Thursday, March 26, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : कवच : श्लोक ४ ते श्लोक ९



पहिल्या तीन श्लोकांपर्यंत आपण नीलवर्णी, कमलनयन, सालंकृत, जटामुकुटधारी, माता सीता आणि लक्ष्मण यांच्यासोबत असणाऱ्या, हातात धनुष्यबाण, तलवार असणाऱ्या श्रीरामप्रभुंच्या स्वरूपाचं ध्यान करून त्यांना हृदयात विराजमान केलं..   

आता पुढं..
चौथ्या श्लोकाचं दुसरं चरण 'शिरो मे राघवः' पासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. 
कवच- हा मंत्रविद्येतील एक प्रकार आहे.. यात देवतेला आपल्या शरीराचं रक्षण करण्याची प्रार्थना केलेली असते.. रोगराई सारख्या स्थूल कवचाहून अधिक शक्तीशाली कवच ही असतात जी भूतबाधा, करणी यासारख्या सूक्ष्म वाईट शक्तीपासून रक्षण करतात.. 

चौथ्या श्लोकापासून ते नवव्या श्लोकापर्यंत श्रीरामांकडं शरीराच्या प्रत्येक अवयवाची रक्षा करण्याची प्रार्थना केली आहे.. 


रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीं सर्वकामदाम् ।
शिरो मे राघवः पातु भालं दशरथात्मजः॥४॥

प्राज्ञः : प्रज्ञावान, सूज्ञ  पापघ्नीं : पापाचा नाश करणारी  सर्वकामदाम् : सर्व इच्छा पूर्ण करणारी 
राघवः : रघू कुलाचा वंशज  दशरथात्मजः : दशरथ + आत्मजः (दशरथाचा मुलगा)  पातु : रक्षण करणं 

अर्थ- 
रामरक्षा पापांचा नाश करणारी व सर्व इच्छा पूर्ण करणारी असल्याने सूज्ञ लोकांनी तिचं पठण करावं..
रघूकुल वंशज राघव राम माझ्या मस्तकाचं रक्षण करो.. दशरथ पुत्र माझ्या कपाळाच रक्षण करो..

विवरण-
रघुकुल ज्ञान, पराक्रम, विवेक यांचं प्रतीक मानलं गेलं आहे.. मस्तक विचारांचं, बुद्धीचं केंद्रस्थान आहे.. अनिष्ट विचारांपासून मुक्ती, सकारात्मकता आणि बुद्धीच्या स्थैर्यासाठी हे राघव तू माझ्या मस्तकाचं रक्षण कर.. 
'दशरथ' ज्याची दहा इंद्रियांवर पकड आहे अश्या दशरथाचा पितृभक्त पुत्र राम.. विवेकबुद्धीनं निर्णय घेण्यासाठी, ताणतणावापासून मुक्त होण्यासाठी, विचारांच्या सकारात्मक ऊर्जेसाठी तू माझ्या कपाळाचं रक्षण कर.. 


कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियः श्रुती।
          घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः॥५॥           

कौसल्येयो : कौसल्या पुत्र  दृशौ : दृष्टी  श्रुती : ऐकलेलं, वेद, प्राचीन शास्त्रांद्वारे प्रकट झालेलं ज्ञान (श्रवणेंद्रिय)
घ्राणं : नासिका  मखत्राता– मख (यज्ञ) + त्राता (रक्षण करणारा)  सौमित्रिवत्सल : सौमित्रेचा पुत्र (लक्ष्मण) 
पातु : रक्षण करणं 

अर्थ- 
कौसल्येचा पुत्र माझ्या दृष्टीचं रक्षण करो.. विश्वामित्रांना प्रिय (असलेले श्रीराम) माझ्या कानांचं रक्षण करोत.. 
यज्ञाचं रक्षण करणारे (श्रीराम) माझ्या नाकाचं रक्षण करोत..  सौमित्रेचं ज्यांच्यावर प्रेम आहे (श्रीराम) माझ्या मुखाचं रक्षण करो..

विवेचन-
कौसल्यामाते सारखी भक्ती ,वात्सल्य, ममता माझ्या डोळ्यांत असुदे म्हणून हे कौशल्यपुत्र तू माझ्या डोळ्यांचं रक्षण कर.. 
विश्वामित्रांनी जसं योग्य आणि उचित ज्ञानाचे संस्कार श्रुतीद्वारे केले तसेच उचित संस्कार होण्यासाठी हे विश्वामित्रांना प्रिय असणाऱ्या तू माझ्या कानांचं रक्षण कर.. उचित आणि योग्य तेच माझ्या कानांद्वारे ग्रहण होऊदे.. 
श्वसनातून, नाकाद्वारे होणाऱ्या प्राणायामातून, शरीराचा अंतर्गत सुरु असणाऱ्या यज्ञाचं, त्या प्राणशक्तीचं तू रक्षण कर..
सौमित्रेनं आपल्या पुत्राला लक्ष्मणाला रामाच्या सेवेसाठी अर्पण केलं.. लक्ष्मणानं रामाची सावली बनून, मुखानं रामनाम घेत सेवा केली.. जसं लक्ष्मणानं रामाचं रक्षण केलं तसंच माझ्या मुखाचं (वाणीचं) रक्षण कर..


जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतवन्दितः।
          स्कन्धौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः॥६॥           

विद्यानिधिः : विद्येचा संचय  भरतवन्दितः : भरताला वंदनीय  
स्कन्धौ : खांदा  दिव्यायुधः : दिव्यास्त्र  भग्नेशकार्मुकः :भग्न + ईश (शिव) + कार्मुक: (धनुष्य)
पातु : रक्षण करणं
 
अर्थ-
सर्व विद्यांचा संचय असणारा (राम) माझ्या जिभेचं रक्षण करो.. भरताला वंदनीय (राम) माझ्या कंठाचं रक्षण करो.. 
दिव्यास्त्र असणारा (राम) माझ्या (दोन्ही) खांद्यांचं रक्षण करो.. शिवधनुष्याचा भंग करणारा (राम) माझ्या (दोन्ही) बाहूंचे रक्षण करो.. 

विवेचन-
जिभेच्या टोकावर विद्देचा वास असतो म्हणून सर्व विद्यांचा अधिपती असणारा तू जिभेचं रक्षण कर.. ज्याप्रमाणे भरताच्या कंठातून रामाची वंदना निघाली त्याचप्रमाणे माझ्या कंठातूनही सदैव सत्य आणि रामनाम यावे म्हणून भरताला वंदनीय असणारा तू माझ्या कंठाचं रक्षण कर..  
जबाबदाऱ्या, संकटे पेलण्याचं सामर्थ्य मिळवण्यासाठी दिव्यास्त्रधारी मजबूत खांदे असणारा तू माझ्या खांद्याचं रक्षण कर.. सीता स्वयंवराच्या वेळेस शिवधनुष्याला प्रत्यंचा चढवत असताना धनुरभंग झाला.. धनुष्याचा भंग करण्यासाठी ताकदवान भुजा असणारा तू माझ्या भुजांचं रक्षण कर.. 


करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित्।
           मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः॥७॥            

जामदग्न्यजित् : जमदग्निपुत्र (परशुराम)
खरध्वंसी : खर (राक्षस) + ध्वंसी (नाश करणारा)   जाम्बवदाश्रयः : जाम्बवंताला आश्रय देणारे
पातु : रक्षण करणं

अर्थ- 
सीतेचे पती माझ्या हातांचं रक्षण करोत.. परशुरामाला जिंकणारे माझ्या हृदयाचं रक्षण करोत..
खर नावाच्या राक्षसाचा नाश करणारे माझ्या मध्यभागाचं रक्षण करोत.. जांबुवंताला आश्रय देणारे माझ्या नाभीचं रक्षण करोत..

विवेचन-
शक्तिरूपिणी सीतेचा हात हातात असणाऱ्या तू माझ्या हातांचं रक्षण कर..

सीता स्वयंवराच्या वेळी शिवधनुष्य भंग झाल्यावर, शिवधनुष्य कोणी भंग केलं ह्याचा जाब विचारण्यासाठी जमदग्नीपुत्र परशुराम विवाहमंडपात येतात.. त्यावेळी रामाची परीक्षा घेण्यासाठी ते त्यांच्याकडील 'वैष्णव धनुष्या'स प्रत्यंचा लावण्यास सांगतात.. राम प्रत्यंचा आणि बाण लावून तो बाण कुठं मारू म्हणून विचारणा करतात.. त्यावर परशुराम म्हणतात रामा, मी २१ वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली आहे.. त्यावेळेस काही पाप झालं असेल तर त्या पापाचा नाश करावा.. श्रीरामानं तसं केलं आणि परशुरामांचं हृदय जिंकलं.. म्हणून पराक्रमानं परशुरामांचं हृदय जिंकणारा तू माझ्या हृदयाचं रक्षण कर..

