Saturday, October 13, 2018

शक्तिरूपेण ४ - अंजना : एक तपस्विनी




अंजना.. रामभक्त हनुमानाची माता.. या शिवाय तिची ओळख आपल्याला अशी नाहीच..

अंजना... एक योगिनी.. एक तपस्वीनी... जिचे मनावर, शरीरावर आणि भावनांवर नियंत्रण आणि स्वामित्व होते...

अशी ही अंजना नेमकी कोण होती? तिच्या जन्माच्या अनेक आख्यायिका प्रचलित आहेत.. काहींप्रमाणे, ती महर्षी गौतम आणि अहिल्येची मुलगी होती.. तर काहींप्रमाणे ती अप्सरा ''पूंजिकस्तला'' जी दुर्वास ऋषीच्या शापामुळे वानरकन्या अंजना म्हणून जन्म घेते...

थाई रामायणानुसार एक दिवस महर्षी गौतम, अहिल्या आणि त्यांची तीन मुले वाली, सुग्रीव आणि अंजना… तुंगभद्रा नदी किनारी चालत होते. आपली मुले सावत्र आहेत, हे गौतमांना माहिती न्हवते. दोन्ही मुले वडिलांसोबत होती तर अंजना अहिल्ये बरोबर चालत होती.. उन्हामुळे छोट्या अंजनेचे पाय भाजत होते.. आपल्या भावांना वडिलांनी उचलून घेतलेले पाहून तिला राग आला आणि ती त्यांना म्हणाली कि तुम्हाला तुमच्या मुलीची काळजी नाही पण सावत्र मुलांची आहे.. तिच्या बोलण्याने क्रोधीत झालेल्या गौतमांनी आपल्या मुलांना नदीत फेकून दिले..आणि म्हणाले, "जर का ती माझी मुले असतील तर ती नदीतून सुखरूप परत येतील.. अन्यथा वानर बनून राहतील.." वाली हा इंद्राचा तर सुग्रीव हा सूर्याचा मुलगा.. अहिल्या फक्त त्यांचा सांभाळ करत असते.. मुलांचे वानरात रूपांतर झालेले पाहून व्यथित झालेली अहिल्या अंजनाला शाप देते कि तिचा मुलगा पण वानर होऊन जन्माला येईल..

दुसरी कथा अशी सांगितली जाते कि.. त्रेतायुगामध्ये, ''पूंजिकस्तला'' नावाची एक अप्सरा होती... एकदा ऋषी दुर्वास इंद्राला भेटायला गेले असताना, इंद्रांने त्यांना त्याच्या सेवेसाठी कोणती अप्सरा हवी असे विचारले... स्वतःच्या सौंदर्याचा गर्व असणाऱ्या 'पूंजिकस्तला'ने दुर्वासांची टिंगल केली.. संतप्त दुर्वासांनी 'ज्या सौंदर्याचा तुला अभिमान आहे ते सौंदर्य क्षणभंगुर आहे.. तू पृथ्वीतलावर वानर म्हणून जन्माला येशील..' असा शाप दिला... नंतर तिच्या सेवेने, तिला झालेल्या पश्चातापाने प्रसन्न होऊन ते तिला आशीर्वाद हि देतात, 'तू एका महान पुत्राची आई होशील.. जो चिरंजीवी असेल..'

अशी ही शापित पूंजिकस्तला वानरराज कुंजर ची मुलगी म्हणून जन्म घेते... आभूषण, वस्त्रालंकार ह्या स्त्री सुलभ आवडी बरोबरच शस्त्रास्त्र, अध्यात्म, राजकारण ह्यात ही तिची रुची वाखाण्याजोगी होती.. धनुर्विद्येत तिचा हात धरणारे पंचक्रोशीत कोणीही नव्हते.. राक्षसांच्या रोजच्या होणाऱ्या उपद्रवापासून संरक्षण करण्यासाठी ऋषी पलभ इतर महारथीं बरोबर ह्या पराक्रमी अंजनाला हि आमंत्रित करतात.. तिथे अंजनाचे युद्ध नीती, युद्ध नैपुण्य,पाहून वानरराज केसरी तिच्या प्रेमात पडतो..

