Sunday, September 10, 2017

गणपती बाप्पा मोssरया...

बऱ्याच वर्षांनी आम्ही सगळे कुटुंबीय गणपतीसाठी भारतात जमलो होतो. खूप धम्माल केली. रात्र रात्र जागून केलेली सजावट, त्यासाठी केलेले एकत्र शॉपिंग, लेट नाईट केलेल्या स्टारबक्स च्या वाऱ्या.. घरातील, बिल्डिंग मधील तो सळसळता उत्साह.. सगळे कसे एनर्जेटिक होते. 

पण हे सगळे करत असताना एक लक्षात आले कि सण साजरे करण्याची पद्धत दिवसेंदिवस खूप बदलत चालली आहे. श्रद्धेपेक्षा, भावनेपेक्षा लोक दिखावा करण्यावर जास्त जोर देतात. किती पैसा खर्च केला ह्यावर भक्ती ठरवली जाते. हौसेला मोल नाही हे कितीही खरे असले तरी ती हौस भागवायला पैसा तर लागतोच ना? पुण्यातील लक्ष्मी रोड, तुळशीबाग, रविवार पेठ असो वा उपनगरातील दुकाने सगळी तुडुंब भरून वाहत होती. लोकांचे एकच टार्गेट आहे फक्त शॉपिंग असे काहीसे चित्र दिसत होते. एक एक गोष्टींच्या किमती पाहून माझ डोकं चक्रावत होत... कदाचित हे माझ्यासाठी नवीन असेल म्हणून हि असेल. कळताच नव्हते कि लोकांकडे पैसा जास्ती झाला आहे कि रुपयाची किंमत कमी झाली आहे. कोठे आहे महागाई? कोठे आहे गरिबी? पहिल्या दिवशी खरेदीला गेलेली मी भांबावून घरी परत आले. हे फक्त गणपतीतच असते असे नाही तर प्रत्येक सण असाच साजरा केला जातो हे ऐकून मला भोवळ यायचीच बाकी होती. वयक्तिक गणपतीसाठी लोक इतका खर्च करतात तर सार्वजनिक गणपतीचे तर विचारायलाच नको. 

लाखो रुपयांचे भव्य मंडप आणि त्यांची रोषणाई.. मान वर करून बघायला लागेल इतकी भव्य श्रींची मूर्ती.. प्रसाद आणि नैवेद्याची रेलचेल.. सिने तारे-तारकांचा झगमगाट..  समाज सुधारणेचे (?) अनेक कार्यक्रम.. डॉल्बी लावून केलेले चित्र-विचित्र नाच आणि या सगळ्यातून ओथंबणारा भक्तीरस.. मोठमोठठाली पोलिटिकल, कमर्शिअल होल्डिंग्स.. अपार्टमेंट सोसायट्या सुद्धा यात मागे नाही बर का.. 

आमच्या वेळी गणेश उत्सव कसा होता आणि आत्ता कसा आहे, काय चांगले, काय वाईट ह्यावर मला चर्चा करायची नाही. मुलांसाठी, समाजासाठी चांगले वाईट काय हे जो तो जाणतो. पण जेव्हा अश्या सणांमध्ये जातीयवाद, समाजवाद येतो तेव्हा मात्र त्रास होतो. गणेश उत्सव कोणी सुरु केला? तो कोणत्या जातीचा होता? कोणाचे नाव गणेश उत्सवाला द्यावे? असे प्रश्न १२५ वर्षानंतर का उभे राहतात? आपण कोठे तरी चुकतो आहोत का? जेव्हा टिळकांनी गणपतीला घरातून बाहेर आणून चौकात बसवून पूजा केली तेव्हा त्यांच्या मनात समाज एकीकरण ह्या शिवाय दुसरे काहीच नव्हते. हे सगळे पहिले कि वाटते टिळकांनी घरातील गणपती बाहेर आणून चूक तर केली नाही ना? कदाचित ह्या प्रथेमागची मूल्ये ही मधल्या काळात गणपती बरोबरच विसर्जन पावली असावीत. 

मी किती ही जरी टीकेचा सूर लावला असला तरी अजुनी सगळे संपलेले नाही. जो पर्यंत लेझीम-ढोल ताशांवर नाचणारी पावले आहेत, टाळ्यांच्या गजरात आरतीचा दुमदुमणारा आवाज आहे, 'हरे राम- हरे राम' म्हणताना शरीरातूनही येणारी कंपनं आहेत, विसर्जना नंतर येणारी उदासी आहे.. तोवर आपण हरलेलो नाही.  आपल्या मनातील गणेश अजुनी जीवंत आहे आणि तो आपल्याला हरू देणार नाही. 

बाकी श्रींची इच्छा...

-मी मधुरा...
१० सप्टेंबर २०१७

No comments:

Post a Comment