Monday, June 15, 2026

अध्याय १८ 'मोक्षसंन्यासयोग'


श्रीपरमात्माने नमः 
अध्याय १८ 'मोक्षसंन्यासयोग'




श्रीमदभगवतगीतेचा हा शेवटचा अध्याय!!.. आत्तापर्यंत पाहिलेल्या, अभ्यासलेल्या सतरा अध्यायांचं हे सार.. 
माऊली म्हणतात, जसं दुरूनच मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतलं तरी गाभाऱ्यातील देवतेच्या दर्शनाचं फळ मिळतं तसंच हा 'मोक्षसंन्यासयोग' अध्याय वाचला असता सर्व गीताशास्त्र वाचल्याचं श्रेय मिळतं.. ते पुढं म्हणतात, वेद-उपनिषदं यांच्या पायाभरणीवर, धर्म-अर्थ-काम यांची भक्कम तटबंदी बांधून, कृष्णार्जुन संवादाचे आत्मज्ञानरूपी उत्तम चिरे वापरून, शास्त्रांच्या मदतीनं मोक्षरूपी मंदिराची उभारणी महर्षी व्यासांनी पहिल्या सोळा अध्यायांनी केली. सतरावा अध्याय ‘श्रद्धात्रयविभागयोग’ म्हणजे ह्या मोक्षसंन्यासरूपी कळसाची त्रिगुणी (सत्व-रज-तम) बैठकच होय.. हे सगळे अध्याय एकावर एक चढते थर असून त्यांची पूर्तता ह्या 'मोक्षसंन्यासयोग' अध्यायात होते.. 

श्रीमदभगवतगीतेच्या ७०० श्लोकांतून, त्रिकांडवेद (कर्म, उपासना व ज्ञान) असणारं हे गीताशास्त्र अर्जुनास सांगताना भगवान श्रीकृष्ण एकाच तत्वाचं वारंवार विवेचन करतात.. ते तत्व म्हणजे श्रद्धा/भक्ती..  
पहिल्या अध्यायांत अर्जुनाचा विषाद सांगून प्रवृत्तिशास्त्राचा विचार मांडला आहे तर दुसऱ्या अध्यायांत शास्त्रावर विश्वास ठेवायला सांगितले आहे.. गीताशास्त्र ज्ञानप्रधान असलं तरी कर्मनिष्ठा आणि ज्ञाननिष्ठा यांच्या एकरूपानं ते मोक्षप्राप्तीचा मार्ग सांगते.. 
तिसऱ्या अध्यायात अज्ञानानं कर्मबंधनात अडकलेल्या साधनकांना त्या बंधापासून सोडून मोक्षपदावर आणणाऱ्या साधनांचा उल्लेख आहे.. देहाभिमान सोडून निषिद्ध कर्मे टाकून विहित कर्माचं आचरण केलं असता अज्ञानाचा नाश होतो आणि ही सर्व विहित कर्मे (कायिक,वाचिक व मानसिक) ब्रह्मार्पण बुद्धीनं केली असता मोक्षाचा मार्ग खुला होतो असं सांगितलं आहे.. तर परमात्म्याच्या ठायी कर्मयोगानं भजन कीर्तन करावं असं चौथ्या अध्यायात सांगितलं आहे.. 
थोडक्यात २-३-४ ह्या अध्यायांत कर्मकांडाविषयी भाष्य आहे तर ४ ते ११ ह्या अध्यायांत उपासनाकांडावर तर १२ ते १५ ह्या चार अध्यायांत ज्ञानफळ आणि त्याची सिद्धी म्हणजेच ज्ञानकांडावर भाष्य आहे.. 
अश्याप्रकारे त्रिकांडांचं निरूपण करणारी ही गीता एक गोजिरवाणी श्रुतीच आहे असं माऊली म्हणतात.. एवं सकल संख्यासिद्धू। भगवतगीता प्रबंधु। हा औदाचे आगळा वेदु। मूर्तु जाण।।.. ७०० श्लोकांच्या संख्येनं सिद्ध झालेला हा भगवतगीतेचा प्रबंध मूर्तिमंत वेद असून औदार्यानं वेदांपेक्षा ही श्रेष्ठ आहे.. 

अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नानं होते.. 
सतराव्या अध्यायाच्या शेवटी श्रीभगवान म्हणतात- अर्जुना, श्रद्धेशिवाय जी काही कर्मं - यज्ञ, दान, तपं - करशील ती सारी व्यर्थ आहेत.. सर्व कर्मं श्रद्धेनं परब्रह्माप्रित्यर्थ केली पाहिजेत.. श्रीभगवानांच्या ह्या व्यक्तव्यामुळं अर्जुन अधिकच गोंधळतो.. अज्ञानानं अंध अशी व्यक्ती कोणावर कसा विश्वास, कशी श्रद्धा ठेवू शकेल? रज, तम ह्या दोन्ही गुणांचा नाश झाल्याशिवाय परमात्म्यावरील श्रद्धा खरी श्रद्धा असेल का? कर्मं जन्ममरणास कारणीभूत असतात - ती यथासांग केली तर मोक्ष नाहीतर जन्ममृत्यूच्या फेरा- असं असेल तर कर्मसंन्यास का नको? कर्माशिवाय आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञानाशिवाय मोक्ष... मग कर्मसंन्यास आणि कर्मत्याग ह्यात नक्की काय फरक आहे? ह्या सगळ्या प्रश्नांनी गोधळलेला अर्जुन श्रीभगवानांना विचारतो, "हे महाबाहो, हे हृषीकेश, मी कर्म-संन्यास आणि कर्म-त्याग यांचं तत्व वेगवेगळं जाणू इच्छितो.. कृपा करून ते मला सांगा"..  

श्रीभगवान उवाच.. 
कर्म-संन्यास आणि कर्म-त्याग ह्या दोन्ही शब्दांनी त्यागाचा निर्देश होत असला तरी गूढार्थानं ते वेगळे आहेत.. काम्य कर्माच्या, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्मांच्या त्यागाला, सर्वार्थानं कर्म सोडण्याला 'कर्म-संन्यास' असं म्हणतात.. तर कर्म कर्तृत्वाचा अभिमान व कर्म फल यांच्या त्यागाला 'कर्म-त्याग' असं म्हणतात.. परंतु कर्मफलाची आशा, कर्मफल आसक्ती सुटत नाही म्हणून कर्माला दोषयुक्त मानून कित्येक विचारवंत कर्माचा त्याग करावा असं सांगतात.. तर काही विचारवंत यज्ञ-दान-तपरूप कर्मांनी  चित्तशुद्धी होते म्हणून त्यांचा त्याग करू नये असं ही सांगतात.. 

त्यागांविषयी जरी मतभेद असले तरी ही कर्मे कर्तेपणाचा अभिमान व कर्मफलांचा त्याग करून कर्तव्य बुद्धीनं अवश्य केली पाहिजेत.. मनुष्याची जीवनात आणि त्याच्या अध्यात्मिक जीवनात प्रगती व्हावी ह्यासाठी अनेक संस्कार सांगण्यात आले आहेत.. मानवाच्या कल्याणाकरिता असणाऱ्या कोणत्याही यज्ञ-दान-तप स्वरूपाच्या कर्मांचा कधीही त्याग करू नये.. यज्ञामुळं मन संयमित होतं, दानामुळं हृदयाचं शुद्धीकरण होतं तर तपामुळं आत्म्याचं शुद्धीकरण होतं.. त्यामुळं नित्यनैमित्तिक कर्माचा त्याग करणं योग्य नाही. 