मातृत्वासाठी व्याकुळ झालेली अंजना, ऊन-वारा-पाऊस कशाचीही पर्वा न करता सात वर्षे शंकराची तपश्चर्या करते... तिच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन शंकर तिला मातृत्वाचे वरदान देतो. पौराणिक कथेनुसार वायुदेवाकडून शंकर-पार्वतीनी पाठवून दिलेला त्यांचा अंश धारण करून अंजना गर्भवती राहते.. आणि हनुमानाचा जन्म होतो..

''पूंजिकस्तला''ला मिळालेला शाप, अंजना झाल्या नंतरची तिची जडण घडण, मातृत्वासाठी केलेली तपश्चर्या हे नाट्य विधिलिहित तर नसेल? हनुमानासारख्या महान पुत्राला जन्म देणारी माता हि तितक्याच ताकदीची असावी म्हणून.. अंजनाचा जीवन प्रवास पाहता ती नेहमी स्वतःची प्रगती करताना दिसते मग ती धार्मिक असुदे किंवा अध्यात्मिक.. हनुमानाबरोबर पण ती त्याच्या बालपणातच दिसते.. आईची गरज आहे तिथवरच.. हनुमानाला सूर्याकडे शिष्य म्हणून सुपूर्द करून ती मातृ कर्तव्यातून मुक्त होते.. काहींच्या मते ती अप्सरा बनून स्वर्गात जाते... तर काहीच्या मते तपश्चर्या करण्यासाठी...

अश्या ह्या स्वयंप्रेरित अंजनाची ओळख केवळ "हनुमानाची माता" अशी असण्यापेक्षा एक योद्धा, एक तपस्विनी अशी हि असावी...



-मी मधुरा.. 
#शक्तिरूपेण ४/९
************************************************

Friday, October 12, 2018

शक्तिरूपेण ३ - मंदोदरी : लंकेची साम्राज्ञी




मंदोदरी.. लंकाधिपती रावणाची पत्नी, महापराक्रमी इंद्रजीतची माता ही तिची ओळख.. रामायणात ती आपल्याला रावणाला साथ देणारी, कधी कधी त्याला त्याच्या  चुका दाखवून योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारी पत्नी.. अशी ती भेटते...

मंदोदरी.. एक महान पतिव्रता.. खरं तर रावण आणि रावणाच्या वधानंतर बिभीषण असे दोन पती असलेली मंदोदरी पतिव्रता कशी? हा प्रश्न नक्कीच पडतो.. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रात तर तिला वाली, रावण आणि बिभीषण असे तीन पती असल्याचा उल्लेख आहे.. त्यात असे म्हंटले आहे कि प्रत्येक लग्नानंतरची मंदोदरी वेगळी होती कारण प्रत्येकवेळी तिचे शरिराणू वेगळे होते.. तमोगुणी रावणाबरोबर त्याला अनुसरून तिने व्यवहार केला तर बिभीषणाबरोबर सत्वगुण परिधान करून वागली..  प्रत्येक लग्नात ती पतीशी एकनिष्ठ राहिली म्हणून ती महान पतिव्रता...

मंदोदरी.. पंचकन्या मधील एक व्यक्तिमत्व... अहिल्या, द्रौपदी, सीता, मंदोदरी आणि तारा ह्या पंचकन्या मानल्या आहेत.. त्यांच्या जीवनपटातून नारीवादाच्या भिन्न प्रतिमानांचे प्रदर्शन होते.. पुराणानुसार त्यांच्या नावाच्या उल्लेखाने सुद्धा पाप हरण होते.. 'असुर कन्या' ते 'स्त्री शक्तीचे अनोखे रूप' हा प्रवास कसा घडला असेल? अशी ही मंदोदरी नेमकी कोण होती?

मंदोदरी.. असुरराज मयासुराची मानसकन्या.. एक शापित अप्सरा... पार्वतीच्या शापामुळे ही अप्सरा बेडूक बनून एका तळ्यात बारा वर्षे राहते.. शंकराच्या उपासनेने तिचे बारा वर्षानंतर एका सुंदर तरुणीत रूपांतर होते... हीच ती असुरराज मयासुर आणि हेमा यांची मुलगी मंदोदरी...

मंदोदरी सुंदर तर होतीच पण त्या बरोबर ती दयाळू, धार्मिक आणि सदाचारिणी पण होती... युक्तिवादात ही ती पारंगत होती... प्रामाणिकपणे बोलण्याची क्षमता, हळुवार पण मुद्देसूद बोलणे हे तिचे अजुनी एक वैशिष्ठ... आपले मत स्पष्ट मांडले पाहिजे ह्या बद्दल आग्रही होती.. रावणाशी विवाह झाल्यावर तिला ह्या कौशल्याचा नक्कीच फायदा झाला..

