कुरूक्षेत्रावर, धर्मयुद्ध सुरू होण्याच्या ऐनवेळी अर्जुनाच्या मनावर, विचारांवर आप्तेष्टांच्या प्रेमापोटी दाटून आलेलं मळभ दूर सारण्यासाठी, त्याला पुनच्छ क्षात्रधर्माला उद्युक्त करण्यासाठी, भगवान श्रीकृष्णांनी त्याला दिलेला उपदेश म्हणजे 'श्रीमद् भगवद् गीता'.. तो सुटसुटीतपणे ‘गीता’ या नावाने ओळखला जातो..
'गीता' म्हणजे मानव (अर्जुन) आणि सृष्टीकर्ता (श्रीकृष्ण) यांच्यातील दिव्य संवाद! अंतरात्म्यानं (श्रीकृष्ण) आत्म्याला (अर्जुन) दिलेला उपदेश!!
'गीता' म्हणजे सत्याचा साक्षात्कार असलेले एक महाकाव्य!!!
कसं आहे भगवद् गीतेचं अंतरंग?..
'गीता' ही अठरा अध्यायांत विभागलेली असून, एकूण श्लोकसंख्या सातशे एक आहे.. ह्या श्लोकांतून वेदं, उपनिषदं यांचं सार आणि अंतिम सत्य संक्षिप्त रूपानं सांगितलं आहे.. गीता केवळ अर्जुनासाठी ‘युध्द कर’ एवढाच उपदेश करत नाही तर मानव जातीच्या उद्धारासाठी, समाज्याच्या कल्याणासाठी प्रबोधन ही करते..
गीतेच्या सर्व अध्यायात ब्रह्मतत्वाचं वर्णन असले तरी, काही अध्याय ब्रह्म जाणून त्याचं प्रतिपादन करतात, तर काही ब्रह्माचं अस्तित्व दर्शवतात, तर काही ब्रह्म जाणताना त्यांच्या गुणांसह ब्रह्मरूपच होतात..
'गीता'तील प्रत्येक अध्यायात वेगवेगळे 'योग' सांगितले आहेत.. 'योग' ही शरीर आणि मनाची, विचार आणि बुद्धीची, भावना आणि वर्तनांची संतुलित अवस्था आहे.. आणि ह्या योगशास्त्राद्वारे श्रीभगवान अर्जुनाच्या विषादावर उपदेश करतात..
'गीता'ला 'गीतोपनिषद' म्हणून ही संबोधलं जातं.. गीता उपनिषदांचा अर्थ सांगत असल्यानं तिला 'उपनिषदांचं उपनिषद' असं ही म्हणलं जातं..
'गीते'तील ज्ञानामुळं अत्युच्च समाधान आणि आनंद तर मिळतोच पण त्याचबरोबर मोक्षाचा मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून 'गीते'ला 'मोक्षशास्त्र' ही म्हणलं गेलं आहे..
कुरुक्षेत्रावर, भगवान श्रीकृष्णांनी गीता उपदेश फक्त अर्जुनाला केला असला तरीही श्रीकृष्ण मुखोदमूक गीता तिघांनी ऐकली अशी मान्यता आहे.. अर्जुनानं प्रत्यक्षरित्या, संजयनं अप्रत्यक्षरित्या प्रतिभेच्या रूपातून आणि हनुमानानं अदृश्य रूपात अर्जुनाच्या रथाच्या ध्वजावर बसून.. वेदव्यासांनी वरदान दिलेल्या दिव्यचक्षूनं संजयनं जे पाहिलं ते उपरोक्षरित्या महाराज धृतराष्ट्रांना सांगितलं.. आणि हनुमानानं ते वेद व्यासांना.. असं ही मानलं जातं कि भीमाचा नातू, घटोत्कच पुत्र बार्बारिकनं आपल्या दिव्यश्रवणशक्तीनं गीता ऐकली होती..
ह्या महाकाव्यांत बोलणाऱ्या व्यक्तिरेखा चार आहेत..
१. धृतराष्ट्र.. ह्या महाकाव्याच्या पहिल्या श्लोकाचा मान मिळालेला हस्तिनापूर सम्राट आणि कौरवांचा पिता.. 'संजय, माझी आणि पांडूची मुलं युद्धभूमीवर काय करत आहेत?' ह्या प्रश्नानं झालेली ही सुरुवात..
२. संजय.. धृतराष्ट्राचा सारथी आणि युद्धकाळापुरते दिव्यचक्षू मिळालेला युद्धाचा वार्ताहर.. याला ४१ श्लोक आहेत..
३. अर्जुन.. धनुर्धारी पांडव ज्याला भगवान श्रीकृष्णांनी गीतोपदेश केला.. याच्या मुखी ८४ श्लोक आहेत..