सात्विक, राजस आणि तामस ह्या तीन प्रकृती गुणांच्या भेदांमुळं शास्त्रांमध्ये कर्म त्याग तीन प्रकारचे सांगितले आहेत.. 
अज्ञानानं किंवा मोहवश होऊन केलेल्या कर्म-त्यागाला 'तामस त्याग' असं म्हणतात.. 
जे कर्म दुःखरूप आहे, क्लेशकारक आहे असं समजून शारीरिक त्रासाच्या भीतीनं केलेल्या कर्म-त्यागाला 'राजस त्याग' असं म्हणतात. अश्या त्यागाचं कोणतंही फल मिळत नाही.. असा त्याग उन्नतीच्या दिशेनं नेत नाही..
कर्तव्य भावनेनं, आसक्ती सोडून, कर्तेपणाचा अभिमान टाकून, फलाची अपेक्षा न करता केलेल्या त्यागाला 'सात्विक त्याग' असं म्हणतात.. सत्वगुणांत स्थित बुद्धिमान त्यागीस कर्माविषयी काहीच संशय नसतो.. तो अशुभ कर्मांचा द्वेष करत नाही किंवा शुभ कर्मांत आसक्त राहत नाही..

देह कर्मरूप असल्यानं कोणत्याही देहधारी जीवाला कर्माचा त्याग करणं शक्य नाही.. 'श्वासोच्छवास करणं' हे सुद्धा एक कर्मच!.. परंतु जो कर्मफलांचा त्याग करतो तोच खरा त्यागी होय.. कर्मफलांचा त्याग न करणाऱ्यांना अनुकूल, प्रतिकूल, मिश्र अशी तीन प्रकारची कर्मफलं प्राप्त होतात.. परंतु कर्मफलांचा त्याग करणाऱ्यांना असं कोणतेही फल मिळत नाही.. कर्मफलांचं सुखदुःख भोगावं लागत नाही..

सांख्यशास्त्रात, वेदांतात कर्मांच्या सिद्धीची पाच कारणं सांगितली आहेत.. १. कर्म पूर्ण करण्यासाठी अधिष्ठान म्हणजे आधारभूत शरीर, २. कर्ता म्हणजे जीव, ३. विभिन्न इंद्रियं म्हणजे कर्माचं साधन, ४. अनेक प्रकारचे प्रयत्न वेगवेगळ्या क्रिया आणि ५. दैव.. मनुष्य मन, वाणी आणि शरीरानं जे काही कर्म करतो ते ह्या पाच कारणांमुळं घडत असतं.. परंतु जो ह्या पाच कारणांचा विचार न करता 'आत्माच कर्ता आहे' असं समजतो असा अज्ञानी मूर्ख जाणावा.. परंतु ज्याच्या अंतःकरणात 'मी कर्ता आहे' असा मिथ्या अभिमान नाही आणि ज्याची बुद्धी कर्माच्या बंधनात बद्ध नाही त्यानं सर्व प्राण्यांचा वध केला तरी तो मारेकरी होत नाही, त्या वधांच्या दोषांनी बद्ध होत नाही.. युद्धांत सैनिकाला शत्रूहत्येचं पाप लागत नाही.. कारण त्याची बुद्धी कर्माच्या बंधनात बद्ध नाही.. तो त्याचं फक्त कर्म करत असतो.. पण त्याच सैनिकानं स्वच्छेनं, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणाची हत्या केली तर ते निश्चितंच पाप होय.. 

दैनंदिन कर्म करण्यासाठी ज्ञान, ज्ञेय (विषयसुख) आणि ज्ञाता (जीव) प्रेरक असतात तर कर्म संचयासाठी इंद्रियं (कर्म काण्याची साधनं), कर्मं (व्यवहार) आणि कर्ता (जीव) कारण असतात.. कर्म करण्यापूर्वी काही तरी प्रेरणा असते.. ते घडण्यापूर्वीचा विचार असतो.. आणि त्यानंतर कर्माचं रूपांतर क्रियेत होतं.. ज्ञाता (जीव) आणि ज्ञेय (विषयसुख) ह्यांच्यातील ही क्रिया, हा व्यवहार ज्ञानामार्फत होतो.. विषयांच्या इच्छेनं ज्ञाता (जीव) इंद्रियांचे लाड पुरवतो म्हणून त्याचा 'कर्ता' होतो.. आणि आता हा ज्ञाता (जीव) कर्ता बनून ज्ञानाच्या साह्यानं ज्ञेय (विषयसुख) साध्य करतो आणि ज्ञेयाचं 'कर्म' (व्यवहार) होते.. तहान (इंद्रिय) लागली असता पाणी प्यायल्यानं (ज्ञान) तहान भागेल हे जीवाला (ज्ञाता) कळतं.. आणि पाणी पिण्याचं कर्म, क्रिया (व्यवहार) कर्ता (जीव) कडून घडतं.. 