मयासुराकडे आलेला रावण मंदोदरीला पाहतो आणि तिच्या प्रेमात पडतो.. आणि लग्न करायची इच्छा व्यक्त करतो.. मयासुराचा नकार ऐकून क्रोधीत झालेला रावण विद्रोह करतो.. आपल्या वडिलांना भयभीत झालेले पाहून, केवळ रावण हा शिवभक्त आहे ह्या विश्वासावर ती त्याच्याशी लग्न करायला तयार होते.. अत्यंत विश्वासू आणि पतिव्रता असलेली मंदोदरी रावणाच्या चुकीच्या आणि भ्रष्ट वागणुकीला कडकडून विरोध करत असे.. पण रावणाला धार्मिकतेच्या मार्गावर आणणे केवळ अशक्य होते.. 

सीतेचे अपहरण हे मोठ्ठे आव्हान तिने पेलले.. रावणाच्या वासनाना आवार घालणे शक्य नाही हे तिला माहिती होते… पण तरी लंकेच्या, कुळाच्या भल्यासाठी त्याने सीतेला सोडून द्यावे ह्यासाठी तिने खूप प्रयत्न केले.. सीताचे आयुष्य वाचवण्यासाठी मंदोदरीने आपली शक्ती पणाला लावली.. सीता लग्नाला तयार होत नाही हे सहन करू न शकलेला रावण जेव्हा सीतेवर तलवार उगारतो तेव्हा मंदोदरी त्याला असे करण्यापासून परावृत्त करते आणि सीतेला रामाकडे सुखरुप सोडून येण्यास सांगते... सौन्दर्यावर मोहित होऊन, लग्नासाठी अपहरण केलेल्या पर-स्त्री ला ती अभय देते... हा स्त्रीचा केलेला सन्मान नक्कीच प्रशंसनीय आहे.. युद्धाचा परिणाम माहिती असून सुद्धा, जेव्हा रावण युद्धासाठी निघतो तेव्हा त्याला तिलक लावून त्याच्या विजयाची कामना करते.. पतिव्रता स्त्री प्रमाणे ती सुखात दुःखात त्याच्या मागे उभी राहते...

युद्ध संपल्या नंतर मंदोदरी युद्धभूमीला जेव्हा भेट देते तेव्हा तिथला विनाश पाहून, धारातीर्थी पडलेला आपला पती, मुले, रावण सैना पाहून व्यथित होते.. लंकेचा झालेला विनाश टाळू न शकल्याच्या अपराधी भावनेने ती स्वत:ला महालात कोंडून घेते... मंदोदरीच्या सांत्वनासाठी आलेला राम तिला लंकेच्या साम्राज्ञीच्या कर्तव्याची जाणीव करून देतो.. रावणाची विधवा असली तरी ती एक विदुषी होती.. तिच्यातील असलेल्या कौशल्याचा, राजकारणातील ज्ञानाचा उपयोग लंकेचे राज्य सुराज्य करण्यासाठी करावा... तसेच लंकेच्या भवितव्यासाठी बिभीषणाशी लग्न करून लंकेची सम्राज्ञी म्हणून राज्य करावे... असा मानस ही राम व्यक्त करतो. 

अशी हि मंदोदरी..., लंकेच्या हितासाठी बिभीषणाशी लग्न करून लंकेला पुनर्जीवित करते...



-मी मधुरा.. 
#शक्तिरूपेण ३/९
************************************************


Thursday, October 11, 2018

शक्तिरूपेण २ - अहिल्या





अहिल्या!!... रामायणातील एक उपेक्षित पात्र.. रामाची महती सांगण्यासाठी तर ह्या पात्राची निर्मिती झाली नाही ना असा प्रश्न पडावा इतपत उपेक्षित! शिळा होऊन पडलेल्या अहिल्येला रामाचा पाय लागतो आणि ती शापमुक्त होते.. एवढाच काय तो उल्लेख..

अहिल्या..  स्वर्गीय अप्सरा उर्वशीचा अभिमान तोडण्यासाठी ब्रह्माने स्वतः निर्मिलेले हे सुंदर शिल्प !!...

