आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदाम्।
अभिरामस्त्रिलोकानां रामः श्रीमान् स नः प्रभुः॥१६॥
आरामः : बगीचा, वन विरामः : शेवट करणारा, मुक्ती देणारा सकलापदाम् : सकल + आपदाम् : सर्व संकटांचा
अभिरामस्त्रिलोकानां : अभिराम: + त्रिलोकानां : तिन्ही लोकांना आवडणारा, मनोहारी श्रीमान् : श्रीमंत
स नः प्रभुः : आमचा देव आहे
अर्थ-
प्रभू श्रीराम कल्पवृक्षांचा बगीचा आहे.. सकल संकटांपासून मुक्ती देणारा आहे..
तिन्ही लोकांमध्ये मनोहारी आहे.. असे हे प्रभू श्रीराम निःसंदेह आमचे प्रभू आहेत..
विवरण-
आराम-विराम-अभिराम हे ह्या श्लोकातील तीन यमक..
आराम म्हणजे बगीचा.. विराम म्हणजे शेवट पण इथं मुक्ती देणारा तर अभिराम मधील अभि म्हणजे अभि म्हणजे सर्वांच्या दृष्टीचे केंद्र, ज्यावर सर्वांचे डोळे खिळलेले आहेत असा मनोहारी ऐश्वर्य युक्त, अतिशय सुंदर, कल्याणकारक, ज्यात पावित्र्य असते असा अर्थ अभिप्रेत आहे..
तरुणौ रूपसंपन्नौ सुकुमारौ महाबलौ।
पुण्डरीक विशालाक्षौ चीरकृष्णाजिनाम्बरौ॥१७॥
पुण्डरीक : कमळ विशालाक्षौ : मोठे डोळे असलेला
चीरकृष्णाजिनाम्बरौ : चीर (वल्कले)+कृष्णाजिन (काळवीटाचं कातडं)+अंबरौ (परिधान केलेला) कृष्ण : गडद रंग
अर्थ-
तरुण, रूपसंपन्न, सुकुमार, महाबली, कमळाच्या आकाराचे मोठे डोळे असलेले, गडद रंगाची वल्कलं जीन परिधान करणारे
फलमूलाशिनौ दान्तौ तापसौ ब्रह्मचारिणौ।
पुत्रौ दशरथस्यैतौ भ्रातरौ रामलक्ष्मणौ॥१८॥
फलमूलाशिनौ : फल+मूल+अशिनौ (फळं-कंदमूळं भक्षण करणारे) दान्तौ : इंद्रियं दमन करणारे जितेंद्रिय
अर्थ-
फळं-कंदमूळं भक्षण करणारे, तपस्वी, ब्रह्मचारी, असे दशरथ राजांचे पुत्र हे बंधू राम लक्ष्मण
शरण्यौ सर्वसत्वानां श्रेष्ठौ सर्वधनुष्मताम्।
रक्षः कुलनिहन्तारौ त्रायेतां नो रघूत्तमौ॥१९॥
शरण्यौ : शरण देण्याजोगा सर्वसत्वानां : सर्व प्राणिमात्र
अर्थ-
सर्व प्राणिमात्रांचं आश्रयस्थान असलेले, सर्व धनुर्धारी योद्ध्यांमध्ये श्रेष्ठ, असुरकुळांचा नाश करणारे ते उत्तम रघुकुलोत्पन्न आमचं रक्षण करोत..
आत्तसज्जधनुषाविषुस्पृशा वक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ।
रक्षणाय मम् रामलक्ष्मणावग्रतः पथि सदैव गच्छताम्॥२०॥
आत्तसज्जधनुषौ : आत्त (धारण केलेलं)+सज्ज+धनुषौ+ईषुस्पृशौ(बाण)
अक्षयाशुगनिषङ्गसङ्गिनौ : अक्षय(कधीही न संपणारा)+आशुग(पुढं जाणारा)+निषङ्ग (भाता)+सङ्गिनौ(जवळ)
रामलक्ष्मणावग्रतः : रामलक्ष्मणौ + अग्रतः(पुढं)
अर्थ-
धनुष्य धारण करून नेहमी सुसज्ज असणारे तसेच पुढं जाणाऱ्या बाणांचा अक्षय भाता जवळ असलेले श्रीराम व लक्ष्मण माझ्या रक्षणाकरिता माझ्या मार्गामध्ये नेहमी पुढं चालत राहोत..
विवरण-
धनुष्य हे ज्ञानाच प्रतीक तर बाण हे विवेकाचं असं मानलं जातं..
आत्तसज्जधनुषौ- धनुष्य धारण केलेले श्रीराम हनुमंताच्या हृदयी नेहमी विराजमान असतात.. असं तुलसीदासांनी वर्णन केलं आहे.. आणि त्याचं स्पष्टीकरण देताना ते म्हणतात.. मारुतीरायानंच तशी श्रीरामाना विनंती केली होती की कापिकुलातील मला हृदयात, मनात केव्हा विकार येतील हे सांगता येणार नाही.. आणि हे विकार दूर करण्यासाठी श्रीरामांना विलंब नको म्हणून त्यांनी धनुष्य बाण घेऊन बसावे..
ह्या श्लोकांत धनुष्य सज्ज असणारे, बाणांना स्पर्श करणारे आणि अक्षय बाणांचा भाता असणारे अशी तीन विशेषणं आहेत..
संनद्धः कवची खड्गी चापबाणोधरो युवा।
गच्छ्न् मनोरथोऽस्माकं रामः पातु सलक्ष्मणः॥२१॥
संनद्धः : निरंतर सज्ज कवची : चिलखत घातलेला. खङग : तलवार
अर्थ-
निरंतर सज्ज असलेले, अंगात कवच (चिलखत) घातलेले, हाती खड्ग आणि धनुष्यबाण धारण करणारे हे तरुण राम आणि लक्ष्मण आमच्या मनोरथाचं रक्षण करोत..
।। श्री रामचंद्रम शरणं प्रपद्ये ।।
🙏
-मी मधुरा..
************************************************
No comments:
Post a Comment