाणे माझ्या कंठातूनही सदैव सत्य आणि रामनाम यावे म्हणून भरताला वंदनीय असणारा तू माझ्या कंठाचं रक्षण कर..  
जबाबदाऱ्या, संकटे पेलण्याचं सामर्थ्य मिळवण्यासाठी दिव्यास्त्रधारी मजबूत खांदे असणारा तू माझ्या खांद्याचं रक्षण कर.. सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवत असताना धनुरभंग झाला.. धनुष्याचा भंग करण्यासाठी ताकदवान भुजा असणारा तू माझ्या भुजांचं रक्षण कर.. 


करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्।
           मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः॥७॥            

जामदग्न्यजित् : जमदग्निपुत्र (परशुराम)
खरध्वंसी : खर (राक्षस) + ध्वंसी (नाश करणारा)   जाम्बवदाश्रयः : जाम्बवंताला आश्रय देणारे
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ- 
सीतेचे पती माझ्या हातांचं रक्षण करोत.. परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचं रक्षण करोत..
खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचं रक्षण करोत.. जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचं रक्षण करोत..

विवेचन-
शक्तिरूपिणी सीतेचा हात हातात असणाऱ्या तू माझ्या हातांचं रक्षण कर..

सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य भंग झाल्यावर, शिवधनुष्य कोणी भंग केलं ह्याचा जाब विचारण्यासाठी जमदग्नीपुत्र परशुराम विवाहमंडपात येतात.. त्यावेळी रामाची परीक्षा घेण्यासाठी ते त्यांच्याकडील 'वैष्णव धनुष्या'स प्रत्यंचा लावण्यास सांगतात.. राम प्रत्यंचा आणि बाण लावून तो बाण कुठं मारू म्हणून विचारणा करतात.. त्यावर परशुराम म्हणतात रामा, मी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आहे.. त्यावेळेस काही पाप झालं असेल तर त्या पापाचा नाश करावा.. श्रीरामानं तसं केलं आणि परशुरामांचं हृदय जिंकलं.. म्हणून पराक्रमानं परशुरामांचं हृदय जिंकणारा तू माझ्या हृदयाचं रक्षण कर..

लक्ष्मणानं शूर्पणखाचं नाक, कान कापल्यावर खर व दूषण हे राक्षस त्यांच्याशी युद्ध करायला येतात.. भगवान शंकराच्या वरामुळं त्यांचा मृत्यू कोणाच्याही हातून न होता आपापसात युद्ध करून होणार असतो.. रामाच्या मोहनास्त्रामुळं त्यांना एक दुसऱ्यात राम दिसल्यानं ते आपापसांत युद्ध करतात आणि त्यांचा मृत्यू होतो.. 'खर' सारख्या अशुभ वाईट प्रवृत्तींचा नाश करतात.. शरीराच्या मध्यभागांत, पोटाच्या भागात सर्व प्रकारच्या इंद्रियांची प्रवृत्ती व विकार राहतात म्हणून खर राक्षसाचा नाश करणारा तू माझ्या मध्यभागाचं रक्षण कर..

रावण वधाच्यावेळी राम अवतारात भगवान विष्णूंना मदत करण्यासाठी सर्व देव देवता आपआपल्या अंश रूपानं पृथ्वीवर अवतरीत झाले.. ब्रम्हदेवापासून जांबुवंत, इंद्रापासून वाली, सूर्यापासून सुग्रीव, बृहस्पती पासून तार, कुबेरापासून गंधमादन, विश्वकर्मापासून अंगद, अश्विनीकुमारांपासून नल-नील, वरुणापासून सुषेन, पर्जन्यापासून शरभ, वायूपासून हनुमंत इत्यादी.. 
ब्रह्मदेव ज्यांची उत्पत्ती विष्णूच्या नाभीतून झाली आहे त्यांचा अंश जांबुवंत.. म्हणून जांबुवंताला आश्रय देणारा तू माझ्या नाभीचं रक्षण कर.. 


सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः।
            ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥              

सक्थिनी : (सक्थि) जांघेची हाडं
उरू : मांड्या (उर्वस्थी : कंबरे पासून गुडघ्या पर्यंत असणारी हाडं)  रक्षःकुलविनाशकृत् : राक्षसकुलाचा विनाश करणारा.. 
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ- 
सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचं रक्षण करोत.. हनुमंताचा प्रभू माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करोत..
राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करोत..

विवरण-  
वालीच्या त्रासानं पीडित सुग्रीवाला तुझ्या (श्रीराम) आश्रयानं, तुझ्याशी कटिबद्ध झाल्यानं राज्य, स्वाभिमान, शक्ती परत मिळाली तसंच तू माझ्या कर्माची, शक्तीची आणि मनाच्या स्थिरतेची (कंबरेची) रक्षा कर.. कंबर हे शरीराचं केंद्रस्थान असून, दृढता आणि कर्माचं प्रतीक आहे.. कंबर हा आधार देणारा मध्यभाग आहे.. आयुष्यात कठीण प्रसंगात, कंबर कसून काम करण्याची शक्ती प्रभू रामरायानं द्यावी हा उद्द्येश.. 

सक्थिनी किंवा जांघेचा संबंध आसनस्थ राहण्याशी, स्थिर राहण्याशी जोडला जातो.. कामविकारांशी संबंधित मानला जातो.. या भागाचं रक्षण करण्याची प्रार्थना म्हणजे विषयांचा त्याग आणि नैतिकतेचं बळ मिळवणं.. ज्याचा विकारांवर ताबा आहे अश्या हनुमानाचे प्रभू तुम्ही माझ्या जांघांचं, मूलाधार चक्राचं रक्षण करून विषयासक्तीचा त्याग, स्थिरता, ताकद आणि नैतिक नैतिकतेचं बळ द्या..  


जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः।
       पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः॥९॥        

जानुनी : जानु (गुडघा अनेकवचन)  सेतुकृत् : सेतुं करोति इति। (सेतू बांधणारा)  
जङ्घे : पोटऱ्या  दशमुखान्तकः दशमुख-अन्तकः (दशननाचा नाश करणारा)
रामोऽखिलं : रामस् अखिलं वपुः  : संपूर्ण शरीर
पातु : रक्षण करणं
*छंद : अनुष्ठूप 

अर्थ-
समुद्रावर सेतू बांधणारा माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करोत.. दशमुखी रावणाचा नाश करणारा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करोत.. 
बिभीषणाला श्री (राजश्री) देणारा माझ्या पावलांचं रक्षण करोत.. सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करोत..

विवरण-
अश्याप्रकारे मस्तक, नेत्र, नासिका, हृदय, हात, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या इत्यादी सर्व अवयवांचं रक्षण करण्याच्या प्रार्थनेचा शेवट माझ्या 'सर्व शरीरा'चं संरक्षण कर म्हणून होतो.. श्रीराम हे केवळ आदर्श पुरुष नसून ते 'आनंदकंद' (आनंदाचा स्रोत) आहेत, जे मनाला शांतता आणि शरीराला आध्यात्मिक ऊर्जेद्वारे अभय देतात म्हणून सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या शरीराचं रक्षण करो असं म्हटलं आहे..  
शरीराच्या प्रत्येक अंगाचं रक्षण करण्यासाठी आणि जीवनात आनंद व शांती टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण शरणागतीची भावना व्यक्त केली आहे.. 

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षणासाठीचं हे कवच इथं समाप्त होतं.. दहाव्या श्लोकापासून सुरु होणारी फलश्रुति पुढच्या भागात पाहू..

*अनुष्ठूप छंद : एका श्लोकात एकूण ४ चरण.. प्रत्येक चरणात ८ अक्षरं..     
एक अतिशय लोकप्रिय व प्राचीन असा हा वार्णिक छंद.. रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेतील बहुतांश श्लोक याच छंदात रचलेले आहेत.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************