Thursday, December 25, 2025

रुद्रप्रयाग - हरिद्वार - दिल्ली - पुणे

१४ ऑक्टोबर : रुद्रप्रयाग - हरिद्वार 
१६० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडेचार तास  

सकाळी ८ वाजता ब्रेकफास्ट.. ९ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. लंच पर्यंत ऋषिकेश.. मुक्कामाला हरिद्वार.. असं आजच नियोजन.. 

चारधामांचं दर्शन झालं.. आता 'ऋषिकेश'.. 
'ऋषिकेश' - Yoga Capital of The World -  योगा टीचर झाल्यापासून माझ्या बकेट लिस्टवर असलेलं.. किमान दोन आठवड्याचा योगा रिट्रीट प्रोग्रॅम.. आणि बाजूचा एखादा ट्रेक.. पण कधी रिट्रीट प्रोग्रॅम फुल म्हणून तर कधी वेळ जमत नाही म्हणून येणं झालंच नाही..
हे होईल तेव्हा होईल.. पण आज 'मी ऋषिकेशमध्ये पाऊल ठेवणार' यानंच जाम खुश आहे..

बरोबर नऊ वाजता हॉटेल सोडलं.. आजचा पहिला स्टॉप 'देवप्रयाग'.. 
देवप्रयाग.. अलकनंदा नदीवरचा शेवटचा संगम.. ह्या संगमानंतर अलकनंदा गंगा म्हणून ओळखली जाते.. 
खळखणारी अलकनंदा आणि शांत भागीरथी यांचा संगम.. केवळ विलोभनीय!..  


डावीकडून येणारी भागीरथी - उजवीकडून येणारी अलकनंदा 

ऋषिकेश.. 
एकच्या सुमारास ऋषिकेशला पोचलो.. बस पार्किंगपासून टमटम करून 'मुनी की रेती'.. गंगा किनारी आलो.. 
पायऱ्या उतरून गंगेच्या घाटावर येताना समोर दिसलं ते प्रचंड गंगेचं पात्र.. आत्ता थोड्या वेळापूर्वी पाहिलेली छोटीशी गंगा काही किलोमीटर प्रवासांत किती बदलली!!.. 
नदीच्या तीरांना जोडणारा तो रामझुला.. नजरेत भरत नव्हता.. 



रामझुला वरून पैलतीरी असणाऱ्या गीता भवनकडं आम्हाला जायचं होतं..
घाटावरून नदीच्या बाजूनं झुल्यापर्यंत पोचलो.. 

झुल्यावर उभं राहून त्या विस्तीर्ण पात्राकडं पाहणं हा एक अनुभव आहे.. 
नदीकडं पाहत दोन्ही हात पसरून खोल श्वास घेताना काय वाटलं ते शब्दातीत आहे.. 



प्रसिद्ध 'चोटीवाला' मध्ये जेवण घेतलं.. सुग्रास, पारंपरिक चवीची थाळी.. 

ऋषिकेशमध्ये मांसाहारी जेवण मिळत नाही.. शहराचं पावित्र्य राखण्यासाठी अनेक दशकांपासून मांस, मासे, अंडी विक्रीवर बंदी आहे.. इथल्या रेस्टोरेंट्स मध्ये मुख्यत्वे शाकाहारी तसेच सात्विक - कांदा लसूण विरहित पदार्थ, व्हिगन - दुग्धजन्य विरहित पदार्थ मिळतात.. पारंपरिक भारतीय पदार्थांपासून (चाट, लस्सी, आलू पुरी) ते मोमोज थुक्पा सर्व काही मिळतं..


जेवण करून गीता भवन, स्फटिक फॅक्टरी पाहून महादेव मंदिर पहायला गेलो.. 
अतिशय सुंदर, प्रसन्न, अद्भुत ऊर्जा असणारं असं मंदिर.. परिसर जरी मोठ्ठा असला तरी मंदिर लहानसंच होतं.. 
फुलांनी सजवलेली पिंड अतिशय मोहक दिसत होती.. त्या फुलांच्या वासानं मंदिर भरून गेलं होतं.. अगदी हळू आवाजात ' नमः शिवाय' जप ऐकू येत होता..   
एका भिंतीला लागून तीनचार जणं कसला तरी पाठ करत बसली होती.. 
मी ही दुसऱ्या भिंती लगत बसले.. बाकी सगळे शॉपिंगला, इकडं तिकडं भटकायला जाणार होते.. मी तिथं बसलेलं पाहून अभिषेकनं सांगितलं की परत जाताना तुला सांगू.. 
मी डोळे मिटले आणि  नमः शिवाय जपात हरवून गेले.. 