४. श्रीकृष्ण.. साक्षात भगवान.. ज्यांनी युद्धभूमीवर हे तत्वज्ञान ५७४ श्लोकांमधून अर्जुनाला सांगितलं..
भगवद् गीतेच्या अठरा अध्यायांचं सार..
'गीता'तील तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी कोणत्या कुरुक्षेत्राची, युद्धभूमीची गरज नाही.. अर्जुनाच्या विषादासारखेच असंख्य प्रश्न, समस्या आपल्यापुढं काल ही होत्या, आज ही आहेत आणि उद्या ही असतील..
तुकाराम महाराज म्हणतात, "रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग । अंतर्बाह्य जग आणि मन।।"
प्रत्येकाचं सुख-दुःख वेगळं तसंच प्रश्न ही वेगळे आणि उत्तरं ही वेगळी.. 'गीता'चं मोठ्ठेपण ह्यातच आहे कि भिन्न स्वभाव, बुद्धी, परिस्थती, समस्या ह्यासर्वांवर प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणं, साधनेप्रमाणं ह्यात उत्तरं सापडतात.. एक एक अध्यायाची पायरी रचत 'गीता' अठरा अध्यायांतून सार्थ जीवन जाणण्याचा मंत्र देत निजधामाच्या द्वारापर्यंत घेऊन जाते..
- अध्याय १ - अर्जुनविषादयोग
- चुकीचा विचार ही जीवनातील एकमेव समस्या आहे.. त्यामुळं जेव्हा दडपण किंवा गोंधळल्यासारखं वाटेल तेव्हा आधी थोडा वेळ थांबा.. नंतर संपूर्ण परिस्थितीचा अंदाज घेऊन, मनस्थितीची जाणीव करून घेऊन निर्णय घ्या..
- अध्याय २ - सांख्ययोग
- कर्तव्य करा पण त्याच्या परिणामांचा विचार करू नका.. कारण अर्धा ताण हा प्रत्यक्ष कृतीमुळं नाही तर परिणामांविषयीच्या अतिविचारामुळं निर्माण होतो..
- अध्याय ३ - कर्मयोग
- 'प्रेरणेला' गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जातं.. त्यामुळं प्रेरणा मिळण्याची वाट पाहू नका.. आपली भूमिका आणि कर्तव्य ओळखा.. तसंच तीव्र आवडीनिवडींच्या आहारी न जाता ते कर्म प्रामाणिकपणे करत राहा.. नि:स्वार्थीपणा हाच प्रगती आणि समृद्धीचा एकमेव मार्ग आहे..
- अध्याय ४ - ज्ञानकर्मसंन्यासयोग
- जीवन एका उच्च ध्येयाशी जोडून घ्या.. जेव्हा जीवन योग्य ज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानुसार चालतं तेव्हा ते मानसिक शांततेत व्यत्यय आणत नाही..
- अध्याय ५ - कर्मसंन्यासयोग
- शांतता मिळवण्यासाठी जबाबदाऱ्यांपासून पळून जाण्याची गरज नाही.. कर्तव्य करताना आंतरिक आसक्तीचा, व्यक्तित्वाच्या अहंकाराचा त्याग करून ईश्वराच्या ठिकाणी मन स्थिर करा..
- अध्याय ६ - आत्मसंयमयोग
- शिस्तबद्ध मन सर्वोत्तम मित्र तर अनियंत्रित मन सर्वात मोठा शत्रू.. म्हणूनच साधना, सराव आणि शिस्तीच्या साहाय्यानं नेहमी मनाला प्रशिक्षित करा.. दररोज उच्च चेतनेशी जोडले राहा..
- अध्याय ७ - ज्ञानविज्ञानयोग
- केवळ ईश्वरी तत्त्वच खऱ्या परिपूर्णतेचा स्रोत आहे.. परंतु क्षणभंगुर इच्छा सतत आपल्याला त्यापासून दूर ओढत असतात.. म्हणून जेव्हा कधी रिकामंपण किंवा विलग झाल्यासारखं वाटेल तेव्हा केवळ ईश्वराचाच आश्रय घ्या..
- अध्याय ८ - अक्षरब्रह्मयोग
- अत्यंत भीती, असहाय्यता आणि अनिश्चिततेच्या क्षणी मन अशा दिशेनं धाव घेतं जिथं जाण्याची त्याला सवय झालेली असते – म्हणजेच पळवाट शोधण्याकडं.. त्यामुळं, अशा वेळी जर खरी शांतता हवी असेल, तर दररोज साधना करण्याची, स्वतःला ईश्वराच्या चरणी समर्पित करण्याची आणि ईश्वरावर विश्वास ठेवण्याची सवय मनाला लावा..