अश्या ह्या शिल्पाची देखभाल करण्यासाठी योग्य व्यक्ती म्हणजे महर्षी गौतम... गुणी, विवेकी आणि वेदातील गहन ज्ञानी.... ही रूपवती बालिका महर्षी गौतमांच्या आश्रमात राहू लागते... फक्त वयात येईपर्यंत... रुपगर्विता युवती अहिल्येला घेऊन जेव्हा महर्षी ब्रह्माकडे जातात, तेव्हा महर्षींचा संयम, ज्ञान आणि तपस्येने ब्रह्मा प्रभावित होतात.  

ब्रह्माच्या मनात आपल्या उपवर कन्येसाठी महर्षीं गौतम योग्य वर होते. पण अहिल्येच्या  सौंदर्याने देव, दानव, ऋषी, महर्षी सगळेच आकर्षित झाल्याने त्यांनी स्वयंवर करायचे ठरवले... सर्वप्रथम पृथ्वीप्रदक्षिणा करून परत येईल त्याच्याशी अहिल्येचा विवाह होईल... महर्षी गौतमावर प्रभावित होऊन ब्रह्मा त्यांना सांगतात कि एक गाय जिने नुकताच वासराला  जन्म दिला आहे तिला प्रदक्षिणा घातली तर ती पृथ्वीप्रदक्षिणे सामान आहे... आणि महर्षी गौतम आणि अहिल्येचा विवाह संपन्न होतो... अहिल्या न मिळाल्याने संतप्त झालेला इंद्र महर्षी गौतमांच्या आश्रमात येतो. महर्षी नाहीत ही खात्री करून त्यांचेच रूप घेऊन अहिल्ये बरोबर कामक्रीडा करतो... काहीतरी विपरीत घडते आहे ह्याची जाणीव झाल्याने लवकर परत आलेले ऋषी देवराज इंद्राला तेथे पाहून क्रोधीत होऊन शाप देतात... त्यांच्या क्रोधातून अहिल्या पण सुटत नाही... 'स्वतःच्या नवऱ्याचा स्पर्श न ओळखणारी तू ... पापी आहेस... तू ज्या रूपावर गर्व करतेस ते नाहीसे होऊन तू एक शिळा होशील… भगवान विष्णू जेव्हा ह्या आश्रमात येतील तेव्हाच तुझी ह्या शापातून मुक्तता होईल'... असे सांगून ते हिमालयात निघून जातात...

सर्वोच्च सृष्टीकाराने तयार केलेलं हे जिवंत शिल्प विष्णूची/रामाची वाट पाहत निर्जीव होऊन पडून राहतं.. सौंदर्याला मुकून, जगासाठी अदृश्य झालेली, अन्यायाने होरपळलेली अहिल्या विष्णूची अधीरतेने वाट पाहण्या व्यतिरिक्त काहीच करू शकत नाही..

ह्या पौराणिक कथेत, अहिल्येचे काय चुकले? का तिला असा शाप मिळाला? तिची बाजू का जाणून घेतली गेली नाही? ना विवाह प्रसंगी ना इंद्राकडून फसवणूक झाल्यावर... 'तुला कसा पती हवा?' हा प्रश्न ब्रह्माला तिला विचारावासा नाही वाटला?  जप-जाप्य, तपश्चर्या हेच जीवन असलेल्या, वडील वयाच्या माणसाशी लग्न करून ती खरंच सुखी होती का? आपल्या शास्त्रात सांगितल्या प्रमाणे जीवनाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये माणसाची काही कर्तव्ये, काही जबाबदाऱ्या असतात... त्याचे कर्म त्याला करावेच लागते असे धर्म सांगतो.... मग ह्यातून महर्षी कसे सुटले? देवधर्म, तपश्चर्या आणि अध्यात्मा बरोबरच संसाराची जबाबदारी हे त्यांचे कर्तव्य नव्हते का? पत्नीला व्यभिचारी ठरवून, शाप देऊन हिमालयात निघून जाण्यात पुरुषार्थ होता का?