प्रकृतीच्या तीन गुणांना अनुसरून ज्ञान, कर्म, कर्ता यांचे तीन प्रकार आहेत.. माऊली म्हणतात, एवं सत्व रजतमा। तिहींची एवढी असे महिमा। जे त्रैविध्य आदी ब्रह्मा। अंती कृमी।। - म्हणजेच, सत्व, रज, तम ह्या तीन गुणाचं एवढं सामर्थ्य आहे कि त्यांनी ब्रह्मदेवापासून ते कीटकापर्यंत सर्व जीवांचे तीन भेद केले आहेत.. 
जे ज्ञान प्रत्येकांत मग तो देवता, पशु, पक्षी, जलचर, वनस्पती असो सर्वांमध्ये एकंच आत्मतत्व पाहतं ते 'सात्विक ज्ञान' होय.. जे ज्ञान प्रत्येकांत, विभिन्न शरीरांत विभिन्न जीव, विभिन्न आत्मतत्व पाहतं ते 'राजस ज्ञान' होय.. आणि जे कार्यरूपी शरीरातच आसक्त असतं, जे शरीरापलीकडं पाहतच नाही, जे तात्विक अर्थानं अल्पकाळ टिकणारं, तुच्छ असतं  ते 'तामस ज्ञान' होय.. 
ह्या तीन ज्ञानाच्या अनुरोधानं तीन प्रकारची कर्मे घडतात.. शास्त्राविधीनं नेमून दिलेलं कर्म कर्तेपणाचा अभिमान न बाळगता, फलाची इच्छा न करता, रागद्वेष सोडून केलेलं  असतं ते 'सात्विक कर्म' होय.. परंतु जे कर्म फलांची इच्छा धरून, अहंकारपूर्वक व पुष्कळ प्रयासानं केलं जातं ते 'राजस कर्म' होय.. परिणाम, हानी, हिंसा आणि आपले सामर्थ्य ह्याचा विचार न करता केवळ अज्ञानानं केलेलं कर्म हे 'तामस कर्म' होय..  
जो अनासक्त, मी-माझं न म्हंणणारा, धर्माचं पालन करणारा, यशापयशामुळं विचलित न होणारा, निश्चयी, उत्साही असतो तो 'सात्विक कर्ता' होय.. विषयासक्त, फलाची इच्छा करणारा, लोभी, घातकी, अशुद्ध आचरणाचा, हर्ष-शोकांनी युक्त असतो तो 'राजस कर्ता' होय.. इंद्रियासक्त, मूर्ख, उन्मत्त, कपटी, पारोत्कर्ष सहन न करणारा, आळशी, दुर्मुख व चेंगट असा तो 'तामस कर्ता' होय.. 