लक्ष्मणानं शूर्पणखाचं नाक, कान कापल्यावर खर व दूषण हे राक्षस त्यांच्याशी युद्ध करायला येतात.. भगवान शंकराच्या वरामुळं त्यांचा मृत्यू कोणाच्याही हातून न होता आपापसात युद्ध करून होणार असतो.. रामाच्या मोहनास्त्रामुळं त्यांना एक दुसऱ्यात राम दिसल्यानं ते आपापसांत युद्ध करतात आणि त्यांचा मृत्यू होतो.. 'खर' सारख्या अशुभ वाईट प्रवृत्तींचा नाश करतात.. शरीराच्या मध्यभागांत, पोटाच्या भागात सर्व प्रकारच्या इंद्रियांची प्रवृत्ती व विकार राहतात म्हणून खर राक्षसाचा नाश करणारा तू माझ्या मध्यभागाचं रक्षण कर..

रावण वधाच्यावेळी राम अवतारात भगवान विष्णूंना मदत करण्यासाठी सर्व देव देवता आपआपल्या अंश रूपानं पृथ्वीवर अवतरीत झाले.. ब्रम्हदेवापासून जांबुवंत, इंद्रापासून वाली, सूर्यापासून सुग्रीव, बृहस्पती पासून तार, कुबेरापासून गंधमादन, विश्वकर्मापासून अंगद, अश्विनीकुमारांपासून नल-नील, वरुणापासून सुषेन, पर्जन्यापासून शरभ, वायूपासून हनुमंत इत्यादी.. ब्रह्मदेव ज्यांची उत्पत्ती विष्णूच्या नाभीतून झाली आहे त्यांचा अंश जांबुवंत.. म्हणून जांबुवंताला आश्रय देणारा तू माझ्या नाभीचं रक्षण कर.. 


सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः।
            ऊरू रघूत्तमः पातु रक्षःकुलविनाशकृत् ॥८॥              

सक्थिनी : (सक्थि) जांघेची हाडं
उरू : मांड्या (उर्वस्थी : कंबरे पासून गुडघ्या पर्यंत असणारी हाडं)  रक्षःकुलविनाशकृत् : राक्षसकुलाचा विनाश करणारा.. 
पातु : रक्षण करणं

अर्थ- 
सुग्रीवाचा स्वामी माझ्या कंबरेचं रक्षण करोत.. हनुमंताचा प्रभू माझ्या दोन्ही जांघांचं रक्षण करोत..
राक्षसकुलाचा विनाश करणारा रघुकुलश्रेष्ठ माझ्या दोन्ही मांड्यांचं रक्षण करोत..

विवरण-  
वालीच्या त्रासानं पीडित सुग्रीवाला तुझ्या (श्रीराम) आश्रयानं, तुझ्याशी कटिबद्ध झाल्यानं राज्य, स्वाभिमान, शक्ती परत मिळाली तसंच तू माझ्या कर्माची, शक्तीची आणि मनाच्या स्थिरतेची (कंबरेची) रक्षा कर.. कंबर हे शरीराचं केंद्रस्थान असून, दृढता आणि कर्माचं प्रतीक आहे.. कंबर हा आधार देणारा मध्यभाग आहे.. आयुष्यात कठीण प्रसंगात, कंबर कसून काम करण्याची शक्ती प्रभू रामरायानं द्यावी हा उद्द्येश.. 

सक्थिनी किंवा जांघेचा संबंध आसनस्थ राहण्याशी, स्थिर राहण्याशी जोडला जातो.. कामविकारांशी संबंधित मानला जातो.. या भागाचं रक्षण करण्याची प्रार्थना म्हणजे विषयांचा त्याग आणि नैतिकतेचं बळ मिळवणं.. ज्याचा विकारांवर ताबा आहे अश्या हनुमानाचे प्रभू तुम्ही माझ्या जांघांचं, मूलाधार चक्राचं रक्षण करून विषयासक्तीचा त्याग, स्थिरता, ताकद आणि नैतिक नैतिकतेचं बळ द्या..  


जानुनी सेतुकृत् पातु जङ्घे दशमुखान्तकः।
       पादौ विभीषणश्रीदः पातु रामोऽखिलं वपुः॥९॥        

जानुनी : जानु (गुडघा अनेकवचन)  सेतुकृत् : सेतुं करोति इति। (सेतू बांधणारा)  
जङ्घे : पोटऱ्या  दशमुखान्तकः दशमुख-अन्तकः (दशननाचा नाश करणारा)
रामोऽखिलं : रामस् अखिलं वपुः  : संपूर्ण शरीर
पातु : रक्षण करणं

अर्थ-
समुद्रावर सेतू बांधणारा माझ्या दोन्ही गुडघ्यांचं रक्षण करोत.. दशमुखी रावणाचा नाश करणारा माझ्या पोटऱ्यांचं रक्षण करोत.. 
बिभीषणाला श्री (राजश्री) देणारा माझ्या पावलांचं रक्षण करोत.. सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण करोत..

विवरण-
अश्याप्रकारे मस्तक, नेत्र, नासिका, हृदय, हात, कंबर, मांड्या, गुडघे, पोटऱ्या इत्यादी सर्व अवयवांचं रक्षण करण्याच्या प्रार्थनेचा शेवट माझ्या 'सर्व शरीरा'चं संरक्षण कर म्हणून होतो.. श्रीराम हे केवळ आदर्श पुरुष नसून ते 'आनंदकंद' (आनंदाचा स्रोत) आहेत, जे मनाला शांतता आणि शरीराला आध्यात्मिक ऊर्जेद्वारे अभय देतात म्हणून सर्वांना आनंद देणारा श्रीराम प्रभू माझ्या शरीराचं रक्षण करो असं म्हटलं आहे..  
शरीराच्या प्रत्येक अंगाचं रक्षण करण्यासाठी आणि जीवनात आनंद व शांती टिकवून ठेवण्यासाठी संपूर्ण शरणागतीची भावना व्यक्त केली आहे.. 

शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संरक्षणासाठीचं हे कवच इथं समाप्त होतं.. दहाव्या श्लोकापासून सुरु होणारी फलश्रुति पुढच्या भागात पाहू..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Thursday, March 5, 2026

सार्थ श्रीरामरक्षा : ध्यान : श्लोक १ ते ३


श्रीरामरक्षा स्तोत्र.. रक्षणकर्त्या रामाचं स्तोत्र.. ३८ श्लोकांचं हे संरक्षण कवच.. 
ह्या ३८ श्लोकांपकी काही श्लोक कवचाचे तर काही प्रभूंचं वर्णन, रामनामाचा महिमा, त्यांची अनेक विशेषणं, फलश्रुती यांचे तर काही वाल्मिकी, माता सीता, भक्तश्रेष्ठ हनुमंताचं स्मरण, वंदना करणारे.. 

'स्तोत्र' म्हणजे देवतेचं स्तवन, गुणगान किंवा स्तुती करणारी काव्यरचना.. 'स्तूयते अनेन इति स्तोत्रम्' म्हणजेच ज्याद्वारे स्तुती केली जाते ते स्तोत्र अशी याची व्याख्या.. स्तोत्रं ही श्लोक स्वरूपात संस्कृत भाषेत असतात..
स्तोत्र ह्या शब्दाची उत्पत्ती 'स्तु' म्हणजे स्तुती करणं ह्या धातूला 'त्र' म्हणजे रक्षण करणं हा प्रत्येय लागून झाली आहे.. 
यांच्या नियमित पठणानं भक्ताच्या भोवती संरक्षक कवच निर्माण होते आणि मनःशांती मिळते..

रामरक्षेच्या सुरुवातीला बुधकौशिक ऋषींनी 'श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य' म्हणजेच हे स्तोत्र 'मंत्र' पण आहेत असं सांगितलं आहे.. 
'मननात त्रायते इती मंत्र' म्हणजेच ज्याचं मनन केल्यानं आपलं रक्षण होतं..
मंत्रामध्ये एक नाद ध्वनी असतो.. ठराविक लयित, सुरात एखादा मंत्र जपला तर त्या ध्वनिलहरींतून एक विशिष्ट शक्ती निर्माण होते.. मंत्रजप म्हणजे मंत्रांचा तदर्थ भावपूर्ण जप, अर्थ समजून भावासह पुनःपुन्हा केलेला उच्चार..