अहिल्येचे अनैतिक खरं-खोटं वर्तन ही कृती..  आणि शाप हा त्याचा परिणाम... असे असले तरी, शिळा होऊन पडलेल्या अहिल्येची मनस्थिती काय असेल? काय चालले असेल तिच्या मनात? काहीही चूक नसताना मिळालेली शिक्षा, झालेला अन्याय, झालेली फसवणूक आणि त्या बद्दलचा सात्विक संताप.. स्वाभिमानाला लागलेली ठेच आणि यातून आलेले नैराश्य… भावनांचा उद्रेक आणि शिळा होऊन पडल्यानंतरची असहाय्यता, घुसमट… आणि नंतर त्यातून आलेले परिस्थितीचे भान आणि त्याची स्वीकृती… की आणि काही? स्वतःची चूक नसताना झालेला अन्याय पचवून, तो स्वीकारून परिस्थितीशी एकरूप होणे.. ह्या दिव्यातून जाताना काय वाटले असेल तिला? राम येई पर्यंतचा अनिश्चित काळ सहनशीलतेने काढणे कसे जमले असेल तिला?  

इतकी युगे लोटली तरी अजूनही समाज बदलला नाही. आज ही आपल्याला अश्या अहिल्या पाहायला मिळतात.. समाज प्रबोधनासाठी, नवीन समाज रचनेसाठी रामायण लिहिले गेले... जर आपण रामायण, राम, सीता हा आदर्श मनात असू तर मग ह्या अहिल्या अजुनी का आहेत? असा प्रश्न पडल्या शिवाय राहत नाही.



-मी मधुरा.. 
#शक्तिरूपेण २/९
************************************************

Wednesday, October 10, 2018

शक्तिरूपेण १ - गांधारी: शापित राजकन्या



गांधारी म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर उभी राहते ती एक पतिव्रता, जिने आपल्या अंध पतीसाठी अंधत्व स्वीकारले... जिला पतिव्रतेच्या सामर्थ्यामुळे अलौकिक शक्ती प्राप्त झाली... आणि यामुळेच जिच्या वाणीतून उमटणारा शब्द दुर्योधनासाठी वरदान किंवा श्रीकृष्णासाठी शाप ठरला..

गांधारी म्हटले कि शंभर पुत्रांची माता डोळ्यासमोर येते. पण खरंच तिची झालेली ही ओळख पुरेशी आहे? न्याय, नीती आणि धर्म ह्यावर अढळ श्रद्धा असणारी गांधारी फक्त एक पतिव्रता आणि शंभर पुत्रांची आई ह्या चौकटीत बसू शकेल? कुरु परिवारात असणारी कोणतीही स्त्री सामान्य कशी असेल? मग ती नेमकी कोण होती?...

गांधार देशाची म्हणून गांधारी असलेली ही "नंदिनी"... सुबल राजाची लाडकी कन्या "नंदिनी"... शापित सौंदर्याचं लेणं घेऊन आलेली "नंदिनी"... विनम्रता, बुद्धीचातुर्य, न्याय, नीती-धर्म यांचा अभ्यास असणारी "नंदिनी".... तेजाचे प्रतीक असणारी "नंदिनी"... शंकराकडून पतिव्रता आणि शतपुत्रवती चा आशीर्वाद मिळालेली "नंदिनी"... स्वतःवर, नियतीवर आणि वडिलांवर विश्वास असणारी “नंदिनी”.... केवळ वडिलांनी दिलेले वचन पाळण्यासाठी एका अंध राजाशी विवाह करून क्षत्रिय धर्माचे पालन करणारी “नंदिनी”... कुरुपरिवारातील गांधारीपेक्षा ही नंदिनी नक्कीच वेगळी होती... मग हस्तिनापुरात आल्यावर तिचे असे का व्हावे?  

डोळ्यात लाखो स्वप्ने घेऊन येणारी ही गांधारी नवथर नववधू तर नक्कीच नव्हती.. आपल्या सर्व स्वप्नांचा, इच्छा-भावनांचा, अंध पतीच्या जीवनाशी एकरूप होण्यासाठी त्याग करणारी स्त्री नवथर कशी असेल? डोळ्यावर पट्टी बांधून, स्वतःच्या स्वप्नांवर, सुखावर पट्टी बांधून अंध नवऱ्याच्या सुखात सुख मानणारी ही असामान्य स्त्री म्हणजे गांधारी!