मला बोलवायला आलेल्या ड्राईव्हर बरोबर तिथल्या गल्ल्यातून गंगेच्या काठावर गेले.. किती सुंदर घाट होता तो!.. गंगा आरतीची तयारी सुरु होती.. अनुराधा पौंडवालच्या आवाजात भजनं सुरु होती.. आणि शांत गंगा मैय्या समोरून हे सगळं पाहात होती.. 
मुनी की रेती - शत्रुघ्नघाट.. नावेतून जाणार होतो.. पाण्यात पाय घालून नावेची वाट पहात असताना 'गंगेच्या मनात आत्ता काय असेल?' हा विचार आला.. आणि निबंध स्पर्धेचा विषय म्हणून माझं मलाच हसू आलं.. 


नावेतून 'मुनी की रेती' ला परत आलो.. पंचवीस किलोमीटरवरच हरिद्वार असल्यानं सात वाजेपर्यंचा फ्री टाइम मिळाला.. 
रामानुज शत्रुघ्नचं शक्यतो कुठंही न आढळणारं मंदिर पाहिलं.. ऋषिकेशच्या गल्ली बोळातून चक्कर मारली.. 
सात वाजता टमटम करून बस स्टॅन्ड कडं निघालो.. 

नितळ, स्वच्छ निळीशार गंगा ऋषिकेशच्या हृदयातून वाहतीय आणि तिची खळखळ तिथल्या मंत्रोच्चारांना, योगसाधनेच्या लयबद्धतेला पार्श्वसंगीत देत असेल असं वाटलं..  

योग, साधना, भक्ती, ध्यान त्यामुळं इथं वेगळीच ऊर्जा जाणवते.. 
निघताना मी म्हटलं, इथं घेतलेल्या पहिल्या श्वासापासूनच मी तुझ्या प्रेमात आहे.. तुझ्याकडं इतकं भरभरून द्यायला आहे की एक आयुष्य कमी पडेल.. लवकरात लवकर मला बोलाव.. मी वाट पाहते आहे.. 

हरिद्वारला पोचायला आठ जाऊन गेले.. 
हॉटेलवर आमचं जंगी स्वागत झालं.. पायघड्या घालून, फुलं उधळून, औक्षण करून.. विश्वविहारच्या सर्वेसर्वांमधील संजय वझे सर खास आमच्या स्वागतासाठी उभे होते.. आवरून जेवायला आलो तर six course meal आमची वाट पहात होतं.. सर सगळ्यांना काय हवं काय नको, ट्रिप कशी झाली जातीनं विचारत होते.. फार मोठ्ठी कामगिरी करून आल्यानं विजयाचा सोहाळा असं काहीसं रूप होतं.. 
खडतर यात्रेचं श्रेय मी नाकारत नाहीय पण जरा जास्तीच कौतुक होतंय असं वाटलं.. 

आम्ही चाळीस वझे सरांबरोबर

अकराच्या सुमारास रूमवर परत आले.. 
यात्रा संपली.. उद्या परत जायचं.. 
सामानाची बांधाबांध.. वजनं करणं.. आणि ती मापात आणणं हा एक टास्कच.. नातेवाईक, मित्रमैत्रिणींना देण्यासाठी घेतलेलं गंगाजल आणि प्रसाद यामुळं सगळं गणित चुकत होतं.. जुगाड करून एकदाची बॅग भरली.. आणि बेडवर पाठ टेकली.. 


१५ ऑक्टोबर : हरिद्वार - दिल्ली  
२४० कि.मी. लागणारा वेळ साधारण साडे चार तास 

सकाळी ७ वाजता ब्रेकफास्ट.. ८ च्या सुमारास हॉटेल सोडायचं.. साधारण दोन वाजेपर्यंत दिल्ली एअरपोर्टला पोचायचं.. असं आजच नियोजन.. 