🌸🌸🌸

श्रीगणेशायनमः।

अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमन्त्रस्य l
बुधकौशिकऋषिः।
श्रीसीतारामचन्द्रो देवता।
अनुष्टुप् छ्न्दः। सीता शक्तिः।
श्रीमद् हनुमान् कीलकम् ।
श्रीरामचन्द्रप्रीत्यर्थे जपे विनियोगः। 

अर्थ- श्रीगणेशाला नमन.. 
या रामरक्षास्तोत्ररूपी मंत्राचा (रचेता) ऋषि बुधकौशिक असून रचना अनुष्टुप छंदात केली आहे.. माता सीता आणि श्रीरामचंद्र ह्या मंत्राच्या देवता आहेत.. मंत्राची शक्ती सीता आहे तर हनुमान सुरक्षा कवच.. श्रीरामचंद्राचा (प्रेमानं भक्तिभावनेनं) जप करता यावा म्हणून हा स्तोत्ररूपी मंत्र निर्माण केला आहे..


विवरण-
उपासना ही सिद्ध मंत्रानं करायची असते.. 
प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला जो मंत्र किंवा स्तोत्र असेल त्याचा स्पष्ट उल्लेख असतो.. नंतर त्या मंत्राची सिद्धी करणारा ऋषी, मंत्रानं सिद्ध होणाऱ्या देवता, मंत्राचं सामर्थ्य असणारी शक्ती, मंत्राचं बीज, मंत्रामुळं होणारी फलप्राप्ती, मंत्राचा आधारस्तंभ आणि त्या मंत्राचा विनियोग यांचा उल्लेख असतो.. 

कीलक:  खिळा, खुंटी किंवा जोडणारा घटक..  
आध्यात्मिक संदर्भात याचा अर्थ मंत्राला 'किलित' (निश्चित करणे) म्हणजेच स्तोत्राची शक्ती जागृत करून ती सुरक्षित ठेवणे असा होतो.. 

रामरक्षेची रचना अनुष्टुप छंदात केली आहे असं असलं तरी काही श्लोकांची रचना त्रिष्ठुप, स्रग्धरा, शार्दूलविक्रीडित, वसंततिलका अश्या छंदात ही केली आहे..


|| अथ ध्यानम् ||

ध्यायेदाजानुबाहुम् धृतशरधनुषम् ।बद्धपद्मासनस्थम् ।
पीतं वासो वसानम् नवकमलदलस्पर्धिनेत्रं प्रसन्नम् ।
वामाङ्कारूढसीता-मुखकमल-मिलल्लोचनं नीरदाभम् ।
नानालङ्कारदीप्तं दधतमुरुजटामण्डनं रामचन्द्रम् ॥

|| इति ध्यानम् ||

अर्थ – आता ध्यान करूया..

आजानुबाहु म्हणजेच गुडघ्यापर्यंत लांब हात असलेल्या, धनुष्यबाण धारण केलेल्या, बद्धपद्मासनात बसलेल्या, पिवळ्या रंगाचं वस्त्र परिधान केलेल्या, नुकत्याच उमललेल्या कमळाच्या पाकळीप्रमाणं सुंदर प्रसन्न डोळे असणाऱ्या, डाव्या मांडीवर बसलेल्या सीतेच्या मुखकमलाकडं स्थिर दृष्टीनं पहात असणाऱ्या, पावसाळी मेघांप्रमाणं (श्यामवर्णाची) कांती असणाऱ्या

नानाविविध अलंकारांनी सुशोभित आणि मोठं जटामंडल धारण केलेल्या श्री प्रभू श्रीरामचंद्राचं

ध्यान करूया..  


विवरण-

स्तोत्र सिद्ध करण्यासाठी पठणापूर्वी ज्या देवतेचं स्तवन करायचं आहे त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर आणून, त्या देवतेचं ध्यान करायचं.. म्हणून सुरुवात 'अथ ध्यानम्' आता ध्यानाला सुरुवात करूया अशी होते.. 

भक्तांच्या रक्षणाकरिता हातात धनुष्यबाण असलेली, अलंकार आणि जटामंडलांनी सुशोभित बद्धपद्मासनात एकाग्र चित्तानं बसलेली, डाव्या मांडीवर शक्तीरूपिणी सीता असलेली अश्या प्रभू रामचंद्रांच्या स्वरूपाचं 'इति ध्यानम्' आपण ध्यान करूया.. 


चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।

एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥१॥ 


शतकोटिप्रविस्तरम्: शंभर कोटी श्लोकां इतकं विस्तृत  

पुंसां: पुरुषांची


अर्थ– श्रीरघुनाथाचं चरित्र शंभर कोटी श्लोकांत मावेल इतकं विस्तृत आहे.. त्यातील केवळ एक अक्षरसुद्धा पुरुष जातीची मोठी पापं नष्ट करण्यास समर्थ आहे..



ध्यात्वा नीलोत्पलश्यामं रामं राजीवलोचनम् ।

                    जानकीलक्ष्मणोपेतं जटामुकुटमण्डितम् ॥२॥                   


ध्यात्वा: ध्यान करून   नीलोत्पलश्यामं: नील + उत्पल (कमळ )+ श्यामं    राजीव: कमळ

जानकीलक्ष्मणोपेतं: जानकी + लक्ष्मण + उपेतं (जवळ)


अर्थ– ज्यांचा वर्ण नीलकमलाप्रमाणं श्यामरंगी आहे, कमळासारखे दीर्घ आणि प्रफुल्ल असे ज्यांचे डोळे आहेत, ज्यांच्या बरोबर सीता आणि लक्ष्मण आहेत, जटारुपी मुकुटामुळं जे सुशोभित झाले आहे..



सासितूणधनुर्बाणं पाणिं नक्तंचरान्तकम् ।

स्वलीलया जगत्त्रातुमाविर्भूतमजं विभुम् ॥ ३॥


सासितूणधनुर्बाण: स + असि ( तलवार )+ तूण ( भाता ) + धनुर् + बाण 
नक्तंचरान्तकम्: नक्तं ( रात्र ) + चर + अंतकम्   नक्तंचर: निशाचर म्हणजे दानव, राक्षस
जगत्त्रातुमाविर्भूतमजं: जगत् + त्रातुम् (जगाच्या रक्षणासाठी) + आविर्भूतम् (स्वतःला प्रकट केले) + अजम् (जन्मरहित ) 
विभुम्: व्यापून उरणारा

अर्थ– ज्यांच्या हाती धनुष्यबाण आणि भात्या बरोबरच तलवारही आहे, जे दानव राक्षसांचा नाश करणारा आहेत, मूलत: जन्मरहित व सर्वव्यापक असूनही ज्यांनी जगाच्या रक्षणासाठी स्वतःला मर्यादित स्वरूपात सहज लीलेनं प्रकट केलं आहे.. 

( अश्या श्रीरामांचं ध्यान करूया.. )


विवरण-

श्लोकांत वर्णन केलेला 'हाती तलवार असलेला राम' हे दृश्य सहसा कुठं दिसत नाही..   

सीतामातेचा शोध घेत असताना राम आणि लक्ष्मणानं दंडकारण्यात कबंध नावाच्या विचित्र, धडालाच तोंड आणि डोळे असलेल्या राक्षसाचा वध तलवारीनं केला होता.. ह्या  शापित गंधर्वाचे हात कापून, त्याला अग्नीत दहन केल्यानंतर तो मुक्त झाला आणि त्यानं रामाला सुग्रीवाशी मैत्री करण्याचा सल्ला दिला होता.. 


तिसऱ्या श्लोकांपर्यंत श्रीराम स्वरूपाचं वर्णन केलेलं आहे.. चौथ्या श्लोकाच्या दुसऱ्या चरणापासून रामरक्षा कवचाची सुरुवात होते.. ती पुढच्या भागात पाहूया..


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।

🙏



-मी मधुरा.. 

************************************************

Sunday, February 15, 2026

सार्थ श्रीरामरक्षा



मुल चार-पाच वर्षाचं झालं की त्याला तुळपुळे गुरुजींकडं पाठवायचं हा त्या काळचा म्हणजे माझ्या लहानपणीचा पायंडा.. अक्षरओळख होण्याआधी त्याची स्तोत्रांशी तोंडओळख सुरु व्हायची.. हातात छोटीशी कापडी पिशवी.. त्यात गणपती स्तोत्र, भीमरूपी स्तोत्र, मनाचे श्लोक अशी छोटी छोटी पुस्तक.. 'स्तोत्र' हा शब्द उच्चारता ही न येण्याचं हे वय..
वर्गाची सुरुवात सूर्यनमस्कारानं.. वयाप्रमाणं पाच, अकरा, एकवीस सूर्यनमस्कार घालायचे.. गुरुर्ब्रह्मा, वक्रतुंड सारख्या लहान स्तोत्रांनी सुरुवात होऊन गणपती स्तोत्र, भीमरूपी, मनाचे श्लोक शिकवले जायचे.. गणपती अथर्वशीर्ष, रामरक्षा तोंडपाठ झाली, स्पष्ट म्हणता आली की गुरुजींकडचं शिक्षण पूर्ण व्हायचं.. इथलं शिक्षण संपलं तरी स्तोत्र पठण हा दिनचर्येचा अविभाज्य भाग असायचा.. अंघोळ झाली की सगळी स्तोत्रं म्हणायची.. पण रामरक्षा मात्र, संध्याकाळी दिवेलागण झाली कि, शुभंकरोती नंतर.. प्रत्येक श्लोकांचा, स्तोत्रांचा क्रम ही ठरलेला..

.. तर नित्यपाठ, परवचा वर्गात मी रामरक्षा म्हणायला शिकले.. आज ही ती अगदी उत्तम म्हणते.. पण ती का म्हणायची, तिचा नेमका अर्थ काय हे तेव्हा ही माहिती नव्हतं आणि आत्ता ही नाही.. अर्थ माहिती करून घ्यावा अशी विचारधाराच नव्हती.. स्पष्ट उच्चार आणि पाठांतरामुळं होणारी तल्लख बुद्धी हाच मुख्य उद्द्येश.. काही वर्षांपूर्वी विदुषी डॉ धनश्री लेले यांच्या व्याख्यानात रामरक्षा कवच आणि त्याचा अर्थ ऐकला आणि भारावून गेले.. अश्या पद्धतीनं रामरक्षा शिकली पाहिजे असं वाटलं.. 

२०२६ मध्ये नवीन काय शिकावं हा विचार करत असताना 'रामरक्षा' स्तोत्राची आठवण झाली.. आणि वर्षाच्या सुरुवातीस येणाऱ्या 'राम नवमी'चं औचित्य साधून लगेचच अभ्यासाला सुरुवात करायची असं ठरवलं..

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

सुरुवात अगदी सुरुवातीपासूनच करूया.. म्हणजे रामरक्षेच्या निर्मितीपासून..

सगळ्या पौराणिक कथांप्रमाणे ह्या कथेची सुरुवात ही कैलासात होते..  
एकदा माता पार्वतीनं भगवान शंकारांना विचारलं की श्रीविष्णुसहस्रनामावली सारखं रामाचं एखादं स्तोत्र आहे का?.. तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीस या ‘रामरक्षा’ स्तोत्रविषयी सांगितलं.. 

आद्य-कवी वाल्मिकींनी १०० कोटी श्लोक असलेल्या रामायण महाकाव्याची निर्मिती केली.. हे सुमंगल, सुरचित रामायण देव, दानव, मानव सर्वांनाच हवं असं वाटू लागलं.. योग्य न्यायाच्या अपेक्षेनं ते भगवान शंकरांकडं गेले.. ते कुणाला मिळावं यासाठी खूप वादविवाद चर्चा झाली.. शेवटी भगवान शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचं ठरवलं..

१०० ही सम संख्या असल्यानं सामान वाटणी केल्यावर एक श्लोक राहिलाच.. अनुष्टुप छंदातील ह्या श्लोकात असणाऱ्या एकूण ३२ अक्षरांची ही वाटणी झाली.. वाटणी नंतर  शिल्लक राहिलेली दोन अक्षरं भगवान शंकरांनी स्वत:कडं ठेवली आणि सर्वांना जाण्यास सांगून ते ध्यानासाठी बसले..
भगवानांनी स्वतःकडं ठेवून घेतलेली ती दोन अक्षरं कोणती हे जाणून घेण्यासाठी देव, दानव, मानव ते ध्यानातून उठण्याची वाट पाहू लागले.. खूप वेळ झाला तरी ध्यानातून ते बाहेर येत नाहीत हे जाणून कंटाळून सगळे निघून गेले.. पण एक ऋषीं मात्र तिथंच थांबले.. वाट पाहता पाहता त्यांना डोळा लागला.. आणि नेमकं त्याचवेळी भगवान ध्यानातून बाहेर आले.. आपली वाट पाहून डोळा लागलेल्या ऋषींकडं पाहून त्यांना त्यांचं खूप कौतुक वाटलं.. ते ऋषी म्हणजे बुधकौशिक ऋषी.. आशीर्वाद म्हणून ऋषींच्या स्वप्नात जाऊन भगवानांनी रामरक्षा सांगितली.. भगवान शंकरांच्या वाणीमुळं रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर मंत्रमय आणि तारक झालं आहे.. 

स्वप्नांत भगवानांनी सांगितली ही रामरक्षा 'बुधकौशिक' ऋषींनी लिहून काढली..
याचं वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेलं आहे.
आदिष्टवान्यथा स्वप्ने रामरक्षामिमां हर:। तथा लिखितवान्प्रात: प्रबुध्हो बुधकौशिक: ।।

🌸🌸🌸

आता ज्या बीजाक्षरांपासून रामरक्षेची निर्मिती झाली त्या 'रा' आणि 'म' बीजाक्षरांविषयी थोडंसं..

असं म्हणतात कि ही बीजाक्षरं ॐ इतकीच अनादी आहेत..

वैष्णवांचा अष्टाक्षरी मंत्र 'ॐ नमो नारायणाय' आणि शैवांचा पंचाक्षरी मंत्र 'नमः शिवाय' ह्या दोन मंत्रांच्या बीजापासून राम ह्या शब्दाची उत्पत्ती होते.. भगवान श्री विष्णूचा अवतार 'श्री राम' जन्माला येण्या आधीपासून 'राम' मंत्र रूपात अस्तित्वात होता.. 

'राम' चा अजुनी एक अर्थ सांगितला जातो.. तो असा..
प्रत्येक अक्षरांशी संबंधित अशी एक देवता असते..
र + आ + म = राम 
र म्हणजे अग्नी, आ म्हणजे सूर्य, म म्हणजे चंद्र 
पापाचा नाश करून अज्ञान दूर करून मनःशांती देतो तो राम.. म्हणजेच परब्रह्म परमात्मा.. 

'शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुल तिलक नाम दासा अंतरी'.. 
ह्या 'लवलवती विक्राळा' शंकराच्या आरतीच्या शेवटच्या दोन ओळी.. समर्थ रामदासांनी ह्या ओळीत बीजाचं सार सांगितलं आहे.. १०० कोटी श्लोकातून राहिलेलं बीज, ह्या श्लोकांचं सार 'रा आणि म'.. राम.. ह्या बीजाक्षरांचा जप भगवान शंकर सतत करत असतात.. 

भगवान शंकरांचं रामनामाबद्दलचं प्रेम भक्ती, रामनामाची महती सांगायची तर खुद्द त्यांच्या 'काशी'त, जिथं मरण आलं असता निश्चित मोक्षप्राप्ती होते अशी मान्यता आहे अश्या 'काशी'त, जळणाऱ्या प्रत्येक देहाच्या कानात 'श्रीराम जय राम जय जय राम' हा तारक मंत्र म्हंटला जातो.. 

🌸🌸🌸

बुधकौशिक ऋषींच्या कृपेनं प्राप्त हे स्तोत्र एक वरदान आहे.. 
आरोग्य, दीर्घायुष्य, विद्या, विजय, सुख समृद्धी देणाऱ्या, वास्तुदोष दूर करणाऱ्या.. भीती, भूतबाधा अरिष्ठांचं निरसन करणाऱ्या.. मनावर, वाणीवर चांगले संस्कार करणाऱ्या ह्या प्रभावी स्तोत्राचं अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न मी करणार आहे.. 


।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।
🙏

*आनंद रामायणातील जन्मकांडात पाचव्या सर्गात हे रामरक्षा स्तोत्र भगवान श्री शंकरांनी माता पार्वतीला सांगितल्याचा, माता पार्वतीनं हे स्तोत्र कार्तिकेयला शिकवल्याचा.. आणि ह्या स्तोत्राच्या प्रभावानंच कार्तिकेय तारकासुराचा वध करण्यास समर्थ झाल्याचा उल्लेख आहे.. 


-मी मधुरा.. 

************************************************

Friday, January 2, 2026

Welcome 2026!!

नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!!!



२०२६ चा नवा कोरा दिवस, नवी ऊर्जा देणारा सूर्योदय आणि १० कि.मी. धावणं!!.. ह्यापेक्षा नवं-वर्षाची चांगली सुरुवात काय असू शकते?!.. 

रात्री बारा वाजता गत वर्षाला बाय बाय म्हणत अतिशबाजीच्या रोषणाईत नववर्षाचं स्वागत करावं.. पहाटे पहाटे चालायला/धावायला जावं.. आणि उगवत्या सूर्याच्या साक्षीनं नवं वर्षाची सुरुवात करावी.. ही नॉर्थ अमेरिकेत राहणाऱ्या माझ्यासाठी स्वप्नवत वाटणारी गोष्ट.. पण हे शक्य झालं ते केवळ सध्या फ्लोरिडावासी असल्यानं.. 