डोळ्यावर पट्टी बांधून जेव्हा तिने हस्तिनापुरी प्रवेश केला असेल तेव्हा तिच्या काय भावना असतील???.... विवाहाच्या वेदीवर चढताना खरंच तिचे मन शांत असेल का? हृदयात चलबिचल नसेल का? एक स्त्री म्हणून भविष्याबद्दल रेखाटलेली स्वप्ने विवाहाच्या होमात भस्म होताना, आयुष्यातल्या अपेक्षांना आहुती देताना, साऱ्या सुखाला तिलांजली देताना ती स्वतःच्या अस्तित्वाला तर दूर करत नसेल?  विवाह संपन्न होत असताना ऐकू येणारा आईवडिलांचा हुंदका जो सुखाचा नव्हता, जो अंध पतीसाठी नव्हता तर डोळे असून अंध झालेल्या मुलींसाठी होता हे अनुभवणे किती कठीण आहे... हा नुसता डोळ्यांचा त्याग नव्हता तर सर्वस्वाचा त्याग होता आणि ह्या त्यागात ती धन्यता मनात होती. यापुढे फक्त लोकांची सहानुभूती, आणि त्यांचे शब्द, प्रसंगी कुत्सित टीका हे आयुष्य ती केवळ त्यागाच्या बळावर काढणार होती...

स्त्रीचा पुत्रप्राप्तीचा आनंद हा अवर्णनीय असतो.. त्यातून शतपुत्रांना जन्म देणारी एक माता मग तो गौरव काय वर्णावा.. पण दुर्योधनाच्या जन्मानंतर घडलेल्या अशुभ घटनांमुळे जेव्हा त्या तान्ह्याला कुलसंहारक संबोधून त्याचा त्याग करायचा सल्ला दिला जातो तेव्हा त्या माउलीला काय वाटले असेल? भविष्यात हा कुलसंहारक होईल म्हणून आत्ताच ममत्वाचा त्याग करायचा? नियतीच्या मनात जे असेल ते होईल पण पुत्राचा त्याग नाही करणार हे सांगण्या इतकी ती विद्रोही नक्कीच होती.

डोळ्यांवर पट्टी बांधून एखादया तपस्विनी प्रमाणे पतिधर्माची तपस्या करणाऱ्या गांधारीला, त्याच डोळ्यांनी  कुरुकुलाचा विनाश झालेला पाहायचा होता.. आणि तो विनाश तिच्या ज्येष्ठ पुत्राच्या हट्टामुळे होणार होता.. आणि हे विदारक सत्य तिला टाळता पण येणार नव्हते. सत्य, न्याय, नीती, दया, क्षमा जरी धर्माची रूपे असली तरी कर्तव्य हा सर्वश्रेष्ठ धर्म असतो. मातृत्व ह्या कर्तव्यात ती कमी तर पडत नव्हती ना??... बिचारी एक असहाय्य माता...

धृतराष्ट्र हस्तिनापुरचा कारभार पाहायला लागल्या नंतर राज्ञी असलेल्या गांधारीने कधी ही स्वतःला राज्ञी असे संबोधले नाही.. नीती धर्मावर श्रद्धा असणाऱ्या तिला हे राज्ञी पद कधी पटलेच नाही. विशाल अंत:करणाच्या गांधारीने पांडवांचा पक्ष प्रत्यक्ष कधीच स्वीकारला नसला तरी पांडवांच्या ठिकाणी असलेल्या धर्माचा विजय व्हावा अशी तिची अंतरीची साक्ष चकित करणारी आहे.

गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधून काय मिळवले? थोर पतिव्रता तर ती झाली पण कुरुवंशाचा आणि यादववंशाचा विनाश करण्याचे पातक तिच्या माथी आले.

गांधारीने जर केवळ पती अंध आहे म्हणून अंधत्व स्वीकारलं नसतं तर? अंध पतीचे डोळे बनून त्याच्या विचारांवर अंकुश ठेवला असता तर? दुर्योधनाच्या खलवृत्तीला वेळीच डोळसपणे योग्य ते संस्कार करून न्याय नीती आणि धर्म मनात रुजवला असता तर? .... कदाचित वेगळे महाभारत रचले गेले असते...



-मी मधुरा.. 
#शक्तिरूपेण १/९
************************************************

शक्तिरूपेण..

नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा!! Happy Navaratri Everyone!!


नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये मी मला भावलेल्या काही स्त्रियांबद्दल लिहिणार आहे.. आपल्या पुराणात, महाकाव्यात, इतिहासात अश्या अनेक शक्तिशाली प्रभावी स्त्रिया आहेत ज्या त्याच्यातील शक्तीचे, स्त्रियांच्या मनोभावनाचे प्रतिनिधित्व करतात, परंतु ज्या काळाआड हरवल्या आहेत किंवा त्यांना इतके प्राधान्य दिले गेले नाही.. ज्यांच्या बद्दल ह्यापूर्वी खूप काही लिहिले गेले आहे त्यांना मी यातून जाणीवपूर्वक वगळले आहे..