आठच्या सुमारास आमची एक बस दिल्ली एअरपोर्ट टर्मिनल १ तर दुसरी बस टर्मिनल २ च्या दिशेनं निघाली.. 
महाकाय पर्वत, डोंगर, दऱ्या, वळणावळणाचे मनमोहक पण प्रसंगी जीवघेणे रस्ते, खळखळणाऱ्या नद्या आता सगळं मागं पडलं.. 

खरं तर पोर्टलँडसारख्या निसर्गरम्य ठिकाणी राहत असल्यानं मी हे पहाडी सौंदर्य नेहमीच अनुभवत असते.. बर्फाच्छादित पर्वत, पाईन-देवदार वृक्षांची जंगलं, हिरव्यागार दऱ्या, सुंदर धबधबे.. पण हिमालय तो हिमालय.. त्याची सर कोणाला येणार? गेल्या तीन-चार वर्षात हिमालयाशी माझं एक वेगळंच नातं तयार झालंय.. 
हिमालय मला धीरगंभीर योग्यासारखा वाटतो.. जीवनाचं, जगण्याचं कुतूहल संपल्यानंतर शांतपणे उभा असलेला.. त्याच्या पुढं माझं अस्तित्व सूक्ष्म होताना मी स्वतःला त्याच्यात पाहायला लागते.. कधी कधी तो मला माझ्या गाभ्यापर्यंत घेऊन जातो.. म्हणून परत परत त्याच्याकडं यावंसं वाटतं.. 
आत्ताही, त्यानं चारधामांचं समृद्ध करणारं अनुभवांचं अक्षय पांथेय दिलंय बरोबर.. 

बस मध्ये आम्ही दिल्लीत मुक्काम करणारे आणि पुण्याला जाणारे इतकेच होतो.. रोजचे चेहरे दिसत नसल्यानं चुकल्या सारखं वाटत होतं खरं पण, फायनल बाय बाय म्हणण्यापूर्वी पुढच्या चहा ब्रेकला भेटणार होतो.. ह्या दहा दिवसांत ही मंडळी दिनचर्येचा भाग झाली होती.. 
वेगवेगळ्या वयोगटातील, वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी ही मंडळी.. त्यांचे अनुभव, आयुष्याकडं पाहण्याचा त्यांचा दृष्टीकोन ह्यातून कितीतरी शिकता आलं.. दृष्टी व्यापक झाली.. हीच ग्रुप टूरची मिळकत असावी..

साधारण दोनच्या सुमारास आम्ही टर्मिनल २ ला पोचलो.. वैशाली-आनंद, विजयाताई, आळंदीचे गणेश-निकिता आणि मी.. 

दिल्ली - पुणे..
पुण्याला जाणारं दुपारी पाचचं फ्लाईट.. 
चेक इन, सेक्युरिटी करून गेटला येऊन बसले.. 
टेक्निकली दिल्ली ते दिल्ली चारधाम टूर संपली होती.. 

एकूणच, मला असं वाटतं, चारधाम यात्रा प्रत्येकाला काही ना काही देते.. मग तुम्ही अध्यात्मिक शांतीच्या शोधात आला असाल किंवा हिमालयाचं नैसर्गिक सौंदर्य पाहायला किंवा हिमालय अनुभवायला.. 

शेवटी इतकंच म्हणेन विश्वविहार, टूर मॅनेजर अभिषेक, असिस्टंट तृप्ती, आमचे ड्रायव्हर्स-क्लीनर्स आणि ह्या प्रवासात आपुलकीनं काळजी घेणाऱ्या त्या प्रत्येकाची मी कृतज्ञ आहे.. 
.. आणि माझे सगळे सहप्रवासी, 
तुमच्यामुळं ही चारधामयात्रा एक समृद्ध परिपूर्ण अनुभव झाली.. 
Thank you for everything.. 
भेटू लवकरच.. अश्याच एखाद्या टूरमध्ये.. तोवर व्हाट्स अँप आहेच.. 



-मी मधुरा.. 

************************************************

2 comments:

  1. Madhura tu aaplya nawa sarkhe madhur lihites,kiti koutuk karoo shabd kamich padtil.tuze yatra varnan wachun mala Meena prabhu aathawlya.ashich lihit raha.khoop shubhechha.---Bageshree joshi

    ReplyDelete
  2. खूप सुंदर प्रवास वर्णन मधुरा👌👌 पुन्हा चारधाम यात्रा केल्याचा अनुभव आला 😊

    ReplyDelete