.. गेल्या काही वर्षांत सोलो ट्रिप्स, ट्रेकिंग, नेहमीची भारतवारी ह्या निमित्त्यानं वेगवेगळ्या देशांतून माझा प्रवास होतो आहे.. त्यामुळं वर्षांतून तीन-चार महिने माझं पोर्टलॅंडला नसणं हे सवयीचंच.. पण गेल्या संपूर्ण वर्षात कसे तरी तीन महिने मी पोर्टलॅंडला होते.. त्यामुळं मैत्रिणींनी मला ग्लोबल सिटीझन असं घोषित केलंय.. इतके दिवस फ्रिक्वेंट फ्लायर असणारी मी आता ग्लोबल सिटीझन झाले आहे..
२०२५ मध्ये जवळजवळ साडेचार पाच महिने मी भारतात होते.. त्यात चारधाम यात्रा, श्रीलंका हा प्रवास झाला.. बाकी सहा-सात महिने अमेरिकेत असले तरी बहुतेकवेळा फ्लोरिडात मुलीकडंच होते.. 
तसं पहायला गेलं तर पोर्टलॅंड,फ्लोरिडा, पुणे, मिरज ही चारी माझीच घरं.. पण ती खरंच माझी घरं आहेत का? मी त्यांची आहे का?.. कधी कधी तर मला ही घरं चक्क अनोळखी वाटतात.. कदाचित एका घराची सवय होईपर्यंत दुसऱ्या घरी जाण्यामुळं असेल.. तिथल्या वस्तूंशी, तिथल्या वातावरणाशी नव्यानं नातं जोडताना हरवायला होतं.. हवामानात बदल, वेळेचा फरक या बरोबरच खाण्यापिण्याच्या सवयी-वेळा, स्वयंपाकाच्या पद्धती, वागणं-बोलणं-कपडे सगळ्यांशीश जुळवून घ्यावं लागतं.. कधी कधी मी नेमकी कोण? हा प्रश्न ही पडतो.. अलिप्तपणे ह्याकडं पाहिलं की हळू हळू मी मला सापडत जाते.. आणि स्वतःला शोधणं सापडणं ह्या खेळांत मजा येते..

स्वतःला एकदा शोधलं की झालं असं मुळीच नसतं.. दहा इंद्रियांकडून क्षणोक्षणी मिळणाऱ्या माहितीच्या गोंगाटात गोंधळात सहजच गुंतायला हरवायला होतं.. त्यामुळं सतत स्वतःला शोधून मार्गावर आणायला, स्वतःत झालेल्या चांगला वाईट बदलांचा आढावा घ्यायला, स्वतःबरोबर वेळ घालवायला मला आवडतं.. त्यासाठी भटकंती.. एकटीनं भटकणं.. देशात, परदेशात.. सोलो ट्रेक्स, आश्रमात राहणं, अनोळखी लोकांबरोबर प्रवास करणं.. वर्षातले ते दहा-पंधरा दिवस फक्त माझे असतात.. माझ्यासाठी असतात.. 
२०२६ च्या नववर्षाच्या शुभेच्छां बरोबरच बरेच जणांनी विचारलं.. मग, ह्यावर्षी कुठं दौरा?.. अजुनी तरी मी चारधाम यात्रेच्या गारुडाखालीच वावरती आहे.. बघू, जस जसं वर्ष पुढं सरकत जाईल तसा अंदाज येईल, नियोजन ही होईल.. 
२०२६ काय घेऊन येतंय ह्याची उत्सुकता तर नक्कीच आहे.. 

-मी मधुरा..  

 

Thursday, December 25, 2025

रुद्रप्रयाग - हरिद्वार - दिल्ली - पुणे

१४ ऑक्टोबर : रुद्रप्रयाग - हरिद्वार 
१६० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडेचार तास  

सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. लंच पर्यंत ऋषिकेश.. मुक्कामाला हरिद्वार.. असं आजच नियोजन.. 

चारधामांचं दर्शन झालं.. आता 'ऋषिकेश'.. 
'ऋषिकेश' - Yoga Capital of The World -  योगा टीचर झाल्यापासून माझ्या बकेट लिस्टवर असलेलं.. किमान दोन आठवड्याचा योगा रिट्रीट प्रोग्रॅम.. आणि बाजूचा एखादा ट्रेक.. पण कधी रिट्रीट प्रोग्रॅम फुल म्हणून तर कधी वेळ जमत नाही म्हणून येणं झालंच नाही..
हे होईल तेव्हा होईल.. पण आज 'मी ऋषिकेशमध्ये पाऊल ठेवणार' यानंच जाम खुश आहे..

बरोबर नऊ वाजता हॉटेल सोडलं.. आजचा पहिला स्टॉप 'देवप्रयाग'.. 
देवप्रयाग.. अलकनंदा नदीवरचा शेवटचा संगम.. ह्या संगमानंतर अलकनंदा गंगा म्हणून ओळखली जाते.. 
खळखणारी अलकनंदा आणि शांत भागीरथी यांचा संगम.. केवळ विलोभनीय!..  


डावीकडून येणारी भागीरथी - उजवीकडून येणारी अलकनंदा 

ऋषिकेश.. 
एकच्या सुमारास ऋषिकेशला पोचलो.. बस पार्किंगपासून टमटम करून 'मुनी की रेती'.. गंगा किनारी आलो.. 
पायऱ्या उतरून गंगेच्या घाटावर येताना समोर दिसलं ते प्रचंड गंगेचं पात्र.. आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिलेली छोटीशी गंगा काही किलोमीटर प्रवासांत किती बदलली!!.. 
नदीच्या तीरांना जोडणारा तो रामझुला.. नजरेत भरत नव्हता.. 



रामझुला वरून पैलतीरी असणाऱ्या गीता भवनकडं आम्हाला जायचं होतं..
घाटावरून नदीच्या बाजूनं झुल्यापर्यंत पोचलो.. 

झुल्यावर उभं राहून त्या विस्तीर्ण पात्राकडं पाहणं हा एक अनुभव आहे.. 
नदीकडं पाहत दोन्ही हात पसरून खोल श्वास घेताना काय वाटलं ते शब्दातीत आहे.. 



प्रसिद्ध 'चोटीवाला' मध्ये जेवण घेतलं.. सुग्रास, पारंपरिक चवीची थाळी.. 

ऋषिकेशमध्ये मांसाहारी जेवण मिळत नाही.. शहराचं पावित्र्य राखण्यासाठी अनेक दशकांपासून मांस, मासे, अंडी विक्रीवर बंदी आहे.. इथल्या रेस्टोरेंट्स मध्ये मुख्यत्वे शाकाहारी तसेच सात्विक - कांदा लसूण विरहित पदार्थ, व्हिगन - दुग्धजन्य विरहित पदार्थ मिळतात.. पारंपरिक भारतीय पदार्थांपासून (चाट, लस्सी, आलू पुरी) ते मोमोज थुक्पा सर्व काही मिळतं..


जेवण करून गीता भवन, स्फटिक फॅक्टरी पाहून महादेव मंदिर पहायला गेलो.. 
अतिशय सुंदर, प्रसन्न, अद्भुत ऊर्जा असणारं असं मंदिर.. परिसर जरी मोठ्ठा असला तरी मंदिर लहानसंच होतं.. 
फुलांनी सजवलेली पिंड अतिशय मोहक दिसत होती.. त्या फुलांच्या वासानं मंदिर भरून गेलं होतं.. अगदी हळू आवाजात ' नमः शिवाय' जप ऐकू येत होता..   
एका भिंतीला लागून तीनचार जणं कसला तरी पाठ करत बसली होती.. 
मी ही दुसऱ्या भिंती लगत बसले.. बाकी सगळे शॉपिंगला, इकडं तिकडं भटकायला जाणार होते.. मी तिथं बसलेलं पाहून अभिषेकनं सांगितलं की परत जाताना तुला सांगू.. 
मी डोळे मिटले आणि  नमः शिवाय जपात हरवून गेले.. 


मला बोलवायला आलेल्या ड्राईव्हर बरोबर तिथल्या गल्ल्यातून गंगेच्या काठावर गेले.. किती सुंदर घाट होता तो!.. गंगा आरतीची तयारी सुरु होती.. अनुराधा पौंडवालच्या आवाजात भजनं सुरु होती.. आणि शांत गंगा मैय्या समोरून हे सगळं पाहात होती.. 
मुनी की रेती - शत्रुघ्नघाट.. नावेतून जाणार होतो.. पाण्यात पाय घालून नावेची वाट पहात असताना 'गंगेच्या मनात आत्ता काय असेल?' हा विचार आला.. आणि निबंध स्पर्धेचा विषय म्हणून माझं मलाच हसू आलं.. 