ह्या कथा रोमांचकारी आणि विस्मयजनक आहेत.. शापित अप्सरा, असहाय्य राजकन्या, ध्येयाने वेड्या झालेल्या माता... त्यांचे लहानपण, त्यांच्या लहानपणात घडलेल्या घटना आणि त्याचे तारुण्यात उमटलेले प्रतिसाद... नैतिकता-अनैतिकता, इच्छा-सूड, प्रेम-मत्सर, स्वार्थ-समर्पण… यामध्ये अडकलेल्या ह्या स्त्रिया ज्या शक्तिशाली आहेत, पण इतरांच्या तुलनेत त्यांच्या शक्तीचा वेगळ्या मार्गाने वापर करतात... प्रत्येकीची लढाई वेगळी आणि त्यावरची त्यांची युद्धनीती ही वेगळी.. काळाने काहींना भले खलनायिका म्हटले असेल पण मला ही सारी स्त्री शक्तीचीच रूपे वाटतात..

अश्या ह्या स्त्री शक्तींना यथाशक्ती यथामती नवरात्रीत अर्पिलेली ही काही शब्दपुष्पे… शक्तिरूपेण...



-मी मधुरा.. 

************************************************

Monday, October 1, 2018

Yoga in The Dark...

Yoga in The Dark... was blind for 90 mins.. 
30th September 2018

Darkness… hesitancy… vulnerability… confusion... these were the feelings that overwhelmed me as I signed up for 'Yoga in The Dark' class at my yoga studio. Being blind for ninety minutes was quite enough challenging thought for me.. But when I positively looked at it, I felt that 'the dark is the place where anything is possible.. I might nail every pose.. no judgements.. everything will be perfect.."

It was quite unique and enriched experience for me.. Removing the sense of sight challenged my mind and body, allowing me to experience yoga in a whole new way..

Practicing yoga in the dark is a great way to free yourself from observation and judgment... Not only people won't be able to see what you’re doing or you will not be able to compare yourself with others or watch what you are doing in a mirror... This freedom will allow you to dive deeply into your practice, freed from comparisons and expectations.... You will find that in the dark, you have the freedom to look silly, tumble out of poses, and try new things without the hesitation that you may feel in a class setting... It also allows you the freedom to do what you want... In the dark, you can customize your practice, listen to your body, try new things, all while testing your balance and focus... 

I did practice 'Pratyahara' 5th limb of Yoga.. detaching from my senses (which connect us to the outside world) and focusing within.. By actually removing one of our senses... sight.. I challenged myself to look inward and quiet the mind and tried to find deep self-awareness... When we remove sight, our balance get shifted... You will not be able to steady yourself by focusing on dristi (point of focus) or through the awereness of your surroundings... It was so hard to do just a Tree Pose, keeping myself steady and balanced.. but when I started looking inward and really focusing on the body and the breath I could able to achieve the balance what I needed..  

This gets to the heart of what yoga is all about: a mind-body connection.. that is achieved by filtering out the world around you and finding peace and awareness within.

“If light is in your heart, you will find your way home.”


-मी मधुरा.. 

************************************************

Tuesday, September 4, 2018

कृष्णसखी राधा

कृष्णसखी राधा

एकदा तो मला म्हणाला
होशील का माझी राधा?
तू कृष्ण झालास तर..
का नाही होणार मी राधा?

म्हटलं, कृष्ण होईल तो असाही तसाही
पण मला राधा व्हावं लागेल..
सुख त्यागून, संचित अर्पून
अनेक दिव्यातून जावं लागेल...

बाहेरचं जग, आतलं मन,
दृश्य देह, अदृश्य आकर्षण
समाजाची बंधनं, स्वत:ची नीतीमत्ता
सगळं झुगारून, उत्कटतेन रितं व्हावं लागेल..

खरंच, जमेल हे मला?
तो कृष्ण झाला तरी होऊ शकेन मी राधा?
सर्वस्व उधळले तरच होईल ही निरागस बाधा
रंगून रंगात त्याच्या होईन कृष्ण सखी राधा!


-मी मधुरा.. 

************************************************