प्रकृतीच्या गुणांचा हा भेद बुद्धी आणि निश्चय यांच्यातही आहे..
जी बुद्धी प्रवृत्तिमार्ग (कर्ममार्ग) आणि निवृत्तिमार्ग (संन्यासमार्ग), कर्तव्य आणि अकर्तव्य, भय आणि अभय तसेच बंधन आणि मोक्ष यांना यथार्थपणे जाणते ती 'सात्त्विक बुद्धी' होय.. आणि जी बुद्धी धर्म आणि अधर्म तसेच कर्तव्य आणि अकर्तव्य यथायोग्य रीतीनं जाणत नाही ती 'राजसी बुद्धी' होय.. तमोगुणानं व्यापलेली बुद्धी धर्माला अधर्म आणि अधर्माला धर्म मानते, नेहमी विपरीत मार्गानं कर्म करते.. 
याच बुद्धीचा कर्म करण्यासाठी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला धृती असं म्हणतात.. जो निश्चय अचल आहे, जो योगसाधनेद्वारा मन, प्राण, इंद्रियं यांच्या क्रियांना संयमित करतो तो 'सात्विक निश्चय' होय.. जो निश्चय धर्म, अर्थ, काम करताना फलाची अपेक्षा ठेवतो तो 'राजस निश्चय' होय.. जो निश्चय झोप, भीती, काळजी, दुःख आणि उन्मत्तपणा सोडत नाही तो 'तापसी निश्चय' होय.. 

योग्य कर्म आणि ते कर्म करण्याची साधनं बुद्धी उत्पन्न करते.. पण हे कर्म पूर्ण करण्यास धृतीची अनुकूलता लागते.. केलेल्या कर्मांच्या चांगल्या फलांना 'सुख' असं म्हणतात.. आणि ही सुखं ही तीन प्रकारची असतात.. 
ज्या सुखांत साधक भजन, ध्यान आणि सेवा यांत रमतो, ज्यामुळं त्याचं दुःख नाहीसं होतं, जे आरंभी जरी विषासारखं वाटलं तरी परिणामी अमृततुल्य असतं आणि जे आत्मसाक्षात्काराची जागृती करतं ते सात्विक सुख होय.. थोडक्यात, ज्या सुखाचं वैराग्य हे मूळ असून आत्मानंदप्राप्ती हा ज्याचा परिणाम असतो ते सात्विक सुख.. 
इंद्रियांचा विषयांशी संयोग झाल्यानं उत्पन्न होणारं सुख जे आरंभी अमृतासारखं गोड भासलं तरी परिणामी विषासमान असतं ते राजसिक सुख होय.. 
जे सुख आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असतं आणि जे निद्रा, आळस व प्रमादापासून उत्पन्न झालेलं असतं ते तामसिक सुख होय.. 

पुढं भगवंत संपूर्ण विश्वावर असणारा प्रकृतीच्या ह्या तीन गुणांचा प्रभाव सांगतात..
प्रकृतीच्या ह्या तीन गुणांनी बद्ध नाही अशी कोणतेही वस्तू ह्या लोकी किंवा स्वर्गलोकी नाही.. ह्या तीन गुणांची शक्ती इतकी अचाट आहे कि तिनं एका देवाचे तीन देव आणि एका लोकाचे तीन लोक (स्वर्ग, मृत्यू, पाताळ) केले तर मनुष्याचे चार वर्ण आणि त्यांची निरनिराळी कर्मे ही निर्माण केली.. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची स्वाभाविक गुणांनुसार निरनिराळी कर्मे केली गेली.. 
आत्म्याची जी प्रवृत्ती, तिच्या गुणांनी चार वर्णांना कर्मे वाटून दिली असली तरी वेदाचा अधिकार ब्राह्मणांना असल्यानं ह्यात अग्रेसर मानले गेले.. क्षत्रिय आणि वैश्य हे दोन वर्ण वैदिक धर्मकांड करण्याचा अधिकारी असल्यानं उच्चस्तर राहिले.. चौथा वर्ण शूद्र, त्याला वेदाचा अधिकार नाही म्हणून त्याच्यापाशी असणारी सेवावृत्ती बाकी तीन वर्णांच्या अधीन राहिली.. 

शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणांनुसार ब्राह्मण कर्म करतात.. तर शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य, आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांनुसार क्षत्रिय कर्म करतात.. 
शेती, गोपालन आणि व्यापार हे वैश्यांचं स्वभावजन्य कर्म तर श्रम, इतरांची सेवा करणं हे शूद्रांचं.. 
आपापल्या स्वाभाविक कर्मांत तत्पर असलेल्यास परमसिद्धीचा लाभ मिळतो.. जे भगवंत सर्व जीवांचे उगमस्थान आहेत, ज्यांनी आपल्या बहिरंगा आणि अंतरंगा शक्तीद्वारे संपूर्ण सृष्टी व्यापली आहे त्या भगवंतांची, परमात्म्याची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करुन मनुष्य परमसिद्धीस प्राप्त होतो.. स्वतःचा धर्म आचरणास कठीण असला तरी आणि दुसऱ्याचा धर्म आचरणास कितीही सोपा असला तरी, आपला धर्म श्रेष्ठ मानून, नेमून दिलेलं स्वधर्मरूपी कर्म करणाऱ्याला पाप लागत नाही.. म्हणूनच सदोष असलं तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये..  

आसक्तिरहित बुद्धी असलेला, निःस्पृह असा जितेंद्रिय (इंद्रियांवर विजय मिळवलेला) त्याच्या संन्यस्थवृत्तीनं कर्मबंधनातून मुक्त होऊन ज्ञानसिद्धीला प्राप्त होतो.. ज्यानं ह्या सिद्धीची प्राप्ती केली आहे तो सर्वोच्च ज्ञानाची परमसिध्द अवस्था म्हणजेच ब्रह्मावस्था प्राप्त करतो.. अश्या योग्याची लक्षणं सांगताना श्रीभगवान म्हणतात.. 
विशुद्ध बुद्धीनं युक्त, हलका-सात्त्विक-नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयांचा त्याग करुन एकांतात शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्त्विक धारणाशक्तीनं अंतःकरण व इंद्रियांवर संयम ठेवून मन-वाणी-शरीर ताब्यात ठेवणारा, राग-द्वेष पूर्णपणे नाहीसे करुन दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार-बळ-घमेंड-कामना-राग-संग्रहवृत्ती यांचा त्याग करुन नेहमी ध्यानयोगात तत्पर असणारा, ममतारहित व शांतियुक्त असा मनुष्य ब्रह्मरूप होण्यास पात्र होतो.. असा हा ब्रह्मरूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करीत नाही आणि कशाचीही इच्छा करीत नाही.. सर्व प्राण्यांच्या ठायी समभाव बाळगणारा असा हा योगी पराभक्तीला प्राप्त होतो.. त्या पराभक्तीच्या योगानं तो परमात्म्याला तो जसा आहे तसाच तत्त्वतः जाणतो आणि परमात्म्यात विलीन होतो.. 
थोडक्यात, परमात्म्याशी अनन्यभाव ठेवून, सर्व कर्मे त्याला अर्पण करून, समबुद्धिरूप योगाच्या अवलंब करणारा कर्मयोगी परमेश्वर कृपेनं शाश्वत अविनाशी अशा पदाला प्राप्त होतो.. 

अश्याप्रकारे माझ्या ठिकाणी (परमात्म्याठायी) चित्त ठेवल्यानं तू सर्व संकटातून सहजच पार होशील.. आणि जर अहंकारामुळं माझं सांगणं टाळशील तर तू नाश पावशील अर्थात परमार्थाला मुकशील.. 'मी युद्ध करणार नाही' हा तुझा निश्चय व्यर्थ आहे कारण तुझा क्षत्रिय स्वभाव तुला जबरदस्तीनं युद्ध करायला प्रवृत्त करेल.. जे कर्म तू आप्तांच्या मोहामुळं करु इच्छित नाहीस ते तू पूर्वकृत स्वाभाविक कर्मानं बद्ध असल्यानं नक्कीच करशील.. हे अर्जुना, शरीररुपी यंत्रावर आरुढ झालेल्या सर्व प्राण्यांच्या हृदयांत वास करून योगमायेच्या साह्यानं त्यांच्या त्यांच्या कर्मानुसार अंतर्यामी परमेश्वर सूत्रं हलवत असतो.. त्यामुळं पूर्णपणे त्या अंतर्यामी परमेश्वराला शरण जा.. त्या परमात्म्याच्या कृपेनंच तुला परमशांती आणि सनातन परमधाम मिळेल..