नावेतून 'मुनी की रेती' ला परत आलो.. पंचवीस किलोमीटरवरच हरिद्वार असल्यानं सात वाजेपर्यंचा फ्री टाइम मिळाला.. 
रामानुज शत्रुघ्नचं शक्यतो कुठंही न आढळणारं मंदिर पाहिलं.. ऋषिकेशच्या गल्ली बोळातून चक्कर मारली.. 
सात वाजता टमटम करून बस स्टॅन्ड कडं निघालो.. 

नितळ, स्वच्छ निळीशार गंगा ऋषिकेशच्या हृदयातून वाहतीय आणि तिची खळखळ तिथल्या मंत्रोच्चारांना, योगसाधनेच्या लयबद्धतेला पार्श्वसंगीत देत असेल असं वाटलं..  

योग, साधना, भक्ती, ध्यान त्यामुळं इथं वेगळीच ऊर्जा जाणवते.. 
निघताना मी म्हटलं, इथं घेतलेल्या पहिल्या श्वासापासूनच मी तुझ्या प्रेमात आहे.. तुझ्याकडं इतकं भरभरून द्यायला आहे की एक आयुष्य कमी पडेल.. लवकरात लवकर मला बोलाव.. मी वाट पाहते आहे.. 

हरिद्वारला पोचायला आठ जाऊन गेले.. 
हॉटेलवर आमचं जंगी स्वागत झालं.. पायघड्या घालून, फुलं उधळून, औक्षण करून.. विश्वविहारच्या सर्वेसर्वांमधील संजय वझे सर खास आमच्या स्वागतासाठी उभे होते.. आवरून जेवायला आलो तर six course meal आमची वाट पहात होतं.. सर सगळ्यांना काय हवं काय नको, ट्रिप कशी झाली जातीनं विचारत होते.. फार मोठ्ठी कामगिरी करून आल्यानं विजयाचा सोहाळा असं काहीसं रूप होतं.. 
खडतर यात्रेचं श्रेय मी नाकारत नाहीय पण जरा जास्तीच कौतुक होतंय असं वाटलं.. 

आम्ही चाळीस वझे सरांबरोबर

अकराच्या सुमारास रूमवर परत आले.. 
यात्रा संपली.. उद्या परत जायचं.. 
सामानाची बांधाबांध.. वजनं करणं.. आणि ती मापात आणणं हा एक टास्कच.. नातेवाईक, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी घेतलेलं गंगाजल आणि प्रसाद यामुळं सगळं गणित चुकत होतं.. जुगाड करून एकदाची बॅग भरली.. आणि बेडवर पाठ टेकली.. 


१५ ऑक्टोबर : हरिद्वार - दिल्ली  
२४० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडे चार तास 

सकाळी ७ वाजता ब्रेकफास्ट.. ८ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. साधारण दोन वाजेपर्यंत दिल्ली एअरपोर्टला पोचायचं.. असं आजच नियोजन.. 

आठच्या सुमारास आमची एक बस दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल १ तर दुसरी बस टर्मिनल २ च्या दिशेनं निघाली.. 
महाकाय पर्वत, डोंगर, दऱ्या, वळणावळणाचे मनमोहक पण प्रसंगी जीवघेणे रस्ते, खळखळणाऱ्या नद्या आता सगळं मागं पडलं.. 

खरं तर पोर्टलँडसारख्या निसर्गरम्य ठिकाणी राहत असल्यानं मी हे पहाडी सौंदर्य नेहमीच अनुभवत असते.. बर्फाच्छादित पर्वत, पाईन-देवदार वृक्षांची जंगलं, हिरव्यागार दऱ्या, सुंदर धबधबे.. पण हिमालय तो हिमालय.. त्याची सर कोणाला येणार? गेल्या तीन-चार वर्षात हिमालयाशी माझं एक वेगळंच नातं तयार झालंय.. 
हिमालय मला धीरगंभीर योग्यासारखा वाटतो.. जीवनाचं, जगण्याचं कुतूहल संपल्यानंतर शांतपणे उभा असलेला.. त्याच्या पुढं माझं अस्तित्व सूक्ष्म होताना मी स्वतःला त्याच्यात पाहायला लागते.. कधी कधी तो मला माझ्या गाभ्यापर्यंत घेऊन जातो.. म्हणून परत परत त्याच्याकडं यावंसं वाटतं.. 
आत्ताही, त्यानं चारधामांचं समृद्ध करणारं अनुभवांचं अक्षय पांथेय दिलंय बरोबर.. 

बस मध्ये आम्ही दिल्लीत मुक्काम करणारे आणि पुण्याला जाणारे इतकेच होतो.. रोजचे चेहरे दिसत नसल्यानं चुकल्या सारखं वाटत होतं खरं पण, फायनल बाय बाय म्हणण्यापूर्वी पुढच्या चहा ब्रेकला भेटणार होतो.. ह्या दहा दिवसांत ही मंडळी दिनचर्येचा भाग झाली होती.. 
वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही मंडळी.. त्यांचे अनुभव, आयुष्याकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन ह्यातून कितीतरी शिकता आलं.. दृष्टी व्यापक झाली.. हीच ग्रुप टूरची मिळकत असावी..

साधारण दोनच्या सुमारास आम्ही टर्मिनल २ ला पोचलो.. वैशाली-आनंद, विजयाताई, आळंदीचे गणेश-निकिता आणि मी.. 

दिल्ली - पुणे..
पुण्याला जाणारं दुपारी पाचचं फ्लाईट.. 
चेक इन, सेक्युरिटी करून गेटला येऊन बसले.. 
टेक्निकली दिल्ली ते दिल्ली चारधाम टूर संपली होती.. 

एकूणच, मला असं वाटतं, चारधाम यात्रा प्रत्येकाला काही ना काही देते.. मग तुम्ही अध्यात्मिक शांतीच्या शोधात आला असाल किंवा हिमालयाचं नैसर्गिक सौंदर्य पाहायला किंवा हिमालय अनुभवायला.. 

शेवटी इतकंच म्हणेन विश्वविहार, टूर मॅनेजर अभिषेक, असिस्टंट तृप्ती, आमचे ड्रायव्हर्स-क्लीनर्स आणि ह्या प्रवासात आपुलकीनं काळजी घेणाऱ्या त्या प्रत्येकाची मी कृतज्ञ आहे.. 
.. आणि माझे सगळे सहप्रवासी, 
तुमच्यामुळं ही चारधामयात्रा एक समृद्ध परिपूर्ण अनुभव झाली.. 
Thank you for everything.. 
भेटू लवकरच.. अश्याच एखाद्या टूरमध्ये.. तोवर व्हाट्स अँप आहेच.. 



-मी मधुरा.. 

************************************************

Wednesday, December 24, 2025

गुप्तकाशी - बद्रीनाथधाम - रुद्रप्रयाग

१२ ऑक्टोबर : गुप्तकाशी- बद्रीनाथधाम 
१९५ कि.मी. लागणारा वेळ साधारण ७ तास 

सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. वाटेत ज्योतिर्मठ पाहून मुक्कामापर्यंत बद्रीनाथला पोचायचं.. असं आजच नियोजन.. 
नियोजन किती ही आशादायक असलं तरी तसं होईलच असं नाही.. हे आत्तापर्यंतच्या अनुभवानं चांगलंच कळालं होतं.. 

नऊ सव्वा नऊच्या दरम्यान हॉटेल सोडलं.. 
गुप्तकाशीचं विश्वनाथ मंदिर, अर्धनारीश्वर मंदिर, त्रियोगी नारायण मंदिर पाहण्यासारखं आहे.. खरं तर काल त्रियोगी नारायण मंदिर पाहता आलं असतं.. सोनप्रयागपासून अकरा किलोमीटरवर तर होतं.. सगळे जमून बस निघायला रात्रीचे नऊ वाजून जातील हे माहिती असतं तर नक्कीच गेले असते.. 

खडतर प्रवास, प्रतिकूल परिस्थिती असणार हे माहिती होतं पण धैर्याची ही परीक्षा घेतली जाईल हे माहिती नव्हतं..  
काल दुपारी चार वाजता सोनप्रयागला आल्यापासून ते रात्री नऊ वाजता सोनप्रयाग सोडेपर्यंत.. ते पाच तास.. तीस किलोमीटर पेक्षा जास्त चालून थकलेली मी.. दिवसभराच्या घामट कपड्यात कावलेली मी.. ब्रेकफास्ट नंतर पोटात अन्न न गेल्यानं भुकेलेली मी.. जवळचं पाणी संपल्यानं तहानलेली मी.. आंतरिक शांतीवर कुरघोडी करणाऱ्या शरीराला पाहाणारी मी.. पेशन्स - धैर्याची परिक्षा देणारी मी.. 
ह्या सगळ्याकडं त्रयस्थ होऊन पाहणं महाकठीण होतं.. हा ही एक अनुभवच!.. स्वतःला जोखण्याचा.. तोल ढळू न देता सांभाळण्याचा.. स्वीकारात्मक राहण्याचा.. 

