Friday, October 23, 2020

नवरात्र नात्यांचे: आठवी माळ - जिवलग 'मैत्रिणीची'!!..

 🌸आठवी माळ - जीवाला जीव देणाऱ्या जिवलग 'मैत्रिणीची'!!..🌸


फोटो सौजन्य: लता प्रभुणे 
( माझ्या मैत्रिणीच्या घरचे नवरात्र ) 


आपलं सारं भावविश्व जिच्यात सामावलं आहे अशी ती.. 
रुसवे-फुगवे सहन करणारी.. गोड गुपितं सांभाळणारी.. 
सडेतोडपणे सल्ले देऊन सावरून घेणारी.. आपल्या यशात स्वतःचे यश मानणारी.. 
चांगल्या-वाईट सवयींकडे दुर्लक्ष करून खरी मैत्री जोपासणारी.. अशी जिवलग 'मैत्रिण'.. 

अशी एखादी मैत्रीण असावी .....
        कधी हसवणारी, कधी रागवणारी
        पण अचूक मार्ग दाखविणारी.                        
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी समजाविणारी, कधी समजून घेणारी
        पण गोड शब्दात आपली चूक सांगणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी काळजी घेणारी, कधी अश्रू पुसणारी
        अश्रू पुसता पुसता लढण्याची हिम्मत देणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        कधी भावना जाणणारी, कधी मोकळीक देणारी 
        नजरेत नजर मिळवून अतूट विश्वास दाखविणारी
अशी एखादी मैत्रीण असावी…
        साद घातल्यावर धावत येणारी
        हात हातात घेऊन मैत्रीचे नाते जपणारी

मैत्रीण हे नातं असं आहे कि ते प्रत्येकाला वेगळं भावतं.. ‘जसा भाव तसं नातं’.. खूपदा अनेक मैत्रिणी आयुष्याच्या ठराविक टप्प्यावर भेटतात आणि त्या टप्प्यावर आपलं नाव कोरून जातात.. तो टप्पा त्यांच्या अस्तित्वाने पुरेपूर भरून जातो.. 

अगदी लहानपणापणी एकत्र खेळलेली भातुकली, लावलेलं बाहुला बाहुलीचं लग्न, चिमणीच्या दातांनी वाटून घेतलेला खाऊ ते त्यांच्या बरोबरची लटकी भांडणं, रुसवे फुगवे.. पुढं कॉलेज मध्ये एकत्र बंक केलेले क्लासेस, कॅन्टीन मध्ये मारलेल्या गप्पा, एकत्र केलेला अभ्यास, पावसाळी सहली.. मैत्रिणी बदलतात पण ‘मैत्रीची भावना’ तीच राहते.. ऑफिस, सोसायटी, भिशी, हॉबी ग्रुप सगळ्या मैत्रिणी वेगळ्या पण त्यांच्यातील भावबंध एकच.. मैत्रीचा.. 

ह्या प्रत्येक टप्प्यावरची मैत्री आपल्यात, आपल्या व्यक्तिमत्वात बदल घडवत असते.. आपल्याला एक व्यक्ती म्हणून enrich करत असते.. 

माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर, आयुष्याच्या प्रत्येक टप्यावर मी ही अनेक मैत्रिणी जोडल्या.. ह्या मैत्रिणींनी मला नात्यातील unconditional acceptance शिकवला..

इथल्या, अमेरिकेतल्या माझ्या मैत्रिणी, माझ्या कुटुंबाचा एक घटक झाल्या आहेत.. माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाल्या आहेत.. पण तरीही, मैत्रिणी म्हटलं कि आठवतो तो शाळेचा ग्रुप आणि आठवते ती "ती".. आमची लाडकी मैत्रीण.. आमची जिवलग मैत्रीण.. प्रज्ञा.. 
आज मी तुला कसं विसरेन??.. तुझ्या बरोबर 'मैत्री'च हे सुंदर नातं, कसं छान उलघडत गेलं.. 
आज आम्ही सगळ्या एकत्र आहोत पण.. पण तू नाहीस.. 
इतकी लांब, कधीच परत न येण्यासाठी, का गेलीस? तू किती ही लांब गेलीस तरी आपल्या मैत्रीचे धागे इथेच आहेत..

अशी अचानक तू निघूनच गेलीस
अन अस्तित्वाने मला दूर केलस..              
रडले, कोलमडले, सैरभर ही झाले 
नकळत संसारात मी गुरफटून गेले  
पण तुझ्या मैत्रीची ओढ इतकी की
त्या आठवणींचीच मी मैत्रीण झाले.
खरं सांगू, 
आयुष्याच्या ह्या वळणावर, मन तुला शोधत असतं 
मैत्रिणींच्या घोळक्यात तुला मिस करत असतं  
समजलेल्या आयुष्याचे बरेच अर्थ तुला सांगायचेत
जगण्याच्या धावपळीत राहिलेले बरेच क्षण
तुझ्या मैत्रीत जगायचेत...   
ये ना ग परत... 
हवी तर झूम मीटिंगच ठेवू.. 
गुजगोष्टी करत घटकाभर विसावू.. 

मैत्रीचे भावबंध जपणाऱ्या सर्व मैत्रिणींना शतशः प्रणाम!! 🙏

-मी मधुरा..
२४ ऑक्टोबर २०२०

🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

No comments:

Post a Comment