- अध्याय ९ - राजविद्याराजगुह्ययोग
- जर एकटं किंवा कोणाचाही आधार नाही असं वाटत असेल तर हे लक्षात ठेवा की ईश्वरी शक्ती सदैव तुमच्या सोबत आहे.. तिची उपस्थिती अनुभवण्यासाठी, आधार व सुरक्षिततेची जाणीव होण्यासाठी केवळ विश्वास आणि निखळ भक्ती आवश्यक आहे..
- अध्याय १० - विभूतीयोग
- सर्वत्र देवत्व पहा.. सभोवताली दिसणारं, प्रशंसक असं प्रत्येक महान स्वरूप हे त्या ईश्वरी तत्त्वाचंच प्रतिबिंब आहे.. जेव्हा आपण त्याचं कौतुक करायला शिकतो तेव्हा आपल्या अंतर्मनात प्रेरणा जागृत होते..
- अध्याय ११ - विश्वरूपदर्शनयोग
- जेव्हा अहंकाराला ठेच लागते तेव्हा वास्तव स्वीकारणं कठीण जातं.. पण 'जीवन हे एका विशाल वैश्विक व्यवस्थेचा एक छोटासा भाग आहे'- हे सत्य जसं आहे तसं पाहण्यासाठी पुरेसं समर्पण करा..
- अध्याय १२ - भक्तियोग
- भावनिक असुरक्षितता आणि आंतरिक असंतुलन दूर करण्यासाठी 'भक्ती' हा सर्वात प्रभावी उपाय आहे.. म्हणूनच, कर्म, उपासना आणि ध्यान यांच्या माध्यमातून ईश्वराप्रती भक्ती करा.. मन परमात्म्याठायी स्थिर करा..
- अध्याय १३ - क्षेत्रक्षेत्रज्ञविभागयोग
- आपले विचार किंवा भावना म्हणजे आपण नाही तर आपण केवळ एक साक्षीदार आहोत.. कोणतीही प्रतिक्रिया त्वरित देण्याऐवजी, क्षणभर थांबा, परिस्थितीचं निरीक्षण करा आणि मगच प्रतिसाद द्या..
- अध्याय १४ - गुणत्रयविभागयोग
- आपली मनस्थिती, निवडी आणि कृती यांवर नेहमीच सत्व, रज आणि तम या तीन गुणांचा प्रभाव असतो.. म्हणून सर्वप्रथम हे गुण नीट समजून घेऊन साधनेद्वारे स्वतःला सत्व गुणाच्या पातळीवर नेण्याचा प्रयत्न करा.. तुमच्या दृष्टिकोनाशी जुळणारी जीवनशैली जगा..
- अध्याय १५ - पुरुषत्तमयोग
- आयुष्यात बदल हा अटळ आहे.. त्यामुळं लोक, वस्तू आणि परिस्थितीशी अति-आसक्ती ठेवू नका.. ईश्वराशी घट्ट नातं जोडून त्यात स्थिर राहा.. चांगलं असो वा वाईट, आयुष्य जसं समोर येईल तसं स्वीकारा आणि हा विश्वास ठेवा की खुद्द भगवंतांनीच तुमच्या हितासाठी त्याची योजना केली आहे..
- अध्याय १६ - दैवासुरसंपद्विभागयोग
- दैवी आणि नकारात्मक अशा दोन्ही गुणांचं अस्तित्व आपल्यामध्ये असतं.. ज्या गुणांची जोपासना आपण करतो तेच गुण आपलं आयुष्य, आपले नातेसंबंध आणि भवितव्य घडवतात.. दैवी गुण प्रगतीकडं नेतात तर नकारात्मक गुण अधोगतीस कारणीभूत ठरतात..
- अध्याय १७ - श्रद्धात्रयविभागयोग
- जेव्हा विश्वास कमकुवत असतो तेव्हा दिशाहीन आणि गोंधळल्यासारखं वाटतं.. अशा वेळी अगदी छोट्या गोष्टीही सहज विचलित करू शकतात.. म्हणून दैनंदिन निर्णय, निवडी आणि साधनेद्वारे विश्वास अधिक दृढ व परिपूर्ण करा..
- अध्याय १८ - मोक्षसंन्यासयोग
- नीतिमत्तेच्या मार्गावरून चालताना तुम्ही कधीही एकटे नसता.. ईश्वरी तत्त्व सदैव तुमच्या अंतर्यामी संचार करत असतं आणि तीच आयुष्यातील सर्वात मोठी विजयगाथा ठरते..
हरी ॐ तद् सद्
॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥
********************
-मी मधुरा..
************************************************