रोजच्या मानानं आज बस मध्ये शांतता होती.. तृप्ती आणि मी, आमचीच काय ती अखंड बडबड.. आठ दिवसांच्या प्रवासानं बहुतेक सगळे थकून झोपले होते.. 

दुपारच्या जेवणानंतर अभिषेक-टूर लीडर आमच्या बस मध्ये आला आणि तृप्ती दुसऱ्या बस मध्ये.. जोतिर्मठ येईपर्यंत much needed झोप काढून घेतली.. 
चारच्या सुमारास ज्योतिर्मठला पोचलो.. 

ज्योतिर्मठ.. 
समुद्रसपाटीपासून ६००० फूट उंच, गंधमादन पर्वताच्या पायथाशी असणारं हे ठिकाणं जोशीमठ म्हणून ओळखलं जातं..  
विंटर स्पोर्ट्स साठी देशाविदेशात प्रसिद्ध असलं तरी अध्यात्मिक, धार्मिक दृष्टया ही तितकंच महत्वाचं.. 

नृसिंह मंदिर..
अशी मान्यता आहे कि, भक्त प्रल्हादानं विनंती केल्यावर आपलं उग्ररूप त्यागून भगवान नृसिंह सौम्य रूपात इथं प्रगट झाले.. 

हिवाळ्यांत बद्रीनाथधामचं कपाट बंद झालं की भगवान इथं निवासाला येतात.. 
बद्रिनाथधामला जाण्यापूर्वी भगवान नृसिंहांचं दर्शन घेतलं तर यात्रा सफल होते असं मानलं जातं..   



PC संतोष मामा
मंदिराचं प्रवेशद्वार: अतिशय सुंदर दगडांत कोरलेले दशावतार 

ह्याच मंदिराच्या आवारात, आदि गुरु शंकराचार्यांनी स्थापन केलेला पहिला मठ पाहताना भारावून गेले.. काल तर त्याचं समाधीस्थळ पाहिलं आणि आज त्यांच्या महान कार्याची सुरुवात झालेला मठ.. 

श्री दंडधारा मंदिर




श्री दंडधारा - आदिगुरू शंकराचार्यांनी त्यांच्या दंडानी वार करून जमिनीतून पाण्याची धार काढली..








भगवान बद्रीनाथांचं हिवाळ्यातील निवासस्थान, व्हॅली ऑफ फ्लॉवर्स आणि औलीचं प्रवेशद्वार, भारत-चीन सीमेकडं जाणाऱ्या सैनिकांचं छावणी तळ म्हणून ओळखलं जाणारं जोशीमठ, इथल्या नयनरम्य टेकड्याचं अवतलन (land subsidence) झाल्यानं स्वतःच्याच वजनानं खचत चाललं आहे.. हे ऐकून खूप वाईट वाटलं.. 

साडे सहाच्या सुमारास जोतिर्मठहून निघालो.. 
संध्याकाळ झाल्यानं रोजच्या सारखीच परवचा म्हंटली.. आणि उद्या बद्रीनाथधामला 'विष्णू सहस्त्रनाम' म्हणायचं ह्या माधुरीताईंच्या इच्छेवर शिक्कामोर्तब ही झालं..
चाळीस किलोमीटरच अंतर असल्यानं साडे सात आठ पर्यंत हॉटेलवर पोचलो.. 

बद्रीनाथधाम: 
दिव्यत्व आणि भव्यता यांचा संगम असणारं धाम.. 
आदि गुरु शंकराचार्यांनी, हिंदू धर्माला प्रतिष्ठा देण्यासाठी, देशाला एका सूत्रात बांधण्यासाठी पुनर्स्थापित केलेलं धाम.. 
वैष्णवांसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असणारं हे विशालपुरी विष्णुधाम.. 

एका आख्यायिकेनुसार, भगवान विष्णू बद्रीनाथला येण्याआधी भगवान शिव आणि देवी पार्वती इथं रहात असत.. बद्रीनाथ हे त्यांचं आवडतं ठिकाणं.. एके दिवशी त्यांच्या दारासमोर घामानं पूर्णपणे भिजलेलं एक बाळ त्यांना दिसलं.. त्या गोंडस बाळाला पाहता क्षणीच पार्वतीचं हृदय द्रवलं आणि बाळाला सांभाळायचं ठरवलं.. बर्फात कोणतेही पावलांचे ठसे नसताना बाळ इथं असं आलं, यामागं काहीतरी छल-कपट आहे वाटून भगवान शिवांनी असहमती दर्शवली.. पण देवी पार्वतीचा हट्ट!!.. लाडाकोडानं बाळाला सांभाळायला सुरुवात केली.. एकदा शिव-पार्वती बाहेरून घरी परत आले तर घराचे सगळे दरवाजे खिडक्या आतून बंद.. किती कि आवाज दिला तरी बंद त्या बंदच.. आता त्यांच्या समोर दोन पर्याय होते.. घरात जाण्यासाठी शक्तीचा वापर करणं किंवा दुसऱ्या घरी जाणं.. त्यांनी दुसरा पर्याय निवडला कारण पार्वतीला प्रिय असलेल्या त्या मुलाला त्यांना दुखवायचं नव्हतं.. ते मूल दुसरं तिसरं कोणी नाही तर भगवान विष्णू होते.. त्यांना तापासाठी ही शांत एकांत जागा हवी होती.. त्यासाठी त्यांनी केलेली ही लीला.. 

ह्या पवित्र धामाला बद्रीनाथ नाव पाडण्यामागं एक कथा आहे.. 
पौराणिक कथेनुसार, भगवान विष्णू या ठिकाणी ध्यानस्थ बसले होते.. ध्यानावस्थेत असताना त्यांचं थंडीपासून, हिमवृष्टीपासून रक्षण करण्यासाठी त्यांच्या पत्नीनं लक्ष्मीनं विशाल बद्री (बोर) वृक्षाचं रूप घेतलं.. लक्ष्मीच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्यांनी या जागेला बद्रीकाश्रम असे नाव दिले.. बद्रिकाश्रमाचा नाथ म्हणून बद्रीनाथ.. 

बद्रीनाथ मंदिर : रात्रीची रोषणाई 

हॉटेल वर येऊन चेक इन केलं.. आजचा दिवस तसा निवांत आरामदायी होता.. आवरून खाली डिनरला आले तर गप्पा छान रंगात आल्या होत्या.. 
चारधामांपैकी तीन धाम सुखरूप पार पडले होते.. यात्रेचा खडतर भाग पूर्ण झाला होता.. उद्या सकाळी बद्रीनाथाचे  दर्शन.. आणि परतीचा प्रवास सुरु.. 
हॉटेल पासून मंदिर दोन अडीच किलोमीटरवर असल्यानं, आणि गरज पडल्यास पिट्टू मिळत असल्यानं फारश्या नियोजनाची गरज नव्हती.. 
आरामात जेवण करून अकरा साडे अकराला रूमवर गेलो..  
तृप्तीला लगेचच झोप लागली.. बेड वर पडल्यावर मनांत विचार आला.. लांबूनच आज मंदिराची रोषणाई पाहिली.. किती निरव शांतता जाणवत होती तिथं.. भगवान विष्णूंचं वास्तव्य तर आहेच, पण ऋषीमुनी जे आत्मज्ञान प्राप्तीसाठी ध्यान करायला इथं आले, राहिले त्यांची ही ऊर्जा इथल्या अवकाशात असेल.. शिवतत्वाच्या ऊर्जेसारखीच ही ऊर्जा असेल का वेगळी असेल? का वृंदावनच्या ऊर्जेसारखी असेल?  

१३ ऑक्टोबर : बद्रीनाथधाम - गुप्तकाशी 
८ वाजता ब्रेकफास्ट.. बद्रीनाथ पूजा.. माना व्हिलेज.. मुक्कामाला गुप्तकाशी.. असं आजच नियोजन..

आज आम्हाला सकाळी बऱ्यापैकी फ्री टाइम होता.. सकाळी ११ वाजता पूजेचं ग्रुप बुकिंग मिळालं होतं.. 
काही जण पिंडदानाचा विधी करणार होते.. त्यांना सकाळी लवकर घाटावर जायचं होतं.. 
इथल्या ब्रह्म कपाल घाटावर श्राद्ध पिंडदान केल्यानं पूर्वजांच्या आत्म्याला पूर्ण आणि अंतिम मुक्ती मिळते.. गया इथं केलेल्या श्राद्धापेक्षा ते आठ पटीनं अधिक फलदायी मानलं जातं.. यामुळं 'पितृदोष' कायमचा दूर होतो आणि दिवंगत आत्म्याला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्ती मिळते अशी श्रद्धा आहे.. 