एवढं सगळं गोपनीयाहूनही अतिगोपनीय ज्ञान सांगून झाल्यावर, युद्धाचा निर्णय श्रीभगवान अर्जुनावर सोपवतात.. 
.. आणि म्हणतात, तू माझा अत्यंत प्रिय सखा असल्यामुळं मी तुला सर्व ज्ञानातील अत्याधिक गुह्यतर असं परमश्रेष्ठ वचन परत एकदा सांगतो जे तुझ्या हितार्थ आहे.. हे अर्जुना, तू माझं चिंतन कर.. माझा भक्त हो.. माझे पूजन कर.. आणि मलाच नमस्कार कर.. असं केलं असता तू मलाच येऊन मिळशील.. सर्व कर्तव्यकर्मे मला अर्पण करुन तू सर्व शक्तिमान अशा मला परमेश्वराला शरण ये.. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करेन.. तू भयभीत होऊ नकोस.. आणि हे ज्ञान त्यांनाच सांग ज्यांची माझ्यावर श्रद्धा आहे.. हे परमगुह्य गीताशास्त्र जो माझ्या भक्तांना सांगेल तो मला प्रिय असेल.. आणि जो कोणी ह्या पवित्र संवादाचं अध्ययन करेल तो आपल्या बुद्धीद्वारे माझं पूजनच करेल.. 

पुढं श्रीभगवान अर्जुनाला त्यानं हे गीताशास्त्र एकाग्रचित्तानं ऐकलं आहे का? आणि अज्ञानातून उत्पन्न झालेला त्याचा मोह नाहीसा झाला का? असं विचारतात.. 
श्रीभगवानांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणतो, "हे अच्युता, आपल्या कृपेनं माझा मोह नाहीसा झाला आहे.. मला माझ्या खऱ्या स्वरूपाची स्मृती पुन्हा प्राप्त झाली आहे.. आता मी संशयरहित झालो आहे.. आणि मी आपल्या आज्ञेनुसार कर्म करण्यास तयार आहे.."

रूढार्थानं श्रीकृष्णार्जुन संवाद इथं संपला.. गीताशास्त्राची सांगता झाली..
माऊली म्हणतात.. यया अर्जुनाचिया बोला। देखे नाचे सुखे भुलला। म्हणे विश्वफळा जाला। फळ हा मज।।.. अर्जुनाचा होकार ऐकून भगवान सुखानं अतिहर्ष पावून प्रेमानं  नाचू लागले आणि म्हणाले 'या विश्वरूप फळाला मला अर्जुन हे एकच फळ उत्पन्न झालं'.. 

हा श्रीकृष्णार्जुन संवाद संपल्यावर संजय महाराज धृतराष्ट्रांना म्हणाला, "अशाप्रकारे मी श्रीवासुदेव आणि अर्जुन या दोन महात्म्यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला.. श्रीव्यासांच्या कृपेनं, दिव्य दृष्टी मिळवून, मी हे परम गोपनीय ज्ञान योगेश्वर भगवान श्रीकृष्ण, अर्जुनाला सांगत असताना प्रत्यक्ष ऐकले.. महाराज, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा रहस्यमय, कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होत आहे.. हे राजन, श्रीहरीचे ते अत्यंत अलौकिक रुपही वरचेवर आठवून माझ्या मनाला खूप आश्र्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे.. आणि... जिथं योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहेत, गांडीव धनुष्य धारण करणारा त्यांचा परमभक्त अर्जुन आहे, तिथंच लक्ष्मी, विजय, ऐश्वर्य आणि अचल नीती आहे असं मला वाटतं..".. ह्या संजयाच्या वचनानं अध्यायाची सांगता होते.. 

म्हणे पार्थ, हे अच्युता 
चिरंतर सत्य उमजले मजला 
नष्ट होऊनी अज्ञान मोह माया 
स्मृतिप्रकाशे विषाद हा संपला 


हरी तद् सद् 

॥ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु॥




-मी मधुरा.. 

************************************************