ब्रेकफास्ट करून वैशाली, आनंद आणि मी बाहेर पडलो.. 
अलकनंदेच्या एका काठाला गांव आणि दुसऱ्या काठाला मंदिर.. आणि ह्या दोन्ही काठांना जोडण्यासाठी एक सुंदर लोखंडी पूल..


पुलावर उभं राहून खालून खळाळत जाणारी अलकनंदा पाहायला मजा वाटते..
पूल ओलांडून पलीकडं गेलो.. आणि एका वेगळ्याच दुनियेत आल्या सारखं वाटलं.. इतकी प्रचंड गर्दी कि पाय ठेवायला ही जागा नाही.. कसे तरी पुलाला लागून असलेल्या पायऱ्या उतरून खाली आलो.. अलकनंदा आणि तिला लागूनच असणारी तप्तकुंडं-गरम पाण्याची कुंडं पाहण्यासाठी आलो.. पण कुंडं माणसांनी इतकी खचाखच भरली होती कि नुसत्या वाफाचं दिसत होत्या.. नदीकाठी तर जाणं फारच मुश्किल होतं.. अश्यावेळी त्या गर्दीचाच भाग होऊन, स्वतःला त्यांत झोकून देणं अजुनी जमत नाही.. 
आल्या वाटेनं परत वर मंदिराकडं गेलो.. 


अकरा शिवाय मंदिराच्या आवारात प्रवेश नसल्यानं बाहेरच्या प्रांगणातच वाट पाहत थांबलो.. इतका गोंधळ गोंगाट गर्दी होती कि कुठं शांतपणे बसायला ही जागा नव्हती.. रुद्राक्ष विकणारे, विविधरंगी गळ्यातल्या माळा, जपमाळा विकणारे, प्रसाद विकणारे, फोटोग्राफर्स सतत मागंपुढं फिरत होते.. सगळं अंगावर येतंय असं वाटलं.. 

अकरा वाजता पूजेच्या रांगेत उभे राहिलो.. तिथं तर वेगळाच गोंधळ.. अर्धातास रांगेत उभं राहिल्यावर हळूहळू रांग पुढं सरकायला लागली.. मंदिराच्या प्रांगणातून मंदिराच्या आवारात आलो.. आता आत गेल्यावर दर्शनासाठी आणि पूजेसाठी अश्या दोन वेगळ्या रांगा.. ही दर्शनाची रांग VIP रांग होती म्हणे.. म्हणजे सभामंडपातून दर्शन घ्यायचं.. अजुनी एक रांग होती जी मंदिराबाहेरून होती.. ज्यांचं लांबूनच दर्शन होणार होतं.. 
आम्ही पूजेच्या रांगेत उभे राहिलो.. आणि रांगेतून सभामंडपात.. का तर म्हणे ही पूजा आत्ता नाही.. पण रिसिटवर तरी होती.. दर्शनाच्या रांगेतून कधी आत गेले आणि कधी बाहेर आले समजलंच नाही.. ना मूर्ती पुढं उभी राहिले ना मूर्ती कशी आहे ते पाहिलं.. 
आवारात बाकी बरीच छोटी छोटी मंदिरं होती.. तिथंच एके ठिकाणी पाच मिनिटं बुढ टेकवलं.. आणि exit गेट मधून बाहेर.. 
ह्या सगळ्या गदारोळांत भक्तीच्या व्यवहाराशिवाय काहीच जाणवलं नाही.. मंदिरात VIP दर्शन, पूजा हे माझ्या स्वभावाविरुद्ध आहे.. पण ग्रुप बरोबर असताना काही गोष्टी कराव्या लागतात म्हणून केल्या.. पूजा-दर्शन झालं नाही ह्यापेक्षा फसवलं गेल्याचं वाईट नक्कीच वाटलं..
मागं वळून मंदिराकडं पाहिलं.. 'जशी तुझी इच्छा' म्हणून नमस्कार केला.. 

पूल ओलांडून गावांत आलो.. इकडं बऱ्याच व्हरायटीजचे वुलन कपडे मिळतात.. हिल स्टेशन सारखी रस्ताच्या दोन्ही बाजूला असलेली छोटी छोटी दुकानं.. विंडो शॉपिंग करत हॉटेलवर आलो.. सगळे जमून बद्रीनाथ सोडायला तीन वाजले.. 

माना व्हिलेज: 
बद्रीनाथ पासून केवळ चार किलोमीटरवर असणारं हे गांव.. तिकडं जाणारं ट्रॅफिक बद्रीनाथ पर्यंत अडकलं होतं त्यामुळं तिकडं जाणं रद्द केलं आणि सरळ रुद्रप्रयागचा रस्ता पकडला..
माना व्हिलेज भारत-तिबेट हद्दीवरचं गांव.. पूर्वी 'माना भारतातलं शेवटचं गांव' असं म्हंटल जायचं.. पण आपल्या मोदींनी त्याचं नामकरण 'माना भारतातील पहिलं गांव' असं केलं.. 
माना हे महाभारताशी असलेल्या संबंधासाठी प्रसिद्ध आहे.. आख्यायिकांनुसार पांडव स्वर्गाच्या प्रवासाला इथून गेले.. व्यासांची 'व्यास गुंफा' जिथं महाभारत लिहिलं गेलं ती माना गावांत आहे.. 
सरस्वती नदी देखील येथूनच वाहते.. त्यामुळं या ठिकाणाला आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झालं आहे.. 
सतोपंथ ग्लेशिअर मधून उगम पावणारी अलकनंदा माना जवळ सरस्वती नदीला मिळते आणि पुढं बद्रीनाथकडं वहाते..  

आज चौथा धाम ही झाला.. 
'शुद्धता शुद्धीकरणापासून सुरु झालेला प्रवास त्यागातून भक्तीतून आत्मसाक्षात्काराकडं जातो'.. हा जरी चारधाम यात्रेचा गर्भितार्थ असला तरी त्यावर खरं उतरायला केवढी तपस्या हवी, साधना हवी.. अजुनी अपेक्षेचं ओझं वाहणारी मी.. कुठून आत्मसाक्षात्कार होणार.. ऊर्जा अनुभवण्याची अपेक्षा असणं आणि त्या ऊर्जेशी जोडण्यासाठी आत्मिक तयारी असणं वेगळं.. प्रत्येक तत्वाची, प्रत्येक क्षेत्राची ऊर्जा वेगळी असते, सगळीकडं तो कनेक्ट जाणवेलच असं नसतं.. 

मंदिर परिसरात नाही तरी बद्रीनाथगावांत प्रत्येक श्वासांत पवित्रता जाणवली.. तिथलं प्रत्येक दृश्य निसर्गाच्या भव्यतेची साक्ष देतं होतं.. पण मंदिर, मंदिराचा परिसर इथं ती शांतता, ती पवित्रता लुप्त होतीय, ऐश्वर्याचा पगडा जास्ती आहे असं मला वाटलं.. अर्थात हे माझं मत झालं.. कदाचित ज्या अनुभवाची मी अपेक्षा केली होती तसा तो नव्हता..  

तासाभरातच ड्राइवरनं बस रस्त्याच्या कडेला उभी केली.. आणि आश्चर्याचा सुखद धक्का बसला.. 
अलकनंदा नदीवर पंचप्रयाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच प्रमुख संगमांपैकी पहिला संगम विष्णुप्रयाग.. 


विष्णूप्रयाग इथं कामेत ग्लेशिअर मधून उगम पावणारी धौलीगंगा बद्रीनाथवरून येणाऱ्या अलकनंदाला मिळते..
पुराणानुसार विष्णुप्रयाग हे नांव भगवान विष्णूंच्या नावावरून पडलं.. विष्णूला प्रसन्न करण्यासाठी नारदमुनींनी अष्टाक्षरी मंत्राचा जप ह्या संगमावर केला.. प्रसन्न होऊन विष्णूंनी नारदमुनींना प्राणशक्ती प्रदान केली.. अष्टकोनी आकारातील विष्णुमंदिर इथं आहे.. 

प्रवासाच्या एकसूरीपणात चांगला ब्रेक मिळाला.. 
बद्रीनाथ - हरिद्वार नॅशनल हायवे NH-7 वर हे पंचप्रयाग पाहायला मिळतात.. परंतु आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाल्यानं, अंधार पडू लागल्यानं नंदप्रयाग आणि कर्णप्रयाग पाहता आले नाहीत.. 

त्यानंतरचा परतीचा प्रवास मात्र बराच कंटाळवाणा झाला.. साधारण दहाच्या सुमारास हॉटेलवर पोचलो.. 



-मी मधुरा.. 

